रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) रेपो दरात पाव टक्का कपात करून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. नजिकच्या काळात वाहन आणि गृहकर्जांचे व्याजदर कमी होऊन त्याचा लाभ थेट लोकांना मिळू शकेल. आरबीआयचे याआधीचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्यानंतर सूत्रे घेतलेल्या डॉ. ऊर्जित पटेल यांचे हे पहिलेच पतधोरण असल्यामुळे त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की , या धोरणाचे कर्ते-धर्ते एकटे पटेल नाहीत, तर सामूहिकपणे घेतलेला हा निर्णय आहे. एका व्यक्तीऐवजी गटाकडून आखलेले हे पहिलेच धोरण आहे. सरकारनियुक्त तीन तज्ज्ञ आणि रिझर्व्ह बँकेचे तीन प्रतिनिधी अशा सहा जणांची पतधोरण समिती त्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर हेच त्या समितीचे प्रमुख आहेत. त्यामुळे, सामूहिकपणे तयार केलेले पहिलेच धोरण म्हणूनही ते विशेष महत्त्वाचे आहे. रेपो दरात कपात म्हणजे व्याजदरात कपात असे मानले जाते. परंतु यापूर्वी रेपो दरात कपात झाली तरीही बँकांनी व्याजदरात कपात करून त्याचा फायदा ग्राहकांना दिला नाही. नव्या गव्हर्नरांनी त्याचा आवर्जून उल्लेख केला असून आता बँकांनी हा लाभ कर्जदारांपर्यंत पोहोचवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. बँकांना आरबीआयकडून ६.५ टक्क्यांऐवजी आता ६.२५ टक्के दराने निधी पुरवला जाणार आहे. हा गेल्या सहा वर्षांतील सर्वांत कमी व्याजदर असल्यामुळे तो लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचला पाहिजे, अशी पटेल यांची अपेक्षा आहे. बुडित कर्जे हा भारतीय बँकांसमोरचा आजच्या काळातला सर्वांत गंभीर प्रश्न आहे. बुडित कर्जांच्या वसुलीसाठी कठोर पावले उचलली की उद्योग क्षेत्राकडून ओरड केली जाते. याचे भान ठेवून या कर्जांच्या वसुलीसाठी उपाय करताना देशाच्या आर्थिक प्रगतीला बाधा येणार नाही, याची दक्षता घेण्याची ग्वाही पटेल यांनी दिली आहे. पायाभूत सुविधा, पोलाद, वस्त्र, वीज व दूरसंचार या पाच क्षेत्रांतील कंपन्यांमुळे एनपीए वाढला असून त्याचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसत आहे. डॉ. रघुराम राजन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला जी शिस्त लावली होती, तेच धोरण पुढे चालवताना भारतीय अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी नव्या गव्हर्नरांनी आणि समितीने टाकलेली पावले स्वागतार्ह आहेत.
ऊर्जितावस्थेकडे
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) रेपो दरात पाव टक्का कपात करून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. नजिकच्या काळात वाहन आणि गृहकर्जांचे व्याजदर कमी होऊन त्याचा लाभ थेट लोकांना मिळू शकेल.
Maharashtra Times 6 Oct 2016, 5:28 am