अ‍ॅपशहर

एका साहित्यिकाची हलाखी

आपल्या कथा-कादंबऱ्यांनी रसिकांना संपन्न साहित्यानुभूती देणारे उत्तम बंडू तुपे विपन्नावस्थेत असल्याची बातमी क्लेशदायक आहे. साहित्यिक आणि कलाकारांच्या वाट्याला उतारवयात हलाखीचे जीवन येणे ही कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी गोष्ट असते.

Maharashtra Times 10 Dec 2018, 1:03 am
आपल्या कथा-कादंबऱ्यांनी रसिकांना संपन्न साहित्यानुभूती देणारे उत्तम बंडू तुपे विपन्नावस्थेत असल्याची बातमी क्लेशदायक आहे. साहित्यिक आणि कलाकारांच्या वाट्याला उतारवयात हलाखीचे जीवन येणे ही कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी गोष्ट असते. साहित्यिक वा कलाकार ऐन भरात असताना आपल्या सर्जनशीलतेने रसिकांना भरभरून देतात. रसिकांच्या जीवनात आनंदक्षणांची पेरणी करतात. म्हणूनच त्यांचा मोठा चाहतावर्ग असतो. साहित्यिकांच्या तुलनेत अभिनेते, गायक आदी कलाकारांचे वलय मोठे असते आणि मानधनही चांगले असते. मराठीला समृद्ध अशी साहित्य परंपरा असली, तरी आजही एखाद्या साहित्यिकाला पूर्णवेळ लेखन करून जगता येतेच असे नाही. त्यामुळे साहित्यिकांना उदरनिर्वाहासाठी नोकरी वा व्यवसाय करावा लागतो. त्यामुळेच उतारवयात अनेकांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते. त्यात आजारपणाची भर पडली की हलाखीची स्थिती निर्माण होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम marathi writer uttam bandu tupes financial condition not well
एका साहित्यिकाची हलाखी


उत्तम बंडू तुपे यांच्याबाबत नेमके हेच झाले आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी साहित्यनिर्मिती केली. लेखनाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी आपली अनुभूती आणि सर्जनशीलता यांद्वारे साहित्यनिर्मिती केली. 'झुलवा', 'भस्म', 'चिपाड', 'इजाळ', 'शेवंती' आदी कादंबऱ्या, 'आंदण', 'कोबारा' आदी लघुकथासंग्रह आणि 'काट्यावरची पोटं' हे आत्मचरित्र असा साहित्यसंसार त्यांनी उभा केला. आज ते आणि त्यांची पत्नी हे दोघेही अर्धांगवायूच्या आजाराचा सामना करीत असून, तोकडी पेन्शन औषधोपचारावर खर्च होत आहे. अशा वेळी त्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. त्यासाठी केवळ सरकारने किंवा साहित्य संस्थांनीच नव्हे, तर समाजाने पुढाकार घ्यायला हवा. वास्तविक या निमित्ताने साहित्यिकांना उतारवयात मदत करण्याबाबत काही यंत्रणा निर्माण करता येते का, याचा विचार सरकार आणि साहित्य संस्थांकडून व्हायला हवा. दर साहित्य संमेलनात काही कोटी रुपये खर्च होतात. त्यातील काही रक्कम बाजूला ठेवून निधी उभारण्याचाही विचार व्हायला हवा.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज