माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाच्या गंभीर आर्थिक स्थितीवर भाष्य करून कळकळीने यावर उपाय शोधण्याची विनंती ज्या दिवशी केली, त्याच दिवशी आग्रा या ऐतिहासिक शहराचे नाव बदलून अग्रवन करण्याबाबत उत्तर प्रदेश सरकारचा विचार सुरू असल्याची बातमी येणे हा विरोधाभास आहे. देशात आर्थिक मंदीचे चटके सर्वच समुदायांना बसत आहेत. रोजगार मिळेनासे झाले आहेत. आहे त्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. महागाईने डोके वर काढले आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांनी सरकार हवालदिल झाले आहे. असा सारा चोहोबाजून अंधार दाटून आला असताना हा नामांतराचा विषय ऐरणीवर आणणे सर्वथा अनाठायी आहे. उत्तर प्रदेश सरकारने यात पुढाकार घेणे यात तसे आश्चर्य नाही. योगी आदित्यनाथ सत्तेवर आल्यापासून अलाहाबाद, फैजाबाद, बनारस, मुगलसराय या शहरांची नामांतरे झाली. अर्थात नामांतरे झाली म्हणून या शहरांनी कात टाकली असे काही झाले नाही. पण तरीही आपल्याकडे नामांतराचा भारी सोस. प्रारंभी मोगल व ब्रिटिशांनी अनेक शहरांची नावे बदलली. नंतर स्वतंत्र भारतात परकीयांची ओळख पुसण्यासाठी नामांतराची टूम निघाली. कधी भाषिक, प्रादेशिक तर कधी भावनिक अस्मितेच्या नावाखाली नामांतरे झाली. अगदी ओरिसाचे ओडिशा, मद्रासचे चेन्नई, कलकत्ताचे कोलकाता, बेंगलोरचे बंगळुरु, बाँबेचे मुंबई अशी असंख्य उदाहरणे देता येतील. मायावती यांनीही त्यांच्या राजकारणाची सोय म्हणून आठ शहरांची नावे बदलली होती. आता प. बंगाल या राज्याचेही नाव 'बांग्ला' असे बदलायचे घाटत आहे. साहजिकच योगींनीही तीच री ओढली तर बिघडले कोठे, असे वाटू शकते. त्यात वावगे काही नसले तरी उत्तर प्रदेश सध्या ज्या विवंचनेतून जात आहे, त्याकडे काणाडोळा करून अशा भावनिक अफूच्या गोळ्या जनतेला देणे अप्रस्तुत ठरावे. २२ कोटी म्हणजेच जगातील पाचव्या मोठ्या देशाइतकी लोकसंख्या असलेल्या या राज्यात तीन चतुर्थांश लोक ग्रामीण भागात राहतात व त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. अशांच्या प्रश्नात लक्ष घालण्याऐवजी नामांतरासारखे विषय पुढे येणे ही बेफिकिरी झाली. हे लक्षण सगळ्याच राजकीय पक्षांत थोड्याफार फरकाने दिसून येते, ही खरी शोकांतिका आहे.
आता आग्रा ऐरणीवर
माजी पंतप्रधान डॉ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Nov 2019, 4:00 am