अभियांत्रिकी, वैद्यकीय आदी व्यावसायिक पदवी शाखांच्या प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षांच्या (जेईई, नीट) तयारीकरिता विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव स्तुत्य आहे. सध्या या परीक्षांची तयारी प्रामुख्याने खासगी कोचिंग क्लास करून घेतात. या क्लासेसचे पुरते बाजारीकरण झाले असून, त्यांचे शुल्क मध्यमवर्गीय पालकांच्याही आवाक्यात राहिलेले नाही. बाजारपेठेतील पॅकेजची संकल्पना या क्षेत्रातही आली असून, बारावी व जेईई वा नीटची तयारी असे पॅकेज करून लाख रुपयांपेक्षा अधिक शुल्क आकारणारे क्लास मुंबई-पुणेसह देशभर आहेत. प्रवेश परीक्षांच्या दोन महिने आधी विशेष वर्ग घेणारे महागडे क्लासही आहेत. क्रयशक्ती असलेले पालकच मुलांना या क्लासना पाठवू शकत असल्याने सुस्थित घरांतील मुले प्रवेश परीक्षांत अधिक यशस्वी होतात. याचा अर्थ सर्व क्लास गुणवत्तापूर्ण असतात, असेही नाही. त्यांतही सुमारांचा सुळसुळाट आहे. तेथे मुलांची फसवणूक होत असते. वास्तविक शाळा-महाविद्यालयांतच या परीक्षांची तयारी व्हायला हवी; परंतु अनेक कनिष्ठ महाविद्यालयांत नेहमीचेही वर्ग होत नाहीत. त्यामुळे क्लासला जाणे जणू अटळ झाले आहे. प्रवेश परीक्षांचे तंत्र वेगळे असते. नेहमीच्या आकलनाच्या जोडीने वेगाने प्रश्न सोडविण्याचे कौशल्य असावे लागते. त्यासाठी सराव महत्त्वाचा असतो. तो क्लासमधून करवून घेतला जातो. तिथे जाऊ न शकणारे होतकरू विद्यार्थी सरावात कमी पडतात. सरकारने मोफत वर्ग सुरू केल्यास त्यांचा लाभ अशा विद्यार्थ्यांना होईल. खासगी क्लासमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लाभ होईल आणि त्यांची आर्थिक पिळवणूक थांबेल. या परीक्षांसाठी स्थापलेल्या 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी'ची (एनटीए) देशभरात दोन हजार ६९७ सराव केंद्रे असून, तिथे येत्या शैक्षणिक वर्षापासून मोफत मार्गदर्शन वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, ही केंद्रे आठ सप्टेंबरला सुरू होणार असून, तिथे विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा घेतल्या जातील. या परीक्षांतील कामगिरीनुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाईल. शिक्षणाचे बाजारीकरण वेगात सुरू असताना सरकारचे हे पाऊल मोलाचे आहे. त्याची योग्य अंमलबजावणी करून योजना यशस्वी होईल, याची काळजी घ्यायला हवी; तसेच या धोरणाचा विस्तारही करायला हवा.
स्वागतार्ह प्रस्ताव
अभियांत्रिकी, वैद्यकीय आदी व्यावसायिक पदवी शाखांच्या प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षांच्या (जेईई, नीट) तयारीकरिता विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव स्तुत्य आहे.
Maharashtra Times 31 Aug 2018, 12:04 am