शीख समाजाचे तीर्थस्थान असलेल्या पाकस्थित कर्तारपूर साहीब येथे विकसित होत असलेल्या कॉरिडॉरबाबत संभाव्य धोके सुस्पष्टपणे सांगण्यात भारताला यश येत आहे. या कॉरिडॉरबाबत भारताची चिंता लक्षात घेऊन पूरक बदल करण्याची पाकिस्तानने दाखवलेली तयारी स्वागतार्ह आहे. या मुद्द्यावर दोन्ही शेजारी देशांतील मतभेदाची दरी कमी होत असल्याचे हे निदर्शक आहे. भारताच्या सीमेनजीकच; परंतु पाकिस्तानात असलेल्या कर्तारपूर गुरुद्वाराला शीख भाविक मोठ्या संख्येने जातात. त्यांना तिथे सहज जाता यावे, त्यासाठी त्यांना व्हिसाशिवाय प्रवेश मिळावा याकरिता प्रयत्न होत आहेत. उभय देशांतील अधिकाऱ्यांची वाघा सीमेवर रविवारी झालेली बैठक हा या समंजस प्रयत्नांचाच एक भाग. कर्तारपूरला येणाऱ्या पाचशे ते सातशे भाविकांना व्हिसाशिवाय प्रवेश देऊ, अशी भूमिका पाकने आधी घेतली. मात्र, भारताच्या आग्रहानंतर त्यात बदल करण्यात आला असून, आता दररोज पाच हजार जणांना व्हिसाशिवाय कर्तारपूरला जाता येईल. परदेशांत स्थायिक झालेल्या भारतीयांनाही असाच प्रवेश दिला जाण्याचे मान्य करण्यात आले आहे. काश्मिरी फुटीरतावादी किंवा दहशतवादी; किंवा पाकस्थित मूलतत्त्ववादी संघटना कर्तारपूर यात्रेला लक्ष्य करू शकतात, अशी भीती भारत सतत व्यक्त करत आहे. पाकपुरस्कृत दहशतवादाचा आजवरचा अनुभव पाहता ही भीती गैर नाही. कोणत्याही स्थितीत फुटीर व दहशतवाद्यांना या भागात थारा देण्यात येणार नाही, असे पाककडून सांगण्यात आले आहे. या कॉरिडॉरमधून भारतविरोधी कारवाया होऊ देणार नाही, अशी हमी पाकने दिली आहे. या कॉरिडॉरच्या कामामुळे पुराचा धोका संभावू शकतो, ही भारताची चिंताही गांभीर्याने घ्यायला हवी. भारत-पाक चर्चा थांबली असताना कर्तापूरच्या निमित्ताने दोन्ही देश एकत्र येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे.
समंजस प्रयत्न
शीख समाजाचे तीर्थस्थान असलेल्या पाकस्थित कर्तारपूर साहीब येथे विकसित होत असलेल्या कॉरिडॉरबाबत संभाव्य धोके सुस्पष्टपणे सांगण्यात भारताला यश येत आहे...
महाराष्ट्र टाइम्स 16 Jul 2019, 4:00 am