अ‍ॅपशहर

दिल्लीची घुसमट

देशात सर्वत्र सहजपणे उपलब्ध असलेली हवा राजधानी दिल्लीसाठी घातक बनली आहे. तेथील हवेच्या प्रदूषणाच्या पातळीने उच्चांकी स्तर गाठत गेल्या काही दिवसांपासून दिल्लीकरांना श्वास घेणे अवघड केले आहे.

Maharashtra Times 8 Nov 2016, 12:07 am
देशात सर्वत्र सहजपणे उपलब्ध असलेली हवा राजधानी दिल्लीसाठी घातक बनली आहे. तेथील हवेच्या प्रदूषणाच्या पातळीने उच्चांकी स्तर गाठत गेल्या काही दिवसांपासून दिल्लीकरांना श्वास घेणे अवघड केले आहे. धूर आणि धुके यांची जाड चादरच जणू दिल्लीवर पांघरली गेली असून, त्यामध्ये सर्वसामान्यांचा जीव गुदमरतो आहे. आज दिल्लीचा श्वास कोंडला असला, तरी उद्या-परवा मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर यांच्यासहित देशातील बहुतेक मोठ्या शहरांतील हवा दिल्लीप्रमाणेच घातक बनू शकते. त्यामुळे दिल्लीतील हवेचे संकट केवळ त्या महानगरापुरते मर्यादित नाही. म्हणूनच या संकटाच्या मुळाशी काय आहे हे पाहण्याची गरज आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fog cover on delhi
दिल्लीची घुसमट


दिल्लीच नव्हे, तर देशातील बहुतेक मोठ्या शहरांत खासगी वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. पुण्यासारख्या ठिकाणी तर लोकसंख्येपेक्षा वाहनसंख्या अधिक होते आहे. या वाहनांतून उत्सर्जित होणारे कार्बन डाय ऑक्साइड आणि अन्य विषारी वायू हवेचे प्रदूषण वाढवतात. आपल्याकडे केवळ खेड्या-पाड्यांतच नव्हे, तर महानगरांच्या रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य असते. ही धूळही प्रदूषणात भर घालते. हे प्रदूषण असते अत्यंत सूक्ष्म अशा कणांचे. त्यांना पार्टिक्युलेट मॅटर (पीएम) असे म्हणतात. मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर या एककात मोजले जाणारे हे कण श्वासाद्वारे थेट फुफ्फुसात जातात. पीएम २.५ आणि पीएम १० या दोन प्रकारचे कण अतिशय घातक असून, त्यांमुळे श्वसनसंस्थेचे असंख्य दुर्धर विकार जडतात. या दोन्ही कणांच्या प्रदूषणाची पातळी दिल्लीत सामान्य सरासरीपेक्षा तिप्पट-चौपटीने वाढली आहे. तापमान कमी झाल्याने आणि हवा वाहती नसल्याने धूर आणि धुके यांची जाडी वाढत गेली. शिवाय हरयाणा, पंजाब, राजस्थान या शेजारील राज्यांतील शेतकऱ्यांनी पिकाच्या कापणीनंतर शेतात आगी लावल्या आहेत. या आगींच्या धूराचा परिणामही दिल्लीच्या हवेवर होतो आहे.

राजधानीतील प्रदूषण आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. श्वास घेणेही अवघड असले, तरी बाहेर पडण्याशिवाय गत्यंतर नसणारे ​​​बिचारे कष्टकरी दिल्लीकर मास्क वापरत आहेत. संकटसमयी व्यापारी वृत्ती उफाळून येणे आपल्याकडे नेहेमीचे असल्याने मास्कच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत. प्रदूषणाने उच्चांकी आणि अतिशय धोकादायक पातळी गाठल्यानंतर दिल्लीतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. परिस्थितीवर मात करण्यासाठी बांधकामांवर, कचरा वा तत्सम गोष्टी जाळण्यावर, तसेच जनरेटरचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली. त्याचबरोबर धुळीवर मात करण्यासाठी तेथील रस्ते आता व्हॅक्युम क्लिनरने स्वच्छ होणार आहेत आणि रस्ते धुतलेही जाणार आहे. कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचाही विचार होत आहे. या उपायांनी सध्याच्या संकटावर मात करता येईलही; परंतु हे संकट पुनःपुन्हा येऊ नये, यासाठी दीर्घकालीन उपाय करायला हवेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे खासगी आणि डिझेलवरील वाहनांवर नियंत्रण आणायला हवे. धुळीवर मात करण्यासाठी नेहेमीच झाडूऐवजी यंत्रांचा वापर व्हायला हवा. मुख्य म्हणजे, हरित आच्छादन वेगाने वाढवायला हवे. हे उपाय केवळ दिल्लीपुरते मर्यादित न ठेवता सर्व शहरांत तातडीने करायला हवेत. तसे न केल्यास दिल्लीसारखीच अन्य शहरांची घुसमट होण्याचा दिवस फारसा दूर नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज