पूर्वसंचितावर जगण्याची हौस असलेला समाज कोणता, असा प्रश्न विचारला गेला तर त्याचे नाव ‘भारतीय समाज’ असेच असेल. काप गेले तरी राहिलेल्या भोकांची मिजास करण्याचा सामाजिक रोग आपल्याला जडलेला आहे. सुशीलकुमार आणि नरसिंग यादव या दोन मल्लांमध्ये ऑलिंपिकला कोणी जायचे, यावरून झालेला वाद हा याच मानसिकतेमधून झालेला आहे. सुदैवाने उच्च न्यायालयाने या प्रकरणी सारासार विचार करून सुशीलकुमारची चाचणी घेण्याची याचिका फेटाळून लावली आणि नरसिंगचा ‘रिओ’ला जाण्याचा मार्ग खुला झाला. हे सगळेच प्रकरण गमतीशीर आहे. सुशीलकुमारने यापूर्वीच्या दोन ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदके मिळविली आहेत. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय आहे. त्याचे मोठेपण वादातीतच आहे. पण यंदाच्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्रता कोटा जिंकला तो नरसिंग यादवने. वयानुसार सुशीलकुमारचे वजनही वाढलेले आहे. त्यामुळे तो नरसिंगच्या वजनी गटात आला. त्यातच गेल्या ऑलिंपिकनंतर त्याला सातत्याने दुखापतींनी ग्रस्त केले आहे. गेल्या जवळजवळ दोन वर्षांमध्ये तो एकही स्पर्धा खेळलेला नाही. साहजिकच त्याच्याऐवजी नरसिंगची निवड सर्वार्थाने योग्य होती. नरसिंगची कामगिरीही गेल्या दोन वर्षांमध्ये चमकदार झाली आहे. पण सलग तिसरे ऑलिंपिक खेळण्याची आणि पदक मिळविण्याची अपेक्षा सुशीलकुमारने धरली. सुशीलकुमारचे गुरू आणि सासरे असलेले सत्पालसिंग यांनी आपल्या आयुष्यात अनेकदा दरबारी राजकारण करून आपल्या प्रतिस्पर्ध्यांना कुस्ती न खेळताच चीतपट केले होते. सुशीलकुमारला त्याच मार्गाने हे तिसरे ऑलिंपिंकही आपल्याला पदरात पाडून घेता येईल, असे सहज वाटले. कुस्ती महासंघ त्याला दाद देत नाही म्हटल्यावर त्याने थेट न्यायालयाचा रस्ता धरला व आपली किमान चाचणी घेतली जावी, असे भावनिक आवाहन केले. सुदैवाने न्यायालयाने ती फेटाळून लावली. सुवर्णकन्या पी. टी. उषाला झालेला अशाच प्रकारचा मोह त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी मान्य करून एका तरुण खेळाडूचा बळी दिला होता. या निमित्ताने आयुष्यातील पूर्वसंचितावर जगण्याचे दिवस संपले, हा संदेश सगळ्याच क्रीडा जगताला मिळाला आहे. अभिनव बिंद्राने ट्विट करून, सुशीलकुमारने नरसिंगला प्रोत्साहन देण्यासाठी रिओला हजर राहावे, असे सुचविले आहे. आपले मोठेपण सिद्ध करण्याचा सुशीलपुढील तोच खरा पर्याय आहे.
चीत आणि पट
पूर्वसंचितावर जगण्याची हौस असलेला समाज कोणता, असा प्रश्न विचारला गेला तर त्याचे नाव ‘भारतीय समाज’ असेच असेल. काप गेले तरी राहिलेल्या भोकांची मिजास करण्याचा सामाजिक रोग आपल्याला जडलेला आहे. सुशीलकुमार आणि नरसिंग यादव या दोन मल्लांमध्ये ऑलिंपिकला कोणी जायचे, यावरून झालेला वाद हा याच मानसिकतेमधून झालेला आहे.
Maharashtra Times 8 Jun 2016, 12:28 am