अ‍ॅपशहर

समृद्ध ‘वाद’ मार्ग

परस्परांना नावे ठेवण्यातच ज्यांनी चार वर्षे घालवली त्या भाजप-शिवसेनेमध्ये आता नाममहात्म्याचे आख्यान रंगण्याची चिन्हे आहेत. राज्यात विरोधी पक्षाचे नाव मतदारांना आठवता कामा नये अशी तगडी तजवीज करीत शिवसेनेने भाजपला वेळोवे‌ळी घाम फोडला.

Maharashtra Times 15 Nov 2018, 4:00 am
परस्परांना नावे ठेवण्यातच ज्यांनी चार वर्षे घालवली त्या भाजप-शिवसेनेमध्ये आता नाममहात्म्याचे आख्यान रंगण्याची चिन्हे आहेत. राज्यात विरोधी पक्षाचे नाव मतदारांना आठवता कामा नये अशी तगडी तजवीज करीत शिवसेनेने भाजपला वेळोवे‌ळी घाम फोडला. युती पक्षातील ही कुरघोडी साक्षात पंतप्रधानांच्या वडिलांच्या नावाची हेतुपुरस्सर आठवण करून देण्यापर्यंत पोहचली होती. देशात नामांतराची लाट आली असताना युतीपक्षांमध्येही नामकरणाचा तिढा उद्भवला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम samruddhi-eway


सरकारी प्रकल्प, मार्ग, पूल वा एखादी संस्था उभी झाल्यानंतर त्यास स्वपक्षीय नेत्यांची नावे देत त्यांना अजरामर करण्याची राज्यकर्त्यांची धडपड सातत्याने चालली असते. एका रात्रीत नाव देऊन फलक लावण्याचे प्रसंग महाराष्ट्राने यापूर्वी अनुभवले आहेत. मुंबईच्या वरळी सी-लिंकच्या नामकरणावेळी तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांत एकोपा दिसला होता. महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या 'नागपूर-मुंबई कम्यनिकेशन सुपर एक्सप्रेस-वे' अर्थात समृद्धी महामार्ग मात्र भूमिपूजन होण्यापूर्वीच कुणाचे नाव द्यायचे यावरून वादात सापडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' असलेल्या या महामार्गाला सुरुवातीला शिवसेनेने विरोध केला. नंतर सकारात्मकता दाखविली. हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे आणि या खात्याचे मंत्री; शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी खुद्द या महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची विनंती सरकारकडे केली. भाजपने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव समोर केल्याने खरा राजकीय पेच निर्माण झाला आहे.

मागच्या सरकारच्या युती काळात अनेक उड्डाणपपूल साकारणाऱ्या नितीन गडकरींमागे शिवसेनाप्रमुख भक्कमपणे उभे राहिले होते. गडकरीच्या विदर्भातून मात्र विदर्भाला विरोध करणाऱ्या शिवसेनेला लक्ष्य करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यासमोरील दुष्काळाचे तसेच पेयजलाच्या टंचाईचे सावट असताना समृद्धीच्या नामकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. भरीस भर राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनही सहा दिवसांवर आले आहे. अधिवेशनापूर्वी शिवसेनेने अवनी वाघिणीच्या मृत्यूवरून वैदर्भीय सुधीर मुनगंटीवारांना धारेवर धरले. नागपूर-मुंबईला जोडणाऱ्या रस्त्यावरून वादाचे मुद्दे अधिकाधिक 'समृद्ध' करण्याची खेळी खेळली जाईल असे दिसते आहे. दोन्ही पक्षांतील दिग्गजांच्या नावाने लढला जाणारा नाम-तिढा दुर्लक्षिण्याजोगा नाही. युतीच्या महामार्गातील धक्के निवडणुकीपर्यंत संपू न देण्याची काळजी पद्धतशीर घेतली जातेय हे मात्र आता सगळ्यांना कळून चुकले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज