खूप आतल्या गाठीचे नेते आणि या कानाचे त्या कानाला कळू न देणारे नेते. पोटातील पाणी हलू न देणारे नेते, अशा अनेक गोष्टी ज्यांच्याबद्दल बोलल्या जातात ते शरद पवार. पण त्यांचा तोल केवळ एका प्रश्नाने गेला. त्यांनी वसंतदादांचे सरकार पाडले तेव्हा, खंजीर खुपसण्याच्या प्रश्नावर ते चिडले नव्हते. इंदिरा गांधींनी त्यांचे सरकार बरखास्त केले तेव्हाही ते चिडले नसतील. त्यांनी काँग्रेस सोडली, राष्ट्रवादीची निर्मिती केली, तरीही ते शांत होते. इतकी वादळे ज्यांनी शांतपणे अंगावर घेतली त्यांना साधा प्रश्न का बोचावा? हा उत्सुकतेचा प्रश्न ठरला आहे. प्रश्न तसा साधाच होता, तुमचे कार्यकर्ते सोडून जात आहेत, नेते जात आहेत. पण तुमचे नातेवाईकही सोडून जात आहेत, असे का? हे ऐकताच पवारांचा पारा चढला. तोवर पत्रकारांना मिश्किलपणे उत्तर देणारे पवार अचानक आक्रमक झाले. 'इतिहास साक्षीदार आहे, हजार शत्रूंशी लढता येते पण रक्ताच्या थेंबाशी लढणे क्लेशदायक असते. रणांगणावर रक्ताची नाती दिसली तेव्हा अर्जुनाचे गांडीव अस्वस्थतेने झुकले होते. मराठ्यांच्या रणझुंजार तलवारींवर हा बाका प्रसंग अनेकदा गुदरला असेल. राज ठाकरेंनी बंडाची तुतारी फुंकली तेव्हा बाळासाहेबांचे काय झाले असेल? धनंजय मुंडेंनी बंडाचा झेंडा फडकवला तेव्हा गोपीनाथ मुंडे यांना काय वाटले असेल? नेते, कार्यकर्त्यांचे ठीक आहे. परिवार ऐकण्यात राहिलेला नाही, असे दिसते तेव्हा नियंत्रण सुटते. पीडा साहजिक असते. कधीकाळी काँग्रेस नेतृत्वावरून थेट गांधी घराण्याला प्रश्न करून हिरो झालेले, एका प्रश्नाने मात्र कोपले. पवारांची कुठलीच कृती सहज नसते. या संतापातही काही संकेत, संदेश असावेत का? की 'हे प्रश्न जीवघेणे, हरती इथे शहाणे' अशी त्यांची अवस्था झाली असावी का?
हे प्रश्न जीवघेणे
खूप आतल्या गाठीचे नेते आणि या कानाचे त्या कानाला कळू न देणारे नेते. पोटातील पाणी हलू न देणारे नेते, अशा अनेक गोष्टी ज्यांच्याबद्दल बोलल्या जातात ते शरद पवार. पण त्यांचा तोल केवळ एका प्रश्नाने गेला. त्यांनी वसंतदादांचे सरकार पाडले तेव्हा, खंजीर खुपसण्याच्या प्रश्नावर ते चिडले नव्हते. इंदिरा गांधींनी त्यांचे सरकार बरखास्त केले तेव्हाही ते चिडले नसतील.
महाराष्ट्र टाइम्स 2 Sep 2019, 4:00 am