मालेगाव बाँबस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांच्यासहित सात आरोपींवर विशेष एनआयए न्यायालयाने आरोप निश्चित केल्यामुळे या दीर्घकाळ चाललेल्या न्यायप्रक्रियेचे एक पाऊल पुढे पडले आहे. ही समाधानाची बाब आहे. मालेगावमध्ये दहा वर्षांपूर्वी जे बाँबस्फोट झाले, त्याबद्दलचा हा खटला आहे. या स्फोटांत सहा ठार आणि शंभराहून अधिक नागरिक जखमी झाले होते. मालेगावसारखे अल्पसंख्याकांची बहुसंख्या असणारे गाव अशा स्फोटांसाठी निवडण्यामागची गुन्हेगारांची कुटिलता कुणाच्याही लक्षात येण्यासारखी आहे. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसने केला, तेव्हा त्याच्यावर राजकीय हेतूने अनेक आरोप केले गेले. मात्र, न्यायालयाने आरोपनिश्चिती केल्यामुळे या तपासकामावर एक प्रकारे शिक्कामोर्तबच झाले आहे. हा तपास जर न्यायालयाला प्रथमदर्शनी विश्वसनीय वाटला नसता तर हे सातजण आरोपीच होऊ शकले नसते. या प्रकरणात सर्व आरोपींनी 'मोक्का' हा दहशती कारवाया प्रतिबंधक कायदा आधी लावण्यात आला होता. मात्र, हा मोक्का गेल्या वर्षी न्यायालयाने रद्द केला होता. त्यामुळेच, अनेक आरोपींचा जामीनही सोपा झाला. त्यावेळी, जणू हे आरोपी निर्दोषच सुटले आहेत, अशा थाटात काहींनी जल्लोष केला होता. पण त्याहीवेळी न्यायालयाने या सर्व आरोपींवरील सर्व आरोप काढून त्यांना निर्दोष मुक्त करण्यास नकार दिला होता. या आरोपींवरील मोक्का गेला असला तरी त्यांच्यावरील खून, खुनाचा प्रयत्न, दहशती कारवाया करणे आदी भारतीय दंड संहितेतील कलमांन्वये असणारे गुन्हे कायमच आहेत. आता यापुढे हा खटला वेगाने चालून निकाल लवकर येईल, अशी अपेक्षा आहे. भारतात केवळ एकाच रंगाचा दहशतवाद आहे, असा अनेकांचा समज आहे. मालेगाव बाँबस्फोटांचा तपास मात्र वेगळेच काही सांगत आहे. त्यामुळेच हा खटला लवकर निकाली लागणे आवश्यक आहे.
एक पाऊल पुढे
मालेगाव बाँबस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांच्यासहित सात आरोपींवर विशेष एनआयए न्यायालयाने आरोप निश्चित केल्यामुळे या दीर्घकाळ चाललेल्या न्यायप्रक्रियेचे एक पाऊल पुढे पडले आहे.
Maharashtra Times 1 Nov 2018, 5:23 am