अ‍ॅपशहर

नवा इतिहास!

एकाचवेळी २० उपग्रह प्रक्षेपित करण्याचा स्वत:चाच विक्रम मोडीत काढत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी एकाचवेळी १०४ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करत केवळ एक नवा इतिहास घडविला नाही तर अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत जगाच्या चार पावले पुढे असल्याचे सिद्ध केले आहे.

Maharashtra Times 16 Feb 2017, 12:00 am
एकाचवेळी २० उपग्रह प्रक्षेपित करण्याचा स्वत:चाच विक्रम मोडीत काढत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी एकाचवेळी १०४ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करत केवळ एक नवा इतिहास घडविला नाही तर अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत जगाच्या चार पावले पुढे असल्याचे सिद्ध केले आहे. त्याबद्दल संस्थेचे संचालक जयकुमार, वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि सर्व सहाय्यक चमूचे अभिनंदन करावे तितके थोडे आहे. यापूर्वी एकाच उड्डाणातून अमेरिकेच्या नासाने तसेच रशियाने चाळीसपेक्षा अधिक उपग्रह अंतराळात पाठवलेले नाहीत. त्यामुळे, १०४ उपग्रह अवकाशात सोडण्यात यश मिळाल्याने ‘इस्रो’ने जगातील प्रमुख आणि विकसित देशांना मागे टाकले आहे. यापैकी, १०१ उपग्रह हे परदेशी असून पृथ्वीचे सखोल आणि सर्वांगीण आकलन होण्यासाठी मदत करणारे आहेत. याचबरोबर परदेशी उपग्रह अंतराळात सोडण्यातही ‘इस्रो’ने १८० इतका मोठा आकडा गाठून अंतराळ मोहिमांच्या इतिहासातील आणखी एक उज्ज्वल अध्याय लिहिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम isro history satellite
नवा इतिहास!


एकाच उड्डाणातून अधिकाधिक उपग्रह वाहून नेल्यास प्रत्येक उपग्रहामागील उड्डाणाचा खर्च खूप कमी होतो. त्यामुळे जगभरातील अंतराळसंस्था आणि कंपन्यांचे या प्रक्षेपणाकडे विशेष लक्ष होते. इस्रोच्या आंध्रमधील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून स्वदेशी बनावटीचा "पीएसएलव्ही-सी ३७" हा प्रक्षेपक सकाळी नऊ वाजून २८ मिनिटांनी आकाशात झेपावला आणि उड्डाणापासून ते उपग्रह वेगळे होण्यापर्यंत, तसेच अंतराळात सूर्यसापेक्ष कक्षेत भूस्थिर करण्यापर्यंच्या सर्व घडामोडी घड्याळाच्या काट्यागणिक नेमक्या पार पडल्या. एकीकडे संपूर्ण भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून येत असतानाच अवघ्या जगाने तोंडात बोटे घालत या घटनेची नोंद घेतली. यापूर्वी, इस्त्रोने एकाचवेळी २० उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले होते.

जानेवारीत एकाचवेळी ८३ उपग्रह सोडण्याचा इरादा होता. मात्र, काही कारणास्तव ती मोहीम पुढे गेली. त्यानंतर त्यात आणखी २१ उपग्रहांची भर पडली. अंतराळ संशोधन क्षेत्रात भारत विकसित देशांपेक्षा मागे तर सोडाच, उलट चार पावले पुढे असल्याचे इस्रोने दाखवून दिले. भारताचे हे यश जगाच्या हिताचे आहे. इस्रोने एकीकडे गेल्या काही दशकांत झालेल्या तंत्रवैज्ञानिक प्रगतीचा वस्तुपाठ जगाला सादर केला, त्याचबरोबर आर्थिक अडचणींवर सोपे मार्ग काढत कमी खर्चात मोहीम यशस्वी करून दाखवली. इस्रोने दोनच वर्षांपूर्वी मंगळयानाची मोहीम जगापेक्षा निम्म्याहून कमी खर्चात फत्ते केली होती. हा सारा पाया या संस्थेला लाभलेल्या दिग्गज पूर्वसूरींनी घालून दिला आहे. १९७४च्या पहिल्या अणुचाचणीनंतर देशावर घातलेल्या निर्बंधांत तंत्रज्ञानविषयक निर्बंधही होते. मर्यादित साधनसंपत्तीचे आव्हान तर सुरुवातीपासूनच होते. त्यामुळे १९८०मध्ये पहिला उपग्रह बैलगाडीतून आणण्यापासून विविध मार्गांनी खर्चात कपात करत करत वैज्ञानिक प्रगतीसाठी नवीन मार्ग शोधण्याची परंपरा आजही अप्रतिहत सुरू आहे. म्हणूनच अमेरिकेच्या नासापेक्षा वीसपट कमी निधी असूनही इस्रोने खूप पुढचे पाऊल टाकले आहे. यापुढे जगातील तीनशे अब्ज डॉलर्सच्या या अंतराळ विज्ञान बाजारपेठेतील भारताचा हिस्सा वाढत राहील आणि इस्रोची चढती कमान जगाच्या भुवया उंचावत ठेवेल, यात काहीच शंका नाही!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज