अ‍ॅपशहर

केसीआर यांचा दिग्विजय

हिंदी पट्ट्यातील राज्यांत भारतीय जनता पक्षाशी टक्कर देऊन काँग्रेस पुनरागमन करीत असताना छत्तीसगडला जोडून असलेल्या तेलंगणमध्ये मात्र काँग्रेसचा सपशेल पराभव झाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचार करूनही भाजपला तिथे जेमतेम खाते उघडता आले. भाजपबरोबरील नाते तोडून काँग्रेसशी घरोबा करीत आपले स्थान बळकट करू पाहणाऱ्या चंद्राबाबू नायडू तर पुरते चितपट झाले.

Maharashtra Times 13 Dec 2018, 2:03 am
हिंदी पट्ट्यातील राज्यांत भारतीय जनता पक्षाशी टक्कर देऊन काँग्रेस पुनरागमन करीत असताना छत्तीसगडला जोडून असलेल्या तेलंगणमध्ये मात्र काँग्रेसचा सपशेल पराभव झाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचार करूनही भाजपला तिथे जेमतेम खाते उघडता आले. भाजपबरोबरील नाते तोडून काँग्रेसशी घरोबा करीत आपले स्थान बळकट करू पाहणाऱ्या चंद्राबाबू नायडू तर पुरते चितपट झाले. या सर्वांना पुरून उरत तेलंगणमध्ये आपणच सर्वेसर्वा असल्याचे तेथील मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी सिद्ध केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम victory of kcr in telangana
केसीआर यांचा दिग्विजय


तेलंगणमधील विधानसभेची मुदत लोकसभेबरोबरच संपणार असताना, नऊ महिने आधी विधानसभा विसर्जित करून नव्याने निवडणूक घेण्याचा राव यांनी खेळलेला जुगार कमालीचा यशस्वी ठरला. लोकसभेबरोबर निवडणूक झाली असती, तर प्रचारात स्थानिक मुद्द्यांपेक्षा राष्ट्रीय मुद्दे अधिक येतील, हिंदुत्वाचा मुद्दा अधिक उग्र होईल आणि आपल्या अटींवर प्रचार होणार नाही, हे ओळखून राव यांनी खेळी खेळली. तेलंगण राज्यासाठी आंदोलन करून राज्य स्थापनेनंतर पहिले मुख्यमंत्री बनलेल्या राव यांनी अस्मितेच्या राजकारणाला कल्याणकारी योजनांची जोड देऊन आपले स्थान भक्कम केले आहे. शेती, सिंचन, आरोग्य, शिक्षण यांसाठी; तसेच छोट्या-छोट्या समाजघटकांसाठी योजना राबवित राव यांनी आपली विशिष्ट प्रतिमा तयार केली आहे. ती सध्या तरी अभेद्य असल्याचे तेलंगणच्या निकालातून दिसले. हिंदू मंदिरांसाठी देणग्या देत, राज्याच्या कल्याणासाठी यज्ञ करीत आणि मुस्लिमांसाठी पाच टक्के आरक्षण देत आपण सर्व धर्मीयांसाठी काम करीत असल्याचे दाखवून देणारे राव हे धूर्त राजकारणी आहेत. चंद्राबाबूंच्या तेलुगू देसमशी युती करून राव यांच्या विरोधात आव्हान उभारण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला खरा; परंतु नायडूंबरोबरील युती काँग्रेससाठी 'असंगाशी संग' ठरली. नायडू हे तेलंगण विरोधक असल्याचा प्रचार करून राव यांनी आपल्या विरोधातील मतेही वळविली. आंध्रात जाऊन नायडूंना आव्हान देणार असल्याची घोषणा राव यांनी केली आहे. काँग्रेस आणि भाजप यांना दूर ठेऊन होणाऱ्या तिसऱ्या आघाडीच्या राजकारणात राष्ट्रीय पातळीवर भूमिका बजावण्याची आकांक्षा राव यांना आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आणि नंतर ते काय खेळी खेळतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज