अ‍ॅपशहर

धावते जग: मल्ल्यार्पणाच्या दिशेने?

देश आर्थिक संकटात असताना, जे जे म्हणून बुडवे देशाची संपत्ती घेऊन पळाले असतील, त्यांच्यावरील कारवाईचे पाश अधिक घट्ट आवळले जायला हवेत. त्यांच्याकडून रकमेची वसुली व्हायलाच हवी.

महाराष्ट्र टाइम्स 22 Apr 2020, 5:10 am
पैशांच्या गुर्मीत कुणालाही विकत घेण्याची भाषा करणाऱ्या मद्यसम्राट विजय मल्ल्याला जोरदार झटका बसला आहे. भारतातील बँकांचे नऊ हजार कोटी रुपये बुडवून पळालेल्या मल्ल्याचे प्रत्यार्पण भारताकडे करावे, या भारतीय स्टेट बँकेच्या मागणीस विरोध करणारी त्याची याचिका लंडनच्या रॉयल कोर्टाने फेटाळून लावली. आता त्याला सुप्रीम कोर्टाची दारे ठोठवावी लागतील. सुप्रीम कोर्टाने खालच्या कोर्टाची बाजू योग्य ठरवली, तर मल्ल्याच्या विरोधात कारवाई सुरू होईल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vijay-Mallya


मल्ल्याला दिवाळखोर घोषित करा, ही भारतीय बँकांनी केलेली मागणी न्यायालयाने फेटाळली होती. भारतातील उच्च न्यायालयात मल्ल्याच्या विरोधात काही याचिकांवर सुनावणी सुरू आहे. त्याचा निर्णय प्रलंबित असताना, त्याला दिवाळखोर घोषित करण्यास लंडनच्या न्यायालयाने नकार दिला होता; त्यामुळे कदाचित मल्ल्याची आशा दुणावली असेल. त्यातून त्याने प्रत्यार्पणाला विरोध करणारी याचिका दाखल केली असावी. अर्थात, सध्या त्याचा मोहभंग झाला असला, तरी त्याच्या मुखीची भाषा वेगळीच आहे. परवा त्याने भारतातील लॉकडाउनवरही भाष्य केले. त्याच्या उद्योगाला सरकारने मदत करावी, अशी त्याची अपेक्षा आहे. या संकटसमयी अर्थखात्याने ऐकायला हवे, अशी विनंतीही त्याने केली. कोडग्या वृत्तीच्या माणसांवर तसाही यंत्रणेचा विश्वास नसतो. गुंगारा देणाऱ्यांवर असण्याची तर शक्यताच नाही. सध्या देश करोनामुळे संकटात आहे. भले भले पैसेवाले आयुष्याचा बचाव कसा करता येईल, या चिंतेत आहेत. पैसे असतील तर सुखासमाधानाचे आयुष्य जगता येते, ही धनिकांची भाषा करोनाने पार बदलवली आहे.

सुदृढ आयुष्य असेल, तर हवे तेवढे पैसे कमवता येतात, हे सत्यसूत्र करोनाने अधोरेखित केले. देश आर्थिक संकटात असताना, जे जे म्हणून बुडवे देशाची संपत्ती घेऊन पळाले असतील, त्यांच्यावरील कारवाईचे पाश अधिक घट्ट आवळले जायला हवेत. त्यांच्याकडून रकमेची वसुली व्हायलाच हवी. तो पैसा देशाच्या तिजोरीत येणे, ही आजची गरज आहे. ताटातील पोळी भुकेल्यांना देणाऱ्या गरिबांची आत्मिक श्रीमंती या संकटाने दाखविली आहे. लोकांच्या खिशातील पैसे घेऊन देशाबाहेर पळालेल्या मल्ल्यासदृश टोळीला हे तथ्य कसे कळणार?

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज