अफगाणिस्तानमधून फौजा काढून घेण्यासाठी तालिबानशी चर्चा करण्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा या टापूसाठी महत्त्वाची आहे; त्याचबरोबर ती भारतासाठी दिलासादायक आहे. काबूलला अमेरिकी दूतावासानजीक गेल्या आठवड्यातील बॉम्बस्फोटात एका अमेरिकी सैनिकासह बारा जण मृत्युमुखी पडले. त्याची जबाबदारी तालिबानने घेतली आहे. त्यामुळे, संतप्त झालेल्या ट्रम्प यांनी चर्चा थांबविण्याचे पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे, तालिबानचे प्रतिनिधी गुप्त चर्चेसाठी अमेरिकेला येत असताना ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला. 'अल् कायदा' या दहशतवादी संघटनेशी जाहीर नाते कायमचे तोडणार असल्याचे आणि हिंसाचार कमी करण्याचे आश्वासन तालिबानने अमेरिकेला दिले होते. त्यावर विश्वास ठेवून अमेरिका अफगाणिस्तानला तालिबानच्या हाती सोपवून जाणार होती. तालिबान ही मूलतत्त्ववादी संघटना असून, तिने दहशतवादी कारवायांपासून कधीच फारकत घेतली नाही; तरीही अफगाणमधून काढता पाय घेण्यासाठी आतुर झालेली अमेरिका 'गुड तालिबान' असा शब्दप्रयोग करीत चर्चेची भूमिका घेत आहे. तालिबान व पाकिस्तान यांचे नाते घट्ट असल्याने अमेरिकेने अफगाण धोरणाबाबत इस्लामाबादशी चर्चाही सुरू केली. अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यास भारताला असणारा पाकपुरस्कृत दहशतवाद्यांचा धोका वाढणार आहे. तेथे भारताने केलेल्या मोठ्या गुंतवणुकीलाही फटका बसणार आहे. त्यामुळे अमेरिका-तालिबान चर्चा आणि त्यामुळे त्या टापूत पाकला वाढू पाहत असलेले महत्त्व आपल्याला त्रासदायक आहे. या पार्श्वभूमीवर चर्चा रद्द करण्याचा ट्रम्प यांचा निर्णय भारताला दिलासा देणारा आहे. मात्र, अमेरिकेचे आणि ट्रम्प यांचे आजवरचे धोरण पाहता ते ही भूमिका बदलूही शकतात. तालिबानवर दबाव आणण्याचे प्रयत्न कायम राहतील, असे अमेरिकेने म्हटले आहेच. त्यामुळे, भारताला तूर्त 'थांबा व वाट पाहा' हे धोरण अवलंबावे लागेल.
भारताला दिलासा
अफगाणिस्तानमधून फौजा काढून घेण्यासाठी तालिबानशी चर्चा करण्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा या टापूसाठी महत्त्वाची आहे; त्याचबरोबर ती भारतासाठी दिलासादायक आहे.
Maharashtra Times 10 Sep 2019, 4:00 am