जॉर्ज फर्नांडिस या नावाला देशभरात जी प्रचंड लोकप्रियता लाभली ती धर्म, जात, भाषा या सगळ्यांचा पलीकडची होती. दक्षिण कन्नड प्रांतातून नशीब काढायला मुंबईत आलेला हा तरुण, समाजवाद्यांच्या कामगार चळवळीत ओढला जातो काय आणि हा हा म्हणता 'मुंबई बंद'चा हुकमी एक्का बनतो काय! तिथून मुंबईचे अनभिषिक्त सम्राट स. का. पाटील यांना धूळ चारून लोकसभेत जाऊन राष्ट्रीय राजकारणातील त्यांचा प्रवेश, १९७४ साली घडवलेला रेल्वेचा २० दिवसांचा देशव्यापी संप, आणीबाणीतील बडोदा डायनामाईट प्रकरण, बिहारमधील मुजफ्फरपूरच्या तुरुंगातून भरलेला लोकसभेचा अर्ज व प्रचंड बहुमताचा विजय, त्यानंतर केंद्रातील मंत्रिपद हे सारे कल्पनेच्या पलीकडचे आहे. जॉर्ज यांनी यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली, तरीही सामान्यातला सामान्य कार्यकर्ताही त्यांना जॉर्ज असे एकेरीच संबोधत असे. त्यांच्या यशामागील तेच खरे गमक आहे. ते केंद्रात मंत्री झाले तरी जमिनीवर घट्ट पाय रोवून उभे होते. तरुण वयातच डॉ. राममनोहर लोहिया यांच्या संपर्कात आलेले जॉर्ज हे कट्टर लोकशाही समाजवादी होते. भारतातील जात-वर्गीय शोषणाच्या बहुपेडी प्रक्रियेचा त्यांचा काटेकोर अभ्यास होता. लोहिया यांनी समाजवादी पक्षातील उच्च जात-वर्गीय नेतृत्वावरच 'पिछडा पावे सौ में साठ' ही घोषणा देत प्रहार केला होता. एक प्रकारे माओ यांच्या 'बम्बार्ड द हेडक्वार्टर्स' घोषणेची ही पुनरावृत्ती होती. यातून समाजवादी पक्षात फूट पडली. लोहिया यांच्यासोबत तेव्हा मधू लिमये, राजनारायण व जॉर्ज फर्नांडिस हे तीनच खंदे कार्यकर्ते उरले. जॉर्ज यांनी कायम लोहिया व नंतर लिमये यांना राजकीय गुरू व विवेकाचा आवाज मानले. लोहिया यांच्या निधनानंतरही त्यांच्या विचारधारेवर आधारित समाजातील शोषित, पीडित, कामगार वर्गासाठीचा त्यांचा संघर्ष तीव्र झाला. मुंबईतील असंघटित कामगारांना युनियनच्या झेंड्याखाली संघटित करून त्यांनी इतके जबरदस्त बळ दिले की, त्यांच्या एका हाकेसरशी मुंबई कोणताही दगड न पडता कडकडीत बंद होत असे. रेल्वे कामगारांची वेतनवाढ व इतर मागण्यांसाठी त्यांनी केलेल्या संपाने तर इंदिरा गांधी यांच्या पायाखालची जमीन सरकली. खरेतर या संपानेच इंदिरा गांधींना आणीबाणीपर्यंत आणले. पुढे पहिल्या जनता राजवटीत ते उद्योगमंत्री झाले. कोकाकोला व आयबीएम अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्यांनी देशातून गाशा गुंडाळायला लावला. जनता पक्षात मधू लिमये यांनी जनसंघ कार्यकर्त्यांच्या दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा काढला व काँग्रेसने संसदेत अविश्वास ठराव आणला. जॉर्ज यांनी त्याच्या विरोधात जोरदार भाषण केले. त्यानंतर लगेच लिमये यांच्याशी त्यांची भेट झाली व दुसऱ्याच दिवशी त्यांनी ठरावाच्या बाजूने तितकेच जोरदार भाषण करून राजीनामा देऊन टाकला. एका नेत्याने एका दिवसाच्या अंतराने अभ्यासपूर्ण मुद्दे मांडत परस्परविरोधी युक्तिवाद करण्याच्या या कृतीवर आजही चर्चा होत असते. पुढे बिहारच्या राजकारणात स्थिरावलेल्या जॉर्ज यांचे शिष्यांशी फारसे पटले नाही. लालूप्रसाद यांच्याशी आलेल्या वितुष्टातून त्यांनी जनता दलातून बाहेर पडून समता पार्टी स्थापली. समता पार्टीने जन्मापासूनच वाजपेयी व अडवाणी यांच्या नेतृत्वाखालील भाजपशी सख्य जोडले. यात फर्नांडिस यांचीच भूमिका प्रमुख होती. बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतरचा हा काळ. समाजवादी परिवारातून या भूमिकेवर सतत प्रचंड टीका होत राहिली. मात्र, काँग्रेसच्या परिवारवादाला लोहियावादी विरोध करीत ते एनडीएमध्ये अधिकच घट्ट पाय रोवून उभे राहिले. संरक्षणमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली. भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तरीही, जॉर्ज यांच्या विरोधकांचीही त्यांच्यावर वैयक्तिक भ्रष्टाचाराचे आरोप करण्याची हिंमत झाली नाही. हे जॉर्ज यांच्या राजकीय कमाईचे संचित होते. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत जॉर्ज मुजफ्फरपूरमध्येच पराभूत झाले. त्यानंतर आजारपण व अनेक राजकीय शिष्यांनी फिरवलेली पाठ यातून आलेले एकटेपण याने त्यांना पूर्ण ग्रासून टाकले. एकेकाळी संपूर्ण देशातील तमाम तरुण-तरुणींचे हिरो असलेले जॉर्ज गेली अनेक वर्षे आजारपणाने खाटेला खिळले होते. एखाद्या ग्रीक शोकांतिकेतील नायकासारखी त्यांची अखेर झाली. असे जॉर्ज सहज जन्म घेत नाहीत. परिस्थिती, तत्त्वज्ञान व अपरिमित त्याग यातून ते निर्माण होतात. त्यांच्या साथींना आता 'साथी जॉर्ज फर्नांडिस झिंदाबाद' ही घोषणा देता येणार नाही. मात्र, देशातील कामगार व शोषितांसाठी लढण्याचा जो मार्ग त्यांनी दाखवला, त्यावर अविरत चालत राहण्याची ऊर्जा जॉर्ज यांच्या आभाळाएवढ्या कर्तृत्वातून मिळतच राहील..
George Fernandes: चिरतरुण महानायक
जॉर्ज फर्नांडिस या नावाला देशभरात जी प्रचंड लोकप्रियता लाभली ती धर्म, जात, भाषा या सगळ्यांचा पलीकडची होती. दक्षिण कन्नड प्रांतातून नशीब काढायला मुंबईत आलेला हा तरुण, समाजवाद्यांच्या कामगार चळवळीत ओढला जातो काय आणि हा हा म्हणता 'मुंबई बंद'चा हुकमी एक्का बनतो काय!
महाराष्ट्र टाइम्स 30 Jan 2019, 8:26 am