राफेल प्रकरणी चर्चेत असलेले उद्योगपती अनिल अंबानी त्यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) या कंपनीच्या दिवाळखोरीच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत. 'आरकॉम' या कंपनीवर ४६,५४७ कोटी रुपयांचे कर्ज असून, कंपनीची विविध मालमत्ता विकून ते फेडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, त्यात अपयश आल्याने दिवाळखोरीचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. आता राष्ट्रीय कंपनी विधी लवादाचे (एनसीएलटी) माध्यमातून कर्ज फेडण्याचा प्रयत्न होणार आहे. मात्र, या निर्णयाचा फटका 'आरकॉम'सह अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, रिलायन्स पॉवर, रिलायन्स नेव्हल अँड इंजिनीअरिंग आदी विविध कंपन्यांना शेअर बाजारात बसला असून, 'आरकॉम'चा शेअर ३५ टक्क्यांनी घसरले. 'आरकॉम'ची ही घसरण कशी झाली हा प्रश्न त्या कंपनीसाठी जसा महत्त्वाचा आहे, तसाच तो संदेशवहन क्षेत्रातील उद्योगाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. काही वर्षांपूर्वी 'आरकॉम' ही देशातील या क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी होती. देशात मोबाइल फोन सर्वांपर्यंत पोहोचविण्यात या कंपनीच्या मार्केंटिंग धोरणाचा मोठा वाटा आहे. त्यानंतर दूरसंचार क्षेत्र विस्तारत गेले आणि त्यांमधील उद्योगांची संख्याही वाढली. परिणामी स्पर्धाही वाढली. मात्र, अनिल अंबानी यांचे बंधू मुकेश अंबानी हे 'रिलायन्स जिओ'द्वारे जेव्हा क्षेत्रात आले तेव्हा ही स्पर्धा अतिशय तीव्र बनली. खरे तर 'जिओ'ने या क्षेत्रातील खेळाचे नियमच बदलून टाकले. अन्य कंपन्या टू-जी आणि थ्री-जी सेवा देत असताना आणि महिन्याला एक जीबी डेटा देत असताना 'जिओ'ने फोर जी सेवा आणली आणि महिन्याचा डेटा दिवसावर आणला. शिवाय टेलिफोन कॉल मोफत केले. अशा रीतीने इंटरनेट सेवेची व्याप्ती वाढवित आणि ग्राहकांना आकर्षित करीत 'जिओ'ने देशातील दूरसंचार बाजारपेठ काबीज करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अल्पावधीतच तिने आपले स्थान भक्कम केले. 'जिओ'ने दणक्यात केलेले पदार्पण अनेकांसाठी मृत्यूघंटा ठरली. 'आरकॉम'च्या आजच्या स्थितीमागे या सर्व गोष्टी कारणीभूत आहेत. दूरसंचार उद्योगातील स्पर्धेचा फायदा ग्राहकांना होत असला, तरी स्पर्धा संपून तिथे एकाचीच मक्तेदारी निर्माण झाल्यास ग्राहकांना फटकाही बसू शकतो, हे या निमित्ताने लक्षात ठेवायला हवे.
‘आरकॉम’ची घसरण
राफेल प्रकरणी चर्चेत असलेले उद्योगपती अनिल अंबानी त्यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) या कंपनीच्या दिवाळखोरीच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत. 'आरकॉम' या कंपनीवर ४६,५४७ कोटी रुपयांचे कर्ज असून, कंपनीची विविध मालमत्ता विकून ते फेडण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
30 6 Feb 2019, 6:32 am