अ‍ॅपशहर

निरोपाचा सल्ला

भारतीय रिझर्व बँकेचे मावळते गव्हर्नर रघुराम राजन यांना त्यांचा कार्यकाल चालू आठवडाअखेर संपुष्टात येत आहे. त्यांची जागी येणारे भावी गव्हर्नर उर्जित पटेल यांना सल्ला देण्याचा मोह राजन यांना टाळता आलेला नाही.

Maharashtra Times 29 Aug 2016, 5:15 am
भारतीय रिझर्व बँकेचे मावळते गव्हर्नर रघुराम राजन यांना त्यांचा कार्यकाल चालू आठवडाअखेर संपुष्टात येत आहे. त्यांची जागी येणारे भावी गव्हर्नर उर्जित पटेल यांना सल्ला देण्याचा मोह राजन यांना टाळता आलेला नाही. शुक्रवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना पटेल यांनी काय करावे आणि काय करू नये, असे सल्ले राजन यांनी दिले आणि रिझर्व बँकेचा अजेंडा मांडण्याचाही प्रयत्न केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम raghuram rajan
निरोपाचा सल्ला


‘केवळ निर्धोक वाटते म्हणून नवनिर्मितीवर बंदी आणून ती मारून टाकू नका,’ असे सांगतानाच त्यांनी, देशातील बडे उद्योजक बँकांकडून कमी व्याजाचा लाभ मिळत नसल्याच्या कारणास्तव बँकांना टाळून कर्ज उभारणी कसे करत आहेत, याकडे लक्ष वेधले. उर्जित पटेल यांच्यासाठी अप्रत्यक्षरीत्या अजेंडा मांडताना त्यांनी पटेल हे यशस्वीपणे चलनवाढ रोखण्याचे आपले लक्ष्य साध्य करतील, असा विश्वास व्यक्त केला. नेहमीच आपल्या जाहीर वक्तव्यामुळे वादग्रस्त ठरलेले राजन आताही आपला स्वभाव अखेरपर्यंत कायम ठेवण्याच्या आग्रहास्तव बोलत आहेत, हे स्पष्ट आहे.

राजन यांनी नेहमीच सुनिश्चित आणि ठाम भूमिका घेतली आणि त्याच्याआड कोणाचाही मुलाहिजा किंवा दबाव आड येऊ दिला नाही. मग तो व्याजदर कमी करण्याबद्दलचा केंद्र सरकारचा दबाव असो वा बँकांच्या बुडित कर्जांबाबतचा बँकांचा बेजबाबदार व्यवहार असो. राजन नेहमीच उघडपणे, ठामपणे आणि आपल्या पदाला साजेशेच बोलले. मात्र, त्यातून सरकार आणि त्यांच्यात एक संघर्ष उभा राहिला आणि त्याची परिणती राजन यांची इच्छा असूनही त्यांना मुदतवाढ न मिळण्यात झाली. राजन यांच्या जाण्याचा परिणाम सौम्य वाटावा यासाठी त्यांच्याच प्रकृतीच्या उर्जित पटेल यांची नेमणूक करीत राजन यांच्यासारखीच धोरणे पुढेही चालू राहतील असा अप्रत्यक्ष संदेश देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे.

आहे तीच धोरणे पुढे सुरू राहणार असतील तर गव्हर्नर बदलला का, या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी नाही. त्यामुळे राजन यांनी रिझर्व बँकेचा अजेंडा ठरविण्याचे कार्य त्यांच्या जागी येणाऱ्या उत्तराधिकाऱ्यावर सोपवावे आणि आपल्या शब्दांचे मोल घालवू नये; कारण त्यांचे म्हणणे कितीही मौलिक असले, तरी त्याला आता पूर्वीइतके वजन राहिले नाही, हे त्यांनीच ओळखायला हवे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज