अ‍ॅपशहर

उपायांचा आरंभ

गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीनंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे गेल्या वर्षभरापासून चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) या संस्थेचा अभ्यासक्रम आणि तेथील परीक्षा पद्धत यंदापासून बदलण्यात येणार आहे.

Maharashtra Times 27 Jul 2016, 3:13 am
गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीनंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे गेल्या वर्षभरापासून चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) या संस्थेचा अभ्यासक्रम आणि तेथील परीक्षा पद्धत यंदापासून बदलण्यात येणार आहे. या संस्थेच्या नियामक परिषदेच्या अध्यक्षपदी चौहान यांची नियुक्ती केल्याने तेथील विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी दीर्घकाळ आंदोलन केले होते. चौहान यांच्या पात्रतेबरोबरच या संस्थेतील अनेक त्रुटी या निमित्ताने समोर आल्या होत्या. चौहान यांच्या नियुक्तीपासून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या अधिकारापर्यंत प्रश्नही उपस्थित केले गेले. भारतीय चित्रपटसृष्टीत मोलाची भर घातलेल्या ‘प्रभात स्टुडिओ’च्या जागेवर उभारण्यात आलेल्या या संस्थेत या ना त्या कारणांनी विद्यार्थी सतत संघर्ष करीत आले आहेत. चित्रपट व्यवसायासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान आणि कौशल्य यांचे प्रशिक्षण देणाऱ्या या संस्थेच्या अध्यक्षपदावर विराजमान झालेल्यांमध्ये आर. के. लक्ष्मण यांच्यापासून अदूर गोपालकृष्णन, यू. आर. अनंतमूर्ती, श्याम बेनेगल यांच्यापर्यंत अनेकांचा समावेश आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, गिरीश कार्नाड यांच्यासारख्यांनीही संचालकपदाची धुरा वाहिली आहे. आपापल्या क्षेत्रात दिग्गज असलेली ही मंडळी अधिकारपदावर असतानाही तेथे सातत्याने वाद आणि संप झाले. या संस्थेत येणारे विद्यार्थी हे आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून येतात. त्यातच ते सर्जनशील असतात. त्यामुळे स्वतःच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याबाबत अधिक सजग असतात. या संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर अभ्यासक्रम नेमका किती वर्षांत पूर्ण करावयचा, याचे बंधन नसल्यामुळे ही संस्था व त्याचे वसतिगृह हा एक अड्डा बनून गेला होता. गजेंद्र चौहान यांच्यासारख्या दुय्यम अभिनेत्याची अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर वाद चांगलाच पेटला. या पार्श्वभूमीवर नवा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धत जाहीर करण्यात आली आहे. नव्या पद्धतीनुसार अभ्यासक्रम सहा सत्रांमध्ये विभागला जाणार असून, श्रेयांक (क्रेडिट) पद्धतीनुसार विद्यार्थ्यांचे मूल्यांकन होईल. हा अभ्यासक्रम सहा वर्षांत पूर्ण करण्याचे बंधन आहे. आता यावरूनही वाद होईल. गजेंद्र चौहान यांची नियुक्ती वादग्रस्त असल्याचे मान्य केले, तरी विद्यार्थ्यांनी आपल्याला शिकविण्यासाठी कोणते शिक्षक पाहिजेत, परीक्षा कोणी घेतली पाहिजे आदी अटी घालणेदेखील लक्ष्मणरेषा ओलांडण्यासारखेच होते. वास्तविक या सर्व पसाऱ्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. ज्या हेतूने ही संस्था स्थापली गेली तो हेतूही काळाच्या प्रवासात पुन्हा एकदा तपासण्याची गरज आहे. या संस्थेने देशाला चित्रपटकला व उद्योगातील असंख्य सर्जनशील कलाकार दिले असले तरीही अलीकडच्या काळात ही संख्या रोडावली आहे, हे देखील मान्य करावे लागेल. त्यामुळे अभ्यासक्रमात बदल हे पहिले पाऊल ठरवून मुळात क्षेत्राची गरज भागविणारे अभ्यासक्रम चालविणारी आणि सर्वोच्च व्यावसायिकता जपणारी संस्था म्हणून एफटीआयआयचा लौकीक कसा वाढेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी दीर्घकालीन योजना आणि त्या राबविण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती कशा मिळविता येतील, हे पाहणे आवश्यक आहे. अन्यथा हा बदल हा फक्त तात्पुरता इलाज ठरेल. गरज आजारावरच्या जालीम उपायांची आहे, मलमपट्टीची नव्हे!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज