अ‍ॅपशहर

या लोकलने साधले काय?

आपोआप दारे बंद होणाऱ्या थंडगार लोकलमधून पश्चिम उपनगरी मार्गावरील काही हजार प्रवाशांनी पहिल्या दिवशी प्रवास केला असला तरी या नव्या एसी लोकलने मुंबईच्या वाहतूक समस्येवर नेमके काय उत्तर मिळाले, हा प्रश्न कुणीतरी विचारायला हवा.

Maharashtra Times 27 Dec 2017, 4:08 am
आपोआप दारे बंद होणाऱ्या थंडगार लोकलमधून पश्चिम उपनगरी मार्गावरील काही हजार प्रवाशांनी पहिल्या दिवशी प्रवास केला असला तरी या नव्या एसी लोकलने मुंबईच्या वाहतूक समस्येवर नेमके काय उत्तर मिळाले, हा प्रश्न कुणीतरी विचारायला हवा. आज एसी लोकलच्या कौतुकात तो अस्थानी वाटला तरी मुंबईत दररोज ५५ लाखांहून अधिक प्रवासी उपनगरी गाड्यांमधून जातात आणि त्यातले बहुतांश दुसऱ्या वर्गातून प्रवास करतात. त्यातही बहुतेकांना रोजच्या रोज बराचसा प्रवास उभ्याने करावा लागतो. धक्केही खावे लागतात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai new ac local train
या लोकलने साधले काय?


या लोकलने हे सारे कमी होणार आहे का? या वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वेळापत्रकात बसवण्यासाठी नेहेमीच्या काही लोकल गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. भविष्यात अशा किमान दहा एसी लोकल येतील, असे म्हटले जाते. तशा त्या आल्या तर त्यांना वेळापत्रकात बसवण्यासाठी आत्ताच्या साध्या लोकलची वेळ बदलणार. किंवा त्यातल्या काही बंदही होऊ शकतात. याचे कारण आजच मध्य व पश्चिम या दोन्ही मार्गांवर दोन लोकल गाड्यांमधील अंतर आता किमान झाले आहे. यापुढे ते कमी होणार नाही. मुळात रेल्वेमार्गांचे आज जे जाळे आहे, त्यातच एसी लोकल बसविण्याचा खटाटोप सामान्य लाखो प्रवाशांसाठी कितपत लाभदायक ठरतो, हे पाहावे लागेल. मेट्रोसारखी संपूर्ण वेगळी लाइन एसी गाड्यांसाठी असती तर तिचा एरवीच्या लोकलसेवेशी संबंध आला नसता.

एका एसी लोकलची किंमत ६४ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. अशा दहा गाड्या आणून ६४० कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा आज जी लोकलसेवा आहे, तिच्यात सुधारणा करण्यासाठी काय करता येईल, याचा विचार प्राधान्याने करायला हवा होता. काही महिन्यांपूर्वीच लोअर परळ येथे जिन्यावर चेंगराचेंगरी होऊन अनेक प्रवासी प्राणाला मुकले. स्थानकांवर मोठे जिने, रूंद पूल, गाडीच्या समपातळीला असणारे फलाट, रूळ ओलांडता येऊ नयेत यासाठी योग्य ती व्यवस्था, मुंबईत आजही असणारी क्रॉसिंग्ज बंद करण्यासाठी तातडीने बांधावयाचे पूल, जिथे शक्य असेल तेथे वाढीव रेल्वेमार्ग टाकण्याची कामे.. या साऱ्यांना खरेतर रेल्वेखात्याने मुंबईत प्राधान्य द्यायला हवे आहे. अशा एसी लोकलने रस्त्यांवरची गाड्यांची वर्दळ कमी होईल, असा कुणाचा भ्रम असेल तर तो दूर व्हायला फारसा वेळ लागणार नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज