अ‍ॅपशहर

भक्तीचा सेवामार्ग

तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाणारे असंख्य भक्त तेथे श्रद्धेने केशदान करतात. त्यासाठी, तेथे देवस्थानाने खास व्यवस्था केली आहे. असे दान देणाऱ्यांमध्ये पुरुष असतात तशाच महिलाही असतात. तिरुपती संस्थान या केशदानाचा उचित व्यापारी विनियोग करून कोट्यवधी रुपयेही कमावते.

Maharashtra Times 16 Jun 2017, 6:02 am
तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाणारे असंख्य भक्त तेथे श्रद्धेने केशदान करतात. त्यासाठी, तेथे देवस्थानाने खास व्यवस्था केली आहे. असे दान देणाऱ्यांमध्ये पुरुष असतात तशाच महिलाही असतात. तिरुपती संस्थान या केशदानाचा उचित व्यापारी विनियोग करून कोट्यवधी रुपयेही कमावते. आता शिर्डीच्या साई संस्थानाने एक पाऊल पुढे टाकत साईबाबांच्या मंदिराजवळ रक्तदानाची व्यवस्था केली आहे. साईबाबांच्या भक्तांनी येथे ईश्वर-आराधनेचा एक मार्ग म्हणून रक्तदान करावे आणि या रक्ताचा शिर्डीतील तसेच इतरही रुग्णालयांना उपयोग व्हावा, अशी ही कल्पना आहे. ‘आत्मनो मोक्षार्थं, जगद् हिताय च’ अशी ईश्वर आराधनेची एक व्याख्याच आहे. म्हणजे, स्वतःचे कल्याण आणि सोबत जगाचेही हित.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम saibaba devoties donate blood
भक्तीचा सेवामार्ग


ऐच्छिक रक्तदानाच्या अनेक मोहिमा सतत चालू असतात. मात्र, पुष्कळदा रक्त कमी पडते. आता रक्तातील घटक वेगळे करून दीर्घकाळ टिकविण्याचे विज्ञान विकसित झाले आहे. अशावेळी, सगळ्या सुदृढ तरुण-तरुणींनी वर्षभरात एक-दोनदा रक्तदान केले तरी रक्ताची सारी गरज भागू शकते. शिर्डीत तर साऱ्या जगभरातून लाखो भाविक सतत येत असतात. अनेकजण वर्षभरात अनेकदा येतात. त्यांच्यापैकी कित्येक भक्त लाखो, कोट्यवधी रुपयांच्या देणग्या साईचरणी वाहतात. अशा भक्तांना ‘देणगीबरोबरच तुमचे रक्तही दान करा,’ असे आवाहन करणे, हे अगदी सयुक्तिक आहे. याआधी दर गुरुवारी शिर्डीत असे शिबिर होत असे. मात्र, संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी आता हा उपक्रम दररोज करावयाचे ठरविले आहे. काही काळाने या शिबिराला भक्तांनी उत्तम प्रतिसाद दिला तर हे शिबिर अहोरात्रही चालू शकते.

ईश्वरसेवा ही व्यापक समाजसेवेशी जोडून घेण्याचे प्रयत्न भारतात अनेक शतके सातत्याने होत आहेत. शिर्डीचे साईबाबा, स्वामी विवेकानंद यांच्यासहित अनेक महापुरुषांनी जनसेवेला ईश्वरभक्तीइतकेच महत्त्व दिले. किंबहुना, या दोन्हीत काही फरकच मानला नाही. शिर्डीत रक्तदान करणाऱ्या भक्तांना साईदर्शनासाठी प्राधान्य देण्याचेही संस्थानने ठरविले आहे. केवळ जास्त पैसे देणाऱ्यांना लवकर गाभाऱ्यात प्रवेश देण्यापेक्षा ज्यांनी रुग्णांसाठी स्वतःचे रक्त दिले आहे, त्यांना अग्रक्रम देणे, हे कधीही उचित ठरेल. महाराष्ट्रात शेगांवसहित अनेक देवस्थाने फार चांगले उपक्रम राबवतात. परस्परांचे अनुकरणही करतात. देवाच्या दारात रक्तदान करण्याची शिर्डी संस्थानची ही संकल्पना महाराष्ट्रातल्या मोजक्या देवस्थानांनी मनावर घेतली तरी महाराष्ट्रात कधीही रक्ताचा दुष्काळ पडणार नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज