सोलापुरातील विकासकामांच्या लोकार्पणाची संधी साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी एकप्रकारे भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडला. सोलापूर-उस्मानाबाद या महामार्गाचे, तसेच शहरातील सांडपाणी प्रक्रिया केंद्रांचे लोकार्पण मोदींनी केले आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांत पाणी योजना, तसेच समांतर जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजनही झाले. त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजनेत गरिबांसाठी बांधण्यात येणाऱ्या तीस हजार घरांच्या प्रकल्पाचे भूमिपूजनही त्यांनी केले. त्यानंतरच्या भाषणात मोदींनी स्थानिक कामांचा उल्लेख करतानाच देशातल्या विकासकामांची यादी वाचली. आधीच्या सरकारच्या कामाशी त्याची तुलना; तसेच सध्या विरोधक मांडत असलेल्या 'राफेल'च्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षावर टीकाही केली. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींच्या 'चौकीदार चोर है' या टीकेचा समाचार घेताना 'हा चौकीदार चोरांना पकडणारच' असा टोलाही लगावला; तसेच 'ऑगस्टा वेस्टलँड' प्रकरणातील दलाल ख्रिस्तियन मिशेल याचा 'मिशेलमामा' असा उल्लेख करून राहुल गांधींवर हल्ला चढविला आहे.
या टीकास्त्राबरोबरच रस्तेबांधणी, गृहबांधणी आदी क्षेत्रांत सरकारने केलेल्या कामांचा उल्लेख करून मोदींनी स्वत:च्याच सरकारला शाबासकी दिली. सवर्णांतील आर्थिक मागासांना दहा टक्के आरक्षण देण्याच्या ताज्या निर्णयाचा मुद्दाही त्यांनी भाषणात आणला. सोलापुरात विकासकामे वेगाने होत असल्याचा दावा करून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही प्रमाणपत्र दिले. मोदींचे हे भाषण प्रचारसभेतील भाषणाला शोभेसे असेच होते. मराठीतून सुरुवात, ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा उल्लेख, सोलापुरातील कन्नड भाषकांना सुखावण्यासाठी त्या भाषेतून दिलेल्या शुभेच्छा या साऱ्या गोष्टी त्यांच्या आजवरच्या शैलीला साजेशा आहेत. मोदींच्या सोलापूर भेटीचे निमित्त विकासकामांचे असले, तरी एकेकाळी राज्यात चौथ्या क्रमांकावर असलेल्या या शहराची दुरवस्था झाली आहे. दहा लाखांवर लोकवस्तीच्या या शहराला चार ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा होतो, शहराची ओळख असलेला वस्त्रोद्योग धोक्यात आला आहे, अन्य उद्योगांचीही फारशी चांगली स्थिती नाही आणि नवे उद्योग येताना दिसत नाहीत. यामुळे पिचलेल्या सोलापूरकरांना केवळ भाषणे नको आहेत, तर विकासकामांचा झपाटा हवा आहे. राजकारणात हा विकास हरवू नये, हीच इच्छा.
या टीकास्त्राबरोबरच रस्तेबांधणी, गृहबांधणी आदी क्षेत्रांत सरकारने केलेल्या कामांचा उल्लेख करून मोदींनी स्वत:च्याच सरकारला शाबासकी दिली. सवर्णांतील आर्थिक मागासांना दहा टक्के आरक्षण देण्याच्या ताज्या निर्णयाचा मुद्दाही त्यांनी भाषणात आणला. सोलापुरात विकासकामे वेगाने होत असल्याचा दावा करून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही प्रमाणपत्र दिले. मोदींचे हे भाषण प्रचारसभेतील भाषणाला शोभेसे असेच होते. मराठीतून सुरुवात, ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा उल्लेख, सोलापुरातील कन्नड भाषकांना सुखावण्यासाठी त्या भाषेतून दिलेल्या शुभेच्छा या साऱ्या गोष्टी त्यांच्या आजवरच्या शैलीला साजेशा आहेत. मोदींच्या सोलापूर भेटीचे निमित्त विकासकामांचे असले, तरी एकेकाळी राज्यात चौथ्या क्रमांकावर असलेल्या या शहराची दुरवस्था झाली आहे. दहा लाखांवर लोकवस्तीच्या या शहराला चार ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा होतो, शहराची ओळख असलेला वस्त्रोद्योग धोक्यात आला आहे, अन्य उद्योगांचीही फारशी चांगली स्थिती नाही आणि नवे उद्योग येताना दिसत नाहीत. यामुळे पिचलेल्या सोलापूरकरांना केवळ भाषणे नको आहेत, तर विकासकामांचा झपाटा हवा आहे. राजकारणात हा विकास हरवू नये, हीच इच्छा.