अ‍ॅपशहर

चुकलेले ग​णित

मणिपूरमधील सामाजिक कार्यकर्त्या शर्मिला इरोम एक महिन्याच्या विश्रांतीसाठी केरळमध्ये जात आहेत. हे सांगतानाच त्यांनी राजकीय निवृत्तीही जाहीर केली. त्या अर्थाने त्यांची राजकीय कारकीर्द निदान आत्तातरी अवघ्या काही महिन्यांची ठरली आहे. त्यांना ९० मते मिळाली. ती देणाऱ्या ८९ मतदारांचेही त्यांनी मनापासून आभार मानलेत.

Maharashtra Times 14 Mar 2017, 12:44 am
मणिपूरमधील सामाजिक कार्यकर्त्या शर्मिला इरोम एक महिन्याच्या विश्रांतीसाठी केरळमध्ये जात आहेत. हे सांगतानाच त्यांनी राजकीय निवृत्तीही जाहीर केली. त्या अर्थाने त्यांची राजकीय कारकीर्द निदान आत्तातरी अवघ्या काही महिन्यांची ठरली आहे. त्यांना ९० मते मिळाली. ती देणाऱ्या ८९ मतदारांचेही त्यांनी मनापासून आभार मानलेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम meaning of sharmila iroms 90 votes
चुकलेले ग​णित


मणिपूरमध्ये लष्कर आणि सुरक्षादले करीत असलेल्या कथित दंडेलीच्या आणि त्यांना मिळणाऱ्या कायदेशीर संरक्षणाच्या विरोधात शर्मिला यांनी विक्रमी उपोषण केले. त्यांना मग सक्तीने जगवावे लागले. ते प्रकरण जसे न्यायालयात गेले, त्याचप्रमाणे मानवी हक्क क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातील कार्यकर्त्यांपर्यंत गेले. त्यामुळे, त्यांचे नाव झाले. त्यांनी उपोषण सोडले, तेव्हाही ती खूप मोठी बातमी बनली. पण हे सारे निवडणुकीत फळले नाही. निवडणुकांची गणिते वेगळी असतात. दरवेळी ती भ्रष्ट असतात, असे नाही. संघटन असावे लागते. मतदारांपर्यंत वारंवार पोहोचावे लागते. कार्यक्रम असावा लागतो आणि मतदारांच्या मनात विश्वासही निर्माण व्हावा लागतो.

काँग्रेस किंवा जनसंघ-जनता-भाजप असा प्रवास केलेला आजचा भाजप हे अनेक दशके काम करत आहेत. त्यांच्या अनेक पिढ्यांच्या मतपेढ्या तयार झाल्या आहेत. भ्रष्टाचाराच्या विरोधात खंदी लढाई दिलेले एक ज्येष्ठ कार्यकर्ते अनेकदा गप्पांमध्ये ‘मला काही सांगू नका. मी उभा राहिलो तर मला दहा मतेही मिळणार नाहीत. हे मला माहीत आहे,’ असे म्हणालेले आहेत. याचा अर्थ, त्यांची नैतिकता उणावली किंवा समाजाला त्या नैतिकतेची किंमत नाही, असे नाही. प्रत्येक क्षेत्रातले मोठेपणे किंवा काम मतपेटीच्या तराजूत तोलता येत नाही, इतकाच त्याचा अर्थ!

शर्मिलांची संघटना किंवा पक्ष नुकता जन्मलेला. तो मतदारांपर्यंत पोहोचणेही शक्य नव्हते. त्यात त्यांनी ‘आम आदमी पक्षा’चा देकार नाकारला. तो स्वीकारला असता तर कदाचित ही वेळ आज आली नसती. गुजरातमधून दोनदा अपक्ष खासदार झालेले दिवंगत पुरुषोत्तम मावळंकर यांनी भविष्यात अपक्षतेची पीछेहाट होत जाणार, असे भाकीत केले होते. आपले सत्त्व टिकवून राजकीय मुख्य प्रवाहात जायचे किंवा निवडणूकबाह्य व्यापक राजकारण करावयाचे, असे पर्याय कार्यकर्त्यांसमोर असतात. त्यात निवड चुकली की, राजकीय संन्यास हवासा वाटतो. इरोम शर्मिला यांनी तेच केले आहे. हे असेच होणार होते!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज