विजय खातू यांच्या निधनामुळे देखण्या गणेशमूर्ती घडवणारा प्रतिभासंपन्न मूर्तिकार काळाच्या पडद्याआड गेला. मुंबईच्या गणेशोत्सवात ज्या नावांची प्राधान्याने चर्चा असते त्यात विजय खातू अग्रभागी होते. चार तपाहून अधिक काळ मूर्तिकलेशी निगडीत असलेल्या खातू यांनी आपल्या कलात्मक मूर्तींमुळे जगभरात नावलौकिक मिळवला. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर त्यांचे झालेले निधन हा धक्का आहे. मूर्तिकला हा वडिलोपार्जित व्यवसाय असला तरी विजय यांनी त्यात मिळवलेले कौशल्य दाद देण्याजोगे होते. त्यांचे वडील मूर्तिकार होते आणि ‘पेंटर खातू’ अशी त्यांची ख्याती होती. इतर कारखान्यांमधून काम करता करता वडलांनी स्वतःचा गणपती कारखाना सुरू केला. स्वाभाविकच विजय हेही या कलेकडे ओढले गेले. वडील आर. व्ही. खातू यांच्याबरोबर धर्माजी पाटकर, दीनानाथ वेलिंग यांचे शिष्य बनून त्यांनी मूर्तिकला आत्मसात केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तिकलेसाठी लागणारी नजर, हस्तकौशल्य कमावले. वयाच्या चौदाव्या वर्षापासून विजय स्वतंत्रपणे मूर्तिकाम करू लागले. त्यालाही एक कारण घडले. खातूंच्या कारखान्यात बनलेले गणपती गुजरातेत सुरतला जात. एकदा सुरतला महापूर आला आणि तिथल्या ऑर्डरी रद्द झाल्या. नुकसान झाले. विजय खातूंच्या वडलांना याचा धक्का बसला आणि तिथून त्यांच्या व्यवसायाला उतरती कळा लागली. सातव्या इयत्तेत शिकत असताना कुटुंबावर आलेल्या या संकटामुळे विजय यांना शाळा सोडून गणेश कारखान्यात काम करावे लागले. त्यांनी रात्रशाळेत प्रवेश घेतला आणि दिवसा ते तमाशाचे तसेच दुकानांचे बोर्ड रंगवू लागले. फावल्या वेळात गणेशमूर्ती बनवू लागले. ‘चिंचपोकळी दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ची पंधरा फुटांच्या गणेशमूर्तीची ऑर्डर ही त्यांना मिळालेली पहिली लक्षणीय ऑर्डर. विशाल मूर्तीचा अनुभव नसताना त्यांनी ती अत्यंत सुबक बनवली आणि तिथून त्यांचा गणेशमूर्तिकार म्हणून दिमाखदार प्रवास सुरू झाला. सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींचा आकार वाढू लागला आणि विजय खातू हे अनेक मंडळांचे हक्काचे मूर्तिकार झाले. या कलेने त्यांना लौकिक आणि अनेक सन्मान दिले. केवळ साच्यातले गणपती न बनवता ते दरवर्षी आगळेवेगळे प्रयोग करीत राहिले. त्यामुळेच खातूंच्या मूर्तींवर भाविकांचा विशेष लोभ व भक्ती होती. यंदाच्या गणेशोत्सवात विजय खातूंची अनुपस्थिती भक्तांना व कार्यकर्त्यांना जाणवत राहील.
प्रयोगशील मूर्तिकार
विजय खातू यांच्या निधनामुळे देखण्या गणेशमूर्ती घडवणारा प्रतिभासंपन्न मूर्तिकार काळाच्या पडद्याआड गेला. मुंबईच्या गणेशोत्सवात ज्या नावांची प्राधान्याने चर्चा असते त्यात विजय खातू अग्रभागी होते. चार तपाहून अधिक काळ मूर्तिकलेशी निगडीत असलेल्या खातू यांनी आपल्या कलात्मक मूर्तींमुळे जगभरात नावलौकिक मिळवला. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर त्यांचे झालेले निधन हा धक्का आहे.
Maharashtra Times 27 Jul 2017, 12:16 am