देशाची अर्थव्यवस्था मंदीचे झटके सहन करीत असल्याने आता विविध उद्योगांनीही माना टाकायला सुरुवात केली आहे. मध्यंतरी वाहन उद्योगाने याबाबत ठणाणा केला खरा पण त्याची किमान अर्थसंकल्पात तरी दखल घेतल्याचे दिसले नाही. अशा स्थितीत गेल्या किमान तीन ते चार वर्षांपासूनच मंदीच्या फेऱ्यात अडकलेला यंत्रमाग व्यवसाय आता अखेरच्या घटका मोजत आहे. शेतीखालोखाल सर्वाधिक रोजगार निर्माण करणाऱ्या या उद्योगाकडे सरकारी पातळीवर पाहिजे तसे लक्ष दिले न गेल्याने या व्यवसायाची वीण उसवत गेली आहे. देशभरात २० लाख यंत्रमाग असून, एकट्या महाराष्ट्रात १२ लाख कारखाने आहेत. सोलापूर, भिवंडी, इचलकरंजी व मालेगाव ही भारतातील एकेकाळी मँचेस्टर समजली जाणारी शहरे आता बकाल होत आहेत. महापुराने इचलकरंजीचे कंबरडे मोडले, तर सोलापूर व भिवंडीतील यंत्रमागाची खडखडही सुस्तावली. हजारो यंत्रमागांनी गेल्या काही वर्षांत गाशा गुंडाळला. अडचणी मात्र दिवसेंदिवस वाढतच आहेत. आता तर हा गाडा पुढे रेटणे शक्य होणार नसल्याचे पाहून मालेगावातील यंत्रमागधारकांनी पाच दिवस कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. एकट्या मालेगावात हजारो कारखाने असून, त्यावर एक लाख कामगारांची रोजीरोटी अवलंबून आहे. दिवसाला ५० कोटींची उलाढाल असल्याने मालेगावसह परिसराचे सारे अर्थकारण या एकमेव उद्योगावर अवलंबून आहे. एकोणाविसाव्या शतकात सुरू झालेल्या या उद्योगाने बरीच स्थित्यंतरे पाहिली; पण गेल्या काही वर्षांतील नोटबंदी, जीएसटीसारख्या सरकारी आघाताबरोबर वाढलेले सूताचे भाव, अवास्तव वीजदर, मालाला उठाव नसणे, निर्यात धोरणातील लकवा आणि प्रदूषण नियंत्रणाच्या अटीशर्ती अशा विविध कारणांमुळेही यंत्रमागधारक मेटाकुटीस आले आहेत. या उद्योगातील रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता लक्षात घेणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात हा उद्योग आणखी संकटात कसा सापडेल अशीच पावले पडत आहेत. कर्नाटक-तामिळनाडूच्या धर्तीवर साध्या यंत्रमागास प्रति युनिट एक रुपयाप्रमाणे वीजपुरवठा, व्यवसायास चार टक्के दराने कर्ज, सूत साठेबाजीतील गैरप्रकार टाळण्यासाठी महिनाभर तरी दर स्थिर ठेवणे व उद्योगस्नेही धोरण अशा काही उपायांचा सरकारने तातडीने विचार केल्यास या उद्योगाला थोडा तरी श्वास घेता येईल.
यंत्रमागांची परवड
देशाची अर्थव्यवस्था मंदीचे झटके सहन करीत असल्याने आता विविध उद्योगांनीही माना टाकायला सुरुवात केली आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Feb 2020, 4:00 am