अ‍ॅपशहर

‘स्वाइन फ्लू’चा विळखा

चीन आणि पाकिस्तान भारतासोबत शत्रूसारखे वागत असले तरी आपल्या देशाचे खरे शत्रू हे वेगाने पसरणारे वेगवेगळे आजार हेच आहेत. शत्रुराष्ट्र सीमेवर हल्ला करतात. त्यांच्याशी लढण्यासाठी लष्कर सज्ज आहे.

Maharashtra Times 21 Aug 2017, 12:04 am
चीन आणि पाकिस्तान भारतासोबत शत्रूसारखे वागत असले तरी आपल्या देशाचे खरे शत्रू हे वेगाने पसरणारे वेगवेगळे आजार हेच आहेत. शत्रुराष्ट्र सीमेवर हल्ला करतात. त्यांच्याशी लढण्यासाठी लष्कर सज्ज आहे. शस्त्रास्त्रे आहेत. सर्जिकल स्ट्राइकसारखी रणनीती आहे. शत्रूसैन्यापेक्षाही वेगाने देशात घुसणाऱ्या आणि थेट नागरिकांवरच हल्ला करणाऱ्या रोगांना तातडीने रोखण्याची अद्ययावत यंत्रणा आपल्याकडे म्हणावी तशी नाही. रोगांची नावे बदलत जातात. कधी मेंदुज्वर, कधी चिकनगुनिया, कधी डेंग्यू तर कधी स्वाइन फ्लू. दहशत मात्र तशीच राहते. सध्या देशावर स्वाइन फ्लूने हल्ला चढविला आहे. त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे तो गुजरातला. तिथे अडीच हजार नागरिक रुग्णालयात असून आजवर २४०पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात या रोगाने २१ बळी घेतले आहेत. आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी तेथे रॅपिड अॅक्शन फोर्सची मदत घ्यावी लागली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम swine flu
‘स्वाइन फ्लू’चा विळखा


चंदीगडमध्ये घरोघरी सर्व्हे सुरू आहे. महाराष्ट्रात तर गंभीर परिस्थिती आहे. राज्यात आतापर्यंत या आजाराने ४१८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. यापैकी ६० टक्के रुग्णांना अन्य गंभीर आजार होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. आकडेवारी बघता स्वाइन फ्लूचा सर्वाधिक विळखा नाशिकला आहे. त्याखालोखाल पुणे आणि पुण्याच्या ग्रामीण भागात हैदोस दिसतो. स्वाइन फ्लू हा एच१एन१ या विषाणूंच्या प्रादुर्भावाने होतो. हा आजार पहिल्यांदा २००९ साली मेक्सिकोमध्ये आढळला. याला स्वाइन फ्लू यासाठी म्हणायचे की, हा डुकरांना ताप आणणाऱ्या इन्फ्ल्यूएन्झा व्हायरसशी मिळताजुळता आहे. तो आढळल्यापासून वर्षभरात या रोगाचा बंदोबस्त करण्याची तयारी जागतिक आरोग्य संघटनेने दर्शविली होती. पण आठ वर्षांनंतरसुद्धा यावर नियंत्रण आलेले नाही. भारतात हा रोग ज्या पद्धतीने थैमान घालत आहे, त्यावरून परिस्थितीचे गांभीर्य कळावे. स्वाइनवर मात करण्यासाठी आपली आरोग्य यंत्रणा झुंजते आहे. राज्यात २ हजार १९९ ठिकाणी स्वाइन फ्लूच्या रुग्णांचे स्क्रीनिंग करणारी केंद्रे सुरू आहेत. १३ लाख ६२ हजार रुग्णांचे स्क्रीनिंग झाले आहे. पण म्हणून धोका टळलेला नाही. हा आजार वेळीच ओळखणे गरजेचे आहे. तितक्याच तत्परतेने उपचार गरजेचा आहे. या अनुषंगाने सरकारी आरोग्य यंत्रणांवर मोठी जबाबदारी आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज