अ‍ॅपशहर

अनाथांचा सत्तासंघर्ष

तामिळनाडूमध्ये सध्या दिवंगत जयललितांची सत्ताधीश ‘अनाथ’ मुलं आणि त्यांची तुरुंगातील ‘सावत्र’ आई व्ही. के. शशिकला यांच्यात सत्तासंघर्ष सुरू आहे.

Maharashtra Times 23 Aug 2017, 1:00 am
तामिळनाडूमध्ये सध्या दिवंगत जयललितांची सत्ताधीश ‘अनाथ’ मुलं आणि त्यांची तुरुंगातील ‘सावत्र’ आई व्ही. के. शशिकला यांच्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. अम्मांच्या निधनामुळे पोरक्या झालेल्या अण्णाद्रमुकचे पालकत्व स्वीकारणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारचाही त्यात ‘अदृश्य’ सहभाग आहे. तामिळनाडूच्या राजकारणात भाजपचे अस्तित्व अडीच टक्के मतांइतके नगण्य असले तरी तिथे एस. गुरुमूर्ती आणि सुब्रमण्यम स्वामी यांची थिंक टँक अहोरात्र कार्यरत असते. संपूर्ण दक्षिणेत सत्तेत नसलेल्या भाजपसाठी अण्णाद्रमुकमधील गटबाजी पर्वणी ठरली आहे. बेहिशेबी चल-अचल संपत्तीप्रमाणेच अम्मा जयललिता लोकसभेतील ३७ आणि राज्यसभेतील १३ अशा पन्नास खासदारांसह २३४ सदस्यांच्या विधानसभेत १३४ आमदारांची संपत्ती सोडून गेल्या आहेत. त्यावर सर्वांचाच डोळा आहे. राज्यसभेतील बहुमत, लोकसभेत चारशेच्या वर जाणारे संख्याबळ मोदींच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ला ताकद देण्याची तामिळनाडूची क्षमता आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या ‘मिशन ३५०’ला हातभार लावणारे राज्य म्हणून मोदी-शहांसाठी तामिळनाडू महत्त्वाचे आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tamilnadu politics
अनाथांचा सत्तासंघर्ष


कुठलेही कष्ट न करता तामिळनाडूसारखे राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे राज्य विनासायास खिशात टाकण्यासाठी पंतप्रधानांनी मुख्यमंत्री ई. के. पलनीस्वामी आणि पनीरसेल्वम यांच्यात सत्तेच्या गाजराचा वापर करून समेट घडवून आणला. तडजोडीत जयललितांच्या हयातीत तीनदा मुख्यमंत्री झालेल्या पनीरसेल्वम यांना कनिष्ठ असलेल्या पलनीस्वामींचे नेतृत्व स्वीकारणे भाग पडले. त्यामुळे पलनीस्वामी आणि पनीरसेल्वम यांच्या गटांना केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देऊन तामिळनाडूचा कारभार रिमोट कंट्रोलने चालविणे मोदींना शक्य होणार आहे. पण तुरुंगात असलेल्या शशिकला आणि त्यांचे भाचे टी. टी. व्ही. दिनकरन यांना ही राजकीय सौदेबाजी मान्य नाही. त्यामुळे मुख्यमंत्री पलनीस्वामी, पनीरसेल्वम आणि दिनकरन यांच्या माध्यमातून लढणाऱ्या तुरुंगातील शशिकला असे अण्णाद्रमुकमधील सत्तासंघर्ष तिहेरी स्वरूप आले आहे. पलनीस्वामींचे १०४, पनीरसेल्वमचे १० आणि शशिकला यांचे २० अशी अण्णाद्रमुकच्या १३४ आमदारांची विभागणी झाली असून शशिकला समर्थकांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे मोदींचे आशीर्वाद लाभूनही पलनीस्वामी-पनीरसेल्वम युतीची सत्ता अल्पमतात आली आहे. राजकीयदृष्ट्या अतिशय कमकुवत असूनही सर्वशक्तिमान मोदी सरकारशी तुरुंगातून लढू पाहणाऱ्या शशिकलांचा हा संघर्ष कितपत यशस्वी होईल, याची शंका आहे. कारण बिहारपासून तामिळनाडूपर्यंत संख्याबळ कोणत्याही पक्षाचे असो, सत्तेवर नियंत्रण कसे ठेवायचे यात मोदी-शहा तरबेज झाले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज