सध्या शौचालयांच्या निर्मितीवरून नवभारत निर्मितीचे दावे सुरू आहेत. निर्मल गावांच्या जाहिरातींद्वारे उज्ज्वल भवितव्याचे चित्र रंगविले जाते आहे. हा विकास अनेकदा कसा आभासी ठरतो याचे उदाहरण नागपूर जिल्ह्यात उजेडात आले. उमरेडनजीक वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमधील एका युवतीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. वेदनेची प्रादेशिक प्रतवारी करू नये असे म्हणतात. मात्र हीच घटना नवी दिल्लीत घडती तर एकच खळबळ उडती. ही भयंकर घटना तुलनेने दुर्लक्षित राहिली. अत्याचार करणाऱ्यांमध्ये ट्रकचालक होते, असे कळते. शेती अधिग्रहित केल्याने त्या युवतीला वेकोलिची नोकरी मिळाली. ती गोकुल माइन्सच्या धर्मकाट्यावर लिपिक म्हणून काम करायची. हा परिसर निर्जन आहे. त्या दिवशी दुपारी पाऊसही होता. कामाच्या ठिकाणाहून शौचालय साडेतीनशे मीटरवर आहे. महिला कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या ठिकाणाच्या जवळ स्वच्छतागृह असावे, यासाठी वर्षभर मागणी चालू आहे. वेकोलि प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. पाळत ठेवलेल्या ट्रकचालकांनी युवती स्वच्छतागृहात असतानाच डाव साधला. क्रूरतेची परिसीमा गाठत युवतीचा चेहरा आणि डोळे ठेचले. सध्या तिचा इस्पितळात आयुष्याशी संघर्ष सुरू आहे. वेकोलिचे शौचालय म्हणजे केवळ तीन ताट्यांचा आडोसा आहे. तिथे पाण्याचीही व्यवस्था नाही. बाजूला गवत वाढले आहे. एका आरोपीला परिसरातील नागरिकांनी पकडून चोप दिला. पण त्याची कातडी गेंड्याहूनही निब्बर असल्याची प्रचीती आली. या घटनेने अनेक नवे प्रश्न उभे केले. महिला सुरक्षेच्या दृष्टीने भारताची कामगिरी तशीही सुमार आहे. महिलांच्या 'स्वॅट' तुकडीने राजधानीत स्वातंत्र्यदिनाची सुरक्षा सांभाळल्याचा आनंद व्यक्त करायचा, की सामान्य महिला असुरक्षित असल्याची खंत बाळगायची? या संभ्रमातून सुटका नाही तोवर खेड्यापाड्यात 'टॉयलेट : एक वेदनादायी कथां'चा अंत अशक्य आहे. वेकोलितील सामूहिक बलात्काराने ती जाणीव प्रकर्षाने करून दिली आहे.
टॉयलेट नावाची शोकांतिका
सध्या शौचालयांच्या निर्मितीवरून नवभारत निर्मितीचे दावे सुरू आहेत निर्मल गावांच्या जाहिरातींद्वारे उज्ज्वल भवितव्याचे चित्र रंगविले जाते आहे...
Maharashtra Times 23 Aug 2018, 12:00 am