दिल्लीतील निर्भया प्रकरणाचे देशभर पडसाद उमटले. फाशीच्या विलंबाबद्दलही रोष व्यक्त झाला. अशा क्रौर्याची पुनरावृत्ती टळावी म्हणून दोषींना कठोर शिक्षा हवी, असे मत देशभरातील महिला संघटनांनी व्यक्त केले. त्यानंतरही बलात्कारांची संख्या कमी झाली नाही. शिक्षेची भीती वाटत नसल्याने असे प्रकार घडत असावेत काय, या विषयावर नव्याने मंथन करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. नागपुरातील पारडी भागात एका तरुणीवर झालेल्या अत्याचाराने या चर्चेला नव्याने तोंड फोडले आहे. सरकार बदलले मात्र राज्याचे गृहमंत्रिपद नागपूरकडे कायम आहे. 'गुंडपुंडांचे शहर' अशी प्रतिमा निर्माण झाल्याने नागपूरची अपरिमित हानी झाली असून गुन्हेगारांचे कंबरडे मोडून उपराजधानीला गुन्हेमुक्त करण्याचा संकल्प नवे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी इतक्यात अनेकदा केला. या प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला नागपूर पुन्हा हादरले. गुन्हेगाराने मध्यरात्री डाव साधला. आधी तरुणीला स्प्रे मारून बेशुद्ध केले. गुप्तांगात स्टील रॉड घालून त्याने क्रौर्याची परिसीमा गाठली. आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुंडांचे असे धाडस कायद्याचा धाक नसल्याचेच द्योतक ठरते. निर्भया प्रकरणाने देशभर हळहळ व्यक्त झाली. निर्भयाचा बळी घेणाऱ्या मनोवृत्ती केवळ शोक व्यक्त करून संपणार नाहीत. गुन्हेगारांना फाशी झाली तरच कायद्याचा धाक सर्वदूर पसरेल अशी अनेकांची अपेक्षा आहे. मात्र, सामान्यांना अपेक्षित असलेला कायद्याचा धाक खोलवर झिरपला नाही, या वास्तवाचा प्रत्यय या क्रौर्याने दिला. तेलंगणातील डॉ. प्रियंका रेड्डी प्रकरणातही असेच घडले. देशात बलात्कार प्रकरणाच्या आरोपीला फाशी होऊन १५ वर्षे उलटली आहेत. या काळात देशभरात चार लाखांहून अधिक बलात्कार घडले. निर्भया, प्रियंका किंवा नागपुरातील तरुणीच्या वाट्याला आलेले क्रौर्य संपवायचे असेल तर कठोर कायद्याचा तातडीने अंमल हेच उत्तर आहे.
क्रौर्याची परिसीमा
दिल्लीतील निर्भया प्रकरणाचे देशभर पडसाद उमटले फाशीच्या विलंबाबद्दलही रोष व्यक्त झाला...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jan 2020, 4:00 am