रशिया, किरगिस्तान, कझाकस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान आणि चीन या देशांमधील आर्थिक आणि संरक्षणविषयक सहकार्यासाठी असलेल्या शांघाय सहकार्य परिषदेत (एससीओ) भारत आणि पाकिस्तान यांचा प्रवेश दोन वर्षांपूर्वी झाला. मात्र, या परिषदेची गेल्या आठवड्यात किरगिस्तानची राजधानी बिश्केक येथे झालेल्या बैठकीतील चर्चेवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाची छाया होती. दुसऱ्यांदा कार्यभार हाती घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान या परिषदेच्या निमित्ताने एका व्यासपीठावर येणार होते. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकला द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी चर्चा हवी असून, खान यांनी तशी इच्छाही व्यक्त केली आहे. दहशतवाद पोसून भारताशी छुपे युद्ध छेडणारा पाक आपल्या सोयीने चर्चेची मागणी करीत असतो. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत भारताने चर्चा सुरू केली की काही दिवसांतच पाकने पाळलेले दहशतवादी भारतात हल्ला करतात. त्यामुळेच मोदींनी अद्याप खान यांना प्रतिसाद दिला नाही. बिश्केक परिषदेतही त्यांनी खान यांच्याशी चर्चा केली नाही. या परिषदेच्या व्यासपीठाचा लाभ उठवत मोदींनी आपल्या धोरणांची दिशा स्पष्ट केली. पाकिस्तानबरोबर इतक्यात चर्चा करणार नसल्याचे जसे त्यांनी दाखवून दिले, तसेच दहशतवादाची समस्याही अधोरेखित केली. पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या विरोधात ठोस कारवाई करण्याचा मुद्दा त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबरील चर्चेतही उपस्थित केला. चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका (सीपेक) प्रकल्पाबद्दलची भारताची चिंताही त्यांनी स्पष्टपणे व्यक्त केली. 'एससीओ'मधील देशांत आरोग्य, अपारंपरिक ऊर्जा, पर्यटन, संस्कृती यांच्यावर आधारित सहकार्यासाठी मोदींनी दिलेला 'हेल्थ' मंत्रही भारताचे प्राधान्यक्रम दर्शविणारा आहे. 'एससीओ'सारख्या विशिष्ट भौगौलिक टापूतील देशांमधील सहकार्यासाठीच्या व्यासपीठावरून आपले धोरण पुढे नेण्यात मोदींना यश आले आहे.
‘बिश्केक’ची फलनिष्पत्ती
रशिया, किरगिस्तान, कझाकस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान आणि चीन या देशांमधील आर्थिक आणि संरक्षणविषयक सहकार्यासाठी असलेल्या शांघाय सहकार्य परिषदेत ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jun 2019, 12:55 am