बरीच मेहनत घेऊन एखाद्याने पत्त्यांचा छान बंगला उभारावा आणि शेवटचे दोन पत्ते लावतानाच सगळा बंगला कोसळावा, अशी अवस्था वनडे वर्ल्डकपमध्ये भारतीय क्रिकेट संघाची झाली. रोहित शर्माची शतकांची मालिका, दमदार गोलंदाजी, नऊपैकी सात सामन्यांत विजय आणि पहिल्या चार संघांत अव्वलस्थान असा भारताचा पाया इतका भक्कम होता की, वर्ल्डकप विजेतेपद ही फक्त औपचारिकता उरली असल्याचा भास व्हावा. पण उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून भारताला १८ धावांनी चुटपूट लावणारा पराभव पत्करावा लागला. भारताचे एक मोठे स्वप्न क्षणार्धात भंगले. उपांत्य फेरीत न्यूझीलंडने ठेवलेले २४० धावांचे आव्हान तसे मोठे नव्हते, पण रोहित शर्मा, के.एल. राहुल आणि कर्णधार विराट तिघेही अवघी एकेक धाव काढून माघारी परतल्यानंतर हीच धावसंख्या डोंगराएवढी वाटू लागली. ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या या मधल्या फळीनेही निराशाजनक कामगिरी केल्याने ६ बाद ९२ अशी अवस्था झाली. टीम इंडियाचा शंभरपेक्षा अधिक धावांनी पराभव होतो की काय अशी शंका फेर धरू लागली. पण रवींद्र जाडेजाने केलेली ७७ धावांची झुंजार खेळी विजयाचे अधुरे स्वप्न दाखवून गेली. हाच जाडेजा संपूर्ण स्पर्धेत फक्त याआधीच्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात काय तो खेळला! त्यावेळीही फलंदाजी त्याच्या नशिबी नव्हती. अशा या राखीव खेळाडूने उपांत्य सामन्याच्या राखीव दिवशी जिगरबाज खेळी खेळावी हा योगायोग. मात्र तो बाद झाला आणि पाठोपाठ धोनीही धावचीत झाल्यानंतर भारताच्या विश्वविजयाच्या स्वप्नांच्या ठिकऱ्या उडाल्या.
खेळ म्हटला की, हारजीत ही ठरलेली. त्या अर्थाने हा पराभव भारतीय चाहत्यांना कितीही वेदना देणारा असला तरी तो खेळाचा एक भाग आहे. कोणत्याही बलाढ्य संघाला अशा परिस्थितीला कधी ना कधी सामोरे जावेच लागते. पण या संपूर्ण स्पर्धेत खऱ्या अर्थाने भारतीय फलंदाजीचा असा कस लागला नाही. त्यामुळे आपल्या खेळातील कमकुवत दुवे लक्षात आले नाहीत. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, वेस्ट इंडिज अशा संघांना एकापाठोपाठ एक पराभूत केल्यानंतर तर वर्ल्डकप विजेतेपद सहजसाध्य असल्याचा डौल भारतीय खेळाडूंच्या चालीत दिसू लागला होता. न्यूझीलंडविरुद्ध पावसामुळे वाया गेलेली लढत कदाचित भारताच्या या पराभवातील एक महत्त्वाचा घटक असावा. त्यावेळी न्यूझीलंडची बलस्थाने, कमकुवत मुद्दे आपल्या लक्षात येऊ शकले नाहीत. कदाचित त्याचा फायदा उपांत्य फेरीत होऊ शकला असता. शिवाय, उपांत्य फेरीत जाडेजा आणि धोनी यांनी जो संघर्ष केला, तशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना आपल्याला इतर लढतीत करावा लागला नाही. त्याचा फटका बसला. भुवनेश्वर, मोहम्मद शमी, जसप्रीत बूमराह या गोलंदाजांचे मात्र कौतुक करावे तेवढे थोडे आहे. मिळालेल्या संधीचे या प्रत्येकाने सोने केले.
वर्ल्डकपमधील मोहिमेला आणखी एक कंगोरा आहे तो संघनिवडीचा. वर्ल्डकपसाठी झालेल्या संघनिवडीपासून हा मुद्दा गाजला. ऋषभ पंतसारख्या खेळाडूला अंतिम १५ खेळाडूंत स्थानच देण्यात आले नाही. हाच खेळाडू पुढे जाऊन उपांत्य फेरीपर्यंत जवळपास चार सामन्यांत चौथ्या क्रमांकावर खेळला. मग त्याची आधीच का निवड झाली नाही, हे अनाकलनीय आहे. रवींद्र जाडेजाने उपांत्य फेरीत ७७ धावांची चिवट खेळी केली. तो या सामन्याचा हिरोच बनणार होता, पण अशा खेळाडूला आपण थेट साखळीतील आठव्या सामन्यात खेळविले. त्याची आपल्याला गरजच भासली नाही. केवळ फलंदाजीच नव्हे तर क्षेत्ररक्षणातही त्याने लक्षणीय कामगिरी केली. हा खेळाडू साखळीत दुर्लक्षित राहिला. शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यानंतर मधल्या फळीतील पंतला पाचारण केले गेले, तर विजय शंकरला दुखापत झाल्यावर सलामीवीर मयांक अगरवालला संघात स्थान दिले गेले. संघात एकाचवेळी तीन यष्टिरक्षक खेळविले गेले. जर चौथ्या क्रमांकासाठी योग्य फलंदाज हवा होता तर अजिंक्य रहाणेसारख्या अनुभवी खेळाडूला संधी का दिली नाही? असे अनेक मुद्दे अनुत्तरित आहेत. महेंद्रसिंग धोनीसाठी मात्र हा वर्ल्डकप महत्त्वाचा होता. त्याच्या अनुभवाचा मोठा फायदा संघाला निश्चितच झाला. विराटला मार्गदर्शन करण्यात धोनीने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला वर्ल्डकप विजयाची भेट देण्याची संधी मात्र हुकली. धोनी उपांत्य लढतीत धावचीत झाला तेव्हाच ती संधी आपण गमावली. विजय निसटला असला तरी अखेरच्या लढतीत टीम इंडियाने चिवट झुंज दिली, हेच काय ते समाधान!
खेळ म्हटला की, हारजीत ही ठरलेली. त्या अर्थाने हा पराभव भारतीय चाहत्यांना कितीही वेदना देणारा असला तरी तो खेळाचा एक भाग आहे. कोणत्याही बलाढ्य संघाला अशा परिस्थितीला कधी ना कधी सामोरे जावेच लागते. पण या संपूर्ण स्पर्धेत खऱ्या अर्थाने भारतीय फलंदाजीचा असा कस लागला नाही. त्यामुळे आपल्या खेळातील कमकुवत दुवे लक्षात आले नाहीत. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, वेस्ट इंडिज अशा संघांना एकापाठोपाठ एक पराभूत केल्यानंतर तर वर्ल्डकप विजेतेपद सहजसाध्य असल्याचा डौल भारतीय खेळाडूंच्या चालीत दिसू लागला होता. न्यूझीलंडविरुद्ध पावसामुळे वाया गेलेली लढत कदाचित भारताच्या या पराभवातील एक महत्त्वाचा घटक असावा. त्यावेळी न्यूझीलंडची बलस्थाने, कमकुवत मुद्दे आपल्या लक्षात येऊ शकले नाहीत. कदाचित त्याचा फायदा उपांत्य फेरीत होऊ शकला असता. शिवाय, उपांत्य फेरीत जाडेजा आणि धोनी यांनी जो संघर्ष केला, तशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना आपल्याला इतर लढतीत करावा लागला नाही. त्याचा फटका बसला. भुवनेश्वर, मोहम्मद शमी, जसप्रीत बूमराह या गोलंदाजांचे मात्र कौतुक करावे तेवढे थोडे आहे. मिळालेल्या संधीचे या प्रत्येकाने सोने केले.
वर्ल्डकपमधील मोहिमेला आणखी एक कंगोरा आहे तो संघनिवडीचा. वर्ल्डकपसाठी झालेल्या संघनिवडीपासून हा मुद्दा गाजला. ऋषभ पंतसारख्या खेळाडूला अंतिम १५ खेळाडूंत स्थानच देण्यात आले नाही. हाच खेळाडू पुढे जाऊन उपांत्य फेरीपर्यंत जवळपास चार सामन्यांत चौथ्या क्रमांकावर खेळला. मग त्याची आधीच का निवड झाली नाही, हे अनाकलनीय आहे. रवींद्र जाडेजाने उपांत्य फेरीत ७७ धावांची चिवट खेळी केली. तो या सामन्याचा हिरोच बनणार होता, पण अशा खेळाडूला आपण थेट साखळीतील आठव्या सामन्यात खेळविले. त्याची आपल्याला गरजच भासली नाही. केवळ फलंदाजीच नव्हे तर क्षेत्ररक्षणातही त्याने लक्षणीय कामगिरी केली. हा खेळाडू साखळीत दुर्लक्षित राहिला. शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यानंतर मधल्या फळीतील पंतला पाचारण केले गेले, तर विजय शंकरला दुखापत झाल्यावर सलामीवीर मयांक अगरवालला संघात स्थान दिले गेले. संघात एकाचवेळी तीन यष्टिरक्षक खेळविले गेले. जर चौथ्या क्रमांकासाठी योग्य फलंदाज हवा होता तर अजिंक्य रहाणेसारख्या अनुभवी खेळाडूला संधी का दिली नाही? असे अनेक मुद्दे अनुत्तरित आहेत. महेंद्रसिंग धोनीसाठी मात्र हा वर्ल्डकप महत्त्वाचा होता. त्याच्या अनुभवाचा मोठा फायदा संघाला निश्चितच झाला. विराटला मार्गदर्शन करण्यात धोनीने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला वर्ल्डकप विजयाची भेट देण्याची संधी मात्र हुकली. धोनी उपांत्य लढतीत धावचीत झाला तेव्हाच ती संधी आपण गमावली. विजय निसटला असला तरी अखेरच्या लढतीत टीम इंडियाने चिवट झुंज दिली, हेच काय ते समाधान!