रेल्वे प्रवासभाड्यात वाढ करून केंद्र सरकारने देशातील कोट्यवधी लोकांना नववर्षाची अनोखी भेट दिली! भाडेवाढ करताना उपनगरी रेल्वेला वगळून महानगरांतील प्रवाशांना मात्र दिलासा दिला आहे. रेल्वेने भाडेवाढ करताना मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकीटदरात किलोमीटरमागे एक ते चार पैसे अशी वाढ आहे. अशी दरवाढ झाल्यामुळे प्रवाशांना भाडेवाढीचे गांभीर्य लक्षात येत नाही. पैशाच्या प्रमाणात झालेली ही वाढ किरकोळ वाटते. प्रत्यक्षात एकूण प्रवासाचा अंदाज घेतला जातो, तेव्हा काही रुपयांमध्ये तिचे स्वरूप समोर येते व गांभीर्य कळते. म्हणजे पाचशे किलोमीटरच्या अंतरासाठी दहा रुपयांपर्यंतची वाढ होईल. अर्थात, आजच्या महागाईच्या काळात अनेकांना ही वाढ किरकोळ वाटेल. परंतु अजूनही एक रुपया गाडीच्या चाकाएवढा वाटतो, अशा कष्टकरी माणसांसाठी ती मोठी वाढ ठरते. रेल्वेच्या दरवाढीनुसार सर्वसाधारण वातानुकूलित नसलेल्या गाड्या व उपनगरी सेवेत नसलेल्या गाड्यांची तिकिटे प्रतिकिलोमीटर एक पैशाने महागली आहेत. वातानुकूलित नसलेल्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकिटात प्रतिकिलोमीटर दोन पैशांची वाढ झाली आहे. तर, एसी रेल्वे गाड्यांचा प्रवास चार पैशांनी महागला आहे. शताब्दी, राजधानी, दुरांतो अशा प्रीमियम गाड्यांनाही ही दरवाढ लागू होईल. मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस १३८४ किलोमीटर अंतर पार करते. किलोमीटरला चार पैसे या दराने या गाडीचे तिकीट ५५ रुपयांपर्यंत महाग होईल. खानपान सेवेच्या शुल्कामध्ये वाढ केली नसल्याचे जाहीर केले असले तरी अलीकडेच त्यात वाढ करण्यात आली आहे. कोणत्याही सेवेला महसूलवाढीसाठी तिकीटदर हा महत्त्वाचा स्रोत असतो. यापूर्वी २०१४-१५ मध्ये रेल्वेने दरवाढ केली होती. तेव्हा सर्व रेल्वेगाड्यांच्या तिकीटदरात १४.२ टक्के, तर मालवाहतूक शुल्कामध्ये ६.५ टक्क्यांनी वाढ झाली होती. प्रवास भाड्यातील वाढीमुळे मिळणारा वाढीव महसूल रेल्वेच्या जाळ्याचे अत्याधुनिकीकरण करण्यासाठी वापरला जाणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. मधल्या काळात आर्थिक पातळीवर बऱ्याच उलथापालथी झाल्या आहेत आणि अनेक पातळीवर आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केले गेले आहे. तरी रेल्वेच्या सेवेबद्दल तक्रारी आहेत. त्यामुळे, तिकीटदर वाढल्याने सेवांच्या दर्जामध्ये सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा गैर ठरणार नाही.
नववर्षाची भेट?
रेल्वे प्रवासभाड्यात वाढ करून केंद्र सरकारने देशातील कोट्यवधी लोकांना नववर्षाची अनोखी भेट दिली! भाडेवाढ करताना उपनगरी रेल्वेला वगळून महानगरांतील प्रवाशांना मात्र दिलासा दिला आहे. रेल्वेने भाडेवाढ करताना मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकीटदरात किलोमीटरमागे एक ते चार पैसे अशी वाढ आहे. अशी दरवाढ झाल्यामुळे प्रवाशांना भाडेवाढीचे गांभीर्य लक्षात येत नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jan 2020, 4:00 am