अ‍ॅपशहर

उदंड झाले शंकराचार्य!

Maharashtra Times 28 Feb 2017, 1:00 am
हरिद्वारमध्ये नुकत्याच एका स्वामींनी स्वतःला शंकराचार्य म्हणून घोषित केले. त्यामुळे देशात असलेल्या शंकराचार्यांमध्ये आणखी एकाची भर पडली असून, हिंदूंचे धर्मगुरू म्हणून संबोधले जाणाऱ्या या शंकराचार्यांची नक्की संख्या किती या नवीन वादाला तोंड फुटले आहे. वास्तविक आदि शंकराचार्यांनी या देशातील सर्व भागांमध्ये हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून चार पीठे स्थापन केली. या पीठांच्या प्रमुखपदी असलेल्यांना शंकराचार्य म्हणून संबोधले जाते. जोशीमठ, पुरी, श्रृंगेरी व द्वारका या चार ठिकाणी आठव्या शतकामध्ये ही पीठे स्थापन करण्यात आली. अद्वैताचा सिद्धान्त मांडत हिंदू धर्माचा पाया रचण्याचे श्रेय आद्य शंकराचार्यांकडे जाते. ती परंपरा त्यापुढे कायम राहावी यासाठी या चार शिष्यांनी काम करावे ही खरेतर त्यामागची मूळ कल्पना. त्याचप्रमाणे या शिष्यांनी आपले अनुयायी तयार करून त्यांनाही हिंदू धर्मातील ज्ञानाचा प्रसार करावा व योग्य वेळ येताच आपलाच एखादा शिष्य हे काम पुढे चालविण्यासाठी नियुक्त करावा ही त्यामागची संकल्पना होती; पण हिंदू धर्माने प्रत्येकालाचा हा धर्म व त्यातील प्रथा, परंपरा तयार करण्याचे स्वातंत्र्य दिले, उपासनेचे स्वातंत्र्य दिले. सुरुवातीला शंकराचार्य म्हणवून घेणाऱ्यांच्या अंगी किमान पात्रता असायची, पण हळूहळू ती पातळी घसरली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shankaracharya
उदंड झाले शंकराचार्य!


महाराष्ट्रानेही असे काही स्वयंघोषित शंकराचार्य अनुभवले आहेत. मुळात हिंदूंना आता या धर्मगुरूंची गरज भासत नसल्याचे चित्र आहे; कारण त्यांच्या जगण्याच्या रोजच्या लढाईला कसे तोंड द्यावे यावर कोणत्याच शंकराचार्यांकडे उत्तर नाही. साहजिकच कोणीही स्वतःला काहीही म्हणवून घेतले, तरी त्याचे या धर्मातील लोकांना काही पडलेले नाही. त्यातच आपल्या देशात आपल्या धर्माला शिव्या देणाऱ्या किंवा त्याला गौण समजणाऱ्यांना धर्मनिरपेक्ष म्हणून प्रतिष्ठा मिळते. त्यावरही कोणी काही बोलत नाही. त्यातून सामान्यांची ही उदासीन वृत्ती सामाजिक दांभिकपणा आणखी वाढविते. शंकराचार्यांची वाढती संख्या हे त्याचे निदर्शक आहे. हिंदूंच्या रोजच्या जगण्याशी शंकराचार्यांची नाळ जुळत नाही, तोपर्यंत हे चित्र बदलण्याची शक्यता नाही. पण त्याचबरोबर कोणीही उठून स्वतःला शंकराचार्य म्हणवून घेण्याचा पोरकटपणा थांबला पाहिजे. अन्यथा सध्याची उदासीनता लवकरच विनोदाचा विषय बनेल!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज