उत्तर प्रदेशातील अलाहबाद विद्यापीठ सध्या राजकारणाच्या मुद्द्यांनी गाजते आहे. निवडणुकांच्या तारखा जवळ आल्याने राजकारण ढवळून निघते आहे. उत्तर प्रदेश, बिहार ही तशीही अधिक संवदेनशील राज्ये. तेथील छोट्या घटनांचेही हिंस्र पडसाद उमटतात. सध्या या वणव्यामागे विद्यार्थी संघाच्या वार्षिकोत्सवाचे निमित्त झाले. समाजवादी छात्रसभेच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अखिलेश यादव प्रयागराज येथे जाणार होते. कायदा व सुव्यवस्थेचे कारण सांगून प्रशासनाने त्यांना लखनऊ विमानतळावर थोपविले. विरोधकांना आयता मुद्दा मिळाला. जागोजागी निदर्शने व घोषणाबाजी करून कार्यकर्त्यांनी निषेध केला. हा मुद्दा पेटेल याचे भान राज्य सरकारला नव्हते, असे नाही. या कार्यक्रमाची सूचना प्रशासनाला २७ डिसेंबरलाच दिली असल्याचा अखिलेश यांचा दावा आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज स्थगित करण्यात आले. विद्यापीठात निषेध आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीमार झाला. सपा-बसपा युतीमुळे यंदाचे निवडणूक निकाल धक्कादायक लागू शकतात. अशा स्थितीत भाजप सरकारने घाबरून ही कारवाई केली असा आरोप आहे. विद्यापीठातील कार्यक्माला परवानगी न मिळाल्याने प्रयागराजमधील महंत नरेंद्र गिरी यांची भेट घेण्याचा कार्यक्रम अखिलेश यांनी आखला. कुंभमेळा सुरु असल्याने आधीच सुरक्षेचा प्रश्न आहे. तशात राजकीय गदारोळ टाळण्यासाठी विद्यापीठाने कार्यक्रमाला परवानगी नाकारली आणि सरकारला तसे कळविले. आम्ही फक्त जनतेच्या सुरक्षेची काळजी घेतली असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी दिले. या राजकीय कार्यक्रमाच्या विरोधात अभाविपच्या नेत्यांनी उपोषण सुरु केले होते. त्या परिसरात चार बॉम्ब फेकण्याची घटना घडली होती. यात दोन्ही बाजूंनी राजकारण झाले. मुळात विद्यापीठ परिसरात बॉम्बवर्षाव आणि लाठीमार अयोग्य ठरतो. राजकारणाचे हे बीभत्स रूप विद्यार्थ्यांपासून दूर ठेवायचे की विद्यापीठालाच राजकारण कुंभ बवनायचे याचा विचार सर्वांनी करायला हवा.
राजकारण कुंभ
उत्तर प्रदेशातील अलाहबाद विद्यापीठ सध्या राजकारणाच्या मुद्द्यांनी गाजते आहे. निवडणुकांच्या तारखा जवळ आल्याने राजकारण ढवळून निघते आहे. उत्तर प्रदेश, बिहार ही तशीही अधिक संवदेनशील राज्ये. तेथील छोट्या घटनांचेही हिंस्र पडसाद उमटतात. सध्या या वणव्यामागे विद्यार्थी संघाच्या वार्षिकोत्सवाचे निमित्त झाले.
महाराष्ट्र टाइम्स 14 Feb 2019, 4:00 am