मोठमोठे उपक्रम तत्परतेने पूर्ण करण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा हातखंडा आहे. बेबंद बोलण्यातही त्यांचा बोलबाला होता. तो वाढतो आहे. देशात सर्वांत परिणामकारक म्हणून त्यांचे रस्ते बांधकाम खाते ओळखले जाते. पंतप्रधान मोदींनीही त्यांची प्रशंसा केली. एकट्या नागपुरात ७० हजार कोटी आणल्याचा दावा गडकरी करतात. रस्त्यांखेरीज राज्यातील मेट्रो, सिंचन आणि जलवाहतुकीचा मोठा निधी गडकरींमुळे मिळाला हे तथ्य आहेच. येत्या शनिवारी नागपुरातील ३ हजार ३०० कोटींच्या स्मार्ट सिटी तसेच 'ऑरेंजसिटी स्ट्रीट'चे भूमिपूजन होणार आहे. पण अलीकडे गडकरींचे भाषण म्हटले की भाजपतील वरिष्ठ नेत्यांच्या छातीत धस्स होत असेल. स्वप्न दाखवून पूर्ण केले नाही तर लोक राजकीय नेत्यांना फटकावून काढतात, हे त्यांचे वाद निर्माण करणारे नवे वाक्य. गडकरींनी दस्तरखुद्द पंतप्रधानांना आव्हान दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. मी कामे केली असल्यामुळे माझ्यावर टीका करण्याचा कुणाला अधिकार नाही, असे गडकरींना वाटते. भरपूर रोजगार देणाऱ्या नागपुरातील मिहानचे स्वप्न अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही याकडे विरोधकांनी लक्ष वेधले, तर गडकरींचे उत्तर काय असणार, हे अद्याप समजलेले नाही. दरम्यान, स्वप्नाचे दाखले देऊन गडकरींनी थेट मोदींना आरसा दाखविल्याची टीका एमआयएमच्या असदुद्दीन ओवेसींनी केली. तुमचा रोख कुणाकडे आहे हे लक्षात आले, अशी कोपरखळी काँग्रेसने मारली. येत्या काळात गडकरींकडे महत्त्वाची जबाबदारी येणार असल्याची चर्चा जोरात असल्याने त्यांच्या वक्तव्यांकडे अनेकांचे बारीक लक्ष असते. आताशा कदाचित स्वपक्षापेक्षा विरोधकच त्यांचे भाषण काळजीपूर्वक ऐकू लागले असतील. नोकऱ्याच नसल्याने आरक्षण देऊन फायदा काय, या त्यांच्या वक्तव्याचा अनेकांनी खरपूस समाचार घेतला. अपयशाची जबाबदारी स्वीकारणारे नेतृत्व हवे, या त्यांच्या वक्तव्याचा रोख मोदी व शहांकडे होता, असा अर्थ अनेकांनी काढला. मोदींना बदलून नवे नेतृत्व आणण्याच्या चर्चांचे त्यांनी खंडन केले. मात्र, त्याची चर्चा झाली नाही. आपल्या प्रत्येक वाक्याचा गैरअर्थ काढला जातो, अशी गडकरींची कैफियत आहे. अन्य नेत्यांच्या तुलनेत आपल्याच शब्दांना वाद का चिकटतो, याचे आत्मचिंतन आता त्यांनीच करावे. विरोधकांच्या स्वप्न-पूर्तीसाठी कारणीभूत ठरणे, तसेही त्यांना आवडणार नाही.
स्वप्नपूर्ती कोणाची?
मोठमोठे उपक्रम तत्परतेने पूर्ण करण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा हातखंडा आहे. बेबंद बोलण्यातही त्यांचा बोलबाला होता. तो वाढतो आहे. देशात सर्वांत परिणामकारक म्हणून त्यांचे रस्ते बांधकाम खाते ओळखले जाते.
महाराष्ट्र टाइम्स 29 Jan 2019, 5:57 am