फरारी आणि कर्जबुडवा उद्योगपती विजय मल्ल्या याने परवा तीन ट्विट करीत स्वत:ची 'अद्ययावत' भूमिका मांडली आहे. ती मांडताना एकीकडे त्याने ईडी आणि सीबीआय या दोन भारतीय तपासयंत्रणांना लक्ष्य केले, तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्र्यांकडे बाजू मांडल्यानंतर प्रतिसाद मिळाला नसल्याचे नमूद केले आहे. मोदी आणि जेटलींना १५ एप्रिल २०१६ रोजी लिहिलेले पाच पानी पत्र मल्ल्याने मंगळवारी उघड केले. या पत्रात त्याने १८ मुद्दे उपस्थित करीत एकूण प्रकरणातील सत्यता तपासून पाहण्यासाठी समिती नेमण्याची तसेच न्याय देण्याची मागणी केली होती. ट्विटमध्ये त्याने, कर्नाटक उच्च न्यायालयाकडे १३ हजार ९०० कोटींची मालमत्ता विकण्याची परवानगी मागितली आहे, अशी माहितीही दिली. तो म्हणतो, ही प्रक्रिया न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी. मात्र, मालमत्ता विक्रीची परवानगी मिळू नये यासाठी ईडी; विशेषत: सीबीआयकडून प्रयत्न होऊ शकतात. तसे झाल्यास या तपाससंस्थांचा खरा चेहरा उघड होईल. माझ्याकडून कर्जाची परतफेड व्हावी, असे या तपाससंस्थांना वाटत नाही. हा 'पोस्टर बॉय'च त्यांच्या लक्ष्यस्थानी आहे. साऱ्या कर्जाची परतफेड मला करायची आहे. यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मी राजकारणाचा बळी ठरण्याचा धोका आहे. मल्ल्यावर सध्या लंडन न्यायालयात खटला सुरू आहे. सीबीआयने एप्रिलमध्ये न्यायालयात त्याच्या विरोधातले पुरावे दिले आहेत. या पुराव्यांच्या बळावर मल्ल्याला प्रत्यक्ष चौकशीसाठी भारताकडे सोपविले जाईल, ही सीबीआयला आशा आहे. ही अटक टाळण्याचे मल्ल्याकडून हरतऱ्हेने प्रयत्न सुरू आहेत. 'माझ्याविषयी सकारात्मक दृष्टिकोन तयार होण्याची गरज असल्याने पंतप्रधानांना लिहिलेले पत्र सार्वजनिक केल्याचा' दावा करणारा मल्ल्या मुळात अहंमन्य व आत्मप्रेमी आहे. स्वत:ची सकारात्मक प्रतिमा नव्याने उभारण्याचे असे प्रयत्न पुढच्या काळात आणखी जोमाने होतील! असेच प्रयत्न पुढे नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांच्याकडूनही होऊ शकतात. विजय मल्ल्याला बेसुमार कर्जे देताना भारतीय बँकांनी नियम धाब्यावर बसवल्याचे निरीक्षण लंडनच्या न्यायालयाने याआधी नोंदविले आहेच. मल्ल्याच्या वाट्याला अटक, निकाल, शिक्षा एकवेळ येईलही, पण मल्ल्या-मोदी-चोक्सी यांच्यासारखे नवनवे 'पोस्टर बॉय' अवतरणार नाहीत, याची 'बँक गॅरंटी' कधी मिळेल हे कोडे अजून सुटलेले नाहीच!
न सुटलेले कोडे
फरारी आणि कर्जबुडवा उद्योगपती विजय मल्ल्या याने परवा तीन ट्विट करीत स्वत:ची 'अद्ययावत' भूमिका मांडली आहे. ती मांडताना एकीकडे त्याने ईडी आणि सीबीआय या दोन भारतीय तपासयंत्रणांना लक्ष्य केले, तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्र्यांकडे बाजू मांडल्यानंतर प्रतिसाद मिळाला नसल्याचे नमूद केले आहे.
Maharashtra Times 28 Jun 2018, 6:03 am