सुरेखा सबनीस
अंदमान! काळेपाणी. स्वातंत्र्यवीर सावरकर. निसर्गरम्य पर्यटनस्थळ. अंदमान सर्वपरिचित आहे ते इतकेच. मोजके अभ्यासक सोडता बहुतेकांना यापलीकडे अंदमानची सर्वांगीण आणि नेमकी ओळख नाही. ती करून देण्याचे मोलाचे काम मधु आडेलकर यांच्या ‘क्रांतितीर्थ’ या पुस्तकाने केले आहे. ही ओळख अभ्यासपूर्ण आहे आणि वेधकही आहे. इतिहासाला जागून पटविलेली आहे. घटना-प्रसंगांची नाट्यमयता राखून घडविलेली आहे. आपल्या आयुष्याची सुमारे साठ वर्षे निरलसपणे समाजकार्य करणाऱ्या मधुकर आडेलकर यांच्या ध्यासातून आकाराला आलेले हे लेखन आहे. १८५७च्या उठावापासून पुढे स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत ‘काळेपाणी’ भोगण्यासाठी गेलेल्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे ऋण मान्य करण्यासाठी केलेला हा ग्रंथप्रपंच आहे. संशोधकाची चिकाटी, इतिहासाचे भान आणि वृत्तीतील मनस्वीपण जपत वयाच्या ८२व्या वर्षी आडेलकरांनी सिद्ध केलेले पुस्तक म्हणजे ‘क्रांतितीर्थ’. पाच वेळा अंदमानचे अभ्यासदौरे, त्यात अनेक बेटांवर प्रत्यक्ष जाऊन केलेले अवलोकन, व्यक्तिगत मुलाखती, संदर्भग्रंथांचा आधार, सेल्युलर जेलचे ‘दप्तर’, अन्य प्रकाशित माहिती अशा शक्य तेवढ्या उपलब्ध साधनांचा वापर करून आडेलकरांनी वस्तुनिष्ठ लेखन वाचकांसमोर ठेवले आहे.
अंदमान बेटांचे नैसर्गिक रूप, भौगोलिक स्थान, तेथील सात आदिवासी जमाती आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण जीवनपद्धती, एका अपघातानेच ब्रिटिशांना लागलेला अंदमानचा शोध, अंदमानला मिळालेली ‘काळेपाणी’ ही ओळख, भारतीय राजबंद्यांना या काळ्यापाण्यावर पाठवून ब्रिटिशांनी त्यांच्यावर केलेले अनन्वित अत्याचार, ‘खुले तुरुंग’, ‘सेल्युलर जेल’ आदी तपशिलवार माहिती ‘क्रांतितीर्थ’मध्ये दिलेली आहे. तारीख-वार, स्थळ-काळ यांची शक्य तेवढी आणि अचूक नोंद यात आहेच, प्रसंगी कोष्टकरूपाने मांडणी करून कोणता राजबंदी कोणत्या खटल्यासंदर्भात अंदमानात पाठवला गेला त्याची नावा-गावासह, जाती-पातीच्या उल्लेखांसह केलेली वस्तुनिष्ठ नोंदही आहे. हे सारे मांडताना आडेलकरांना अधोरेखित करावयाचे आहे ते, १८५७च्या उठावापासून भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतच्या प्रत्येक लढ्यात सारेच हिंदुस्थानी सामील झाले होते. हिंदू-मुसलमान, ब्राह्मण-भिल्ल, उत्तर भारतीय-दक्षिण भारतीय असे सारेच! यात लढवय्ये शिपाई होतेच, कुणी नबाबही होते. कवी, पत्रकार, शिक्षक, कामगार… सारेच केवळ हिंदुस्थानी होते आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी असह्य बंदिवास भोगत होते.
या बंदिवासाची तेथील दैनंदिन जीवनाची - खरे तर मरणयातनांची! - वर्णने अंगावर शहारे आणणारी आहेत. राजबंद्यांचे तुरुंगात झालेले भीषण मृत्यू, त्यांच्या प्रेतांची विल्हेवाट लावण्यामागची तुच्छता, तुरुंगातून पळून जाऊ पाहणाऱ्यांना भोगाव्या लागणाऱ्या निर्घृण शिक्षा, पळून जाऊ शकलेले मात्र पुढे निसर्ग-प्रकोपाचे किंवा आदिवासी-हल्ल्यांचे ठरलेले केविलवाणे बळी अशा अनेक मरणयातनांची चित्रणे आडेलकरांनी जिवंतपणे उभी केली आहेत. ‘नग्नठेप’ हे प्रकरण तर थक्क करणारेच. एखाद्या चित्रपटात शोभावे असेच.
‘क्रांतितीर्थ’मधील एकूण तीन प्रकरणांत स्त्रियांसंदर्भातील लेखन आहे. यांत ‘नग्नठेप’मधील वैशिष्ट्यपूर्ण मुक्त जीवन जगणाऱ्या प्रसंगी परित्यक्ता स्त्रीवरील अन्याय दूर करण्यासाठी निदर्शने करणाऱ्या एकोणिसाव्या शतकातील अंदमानातील आदिवासी स्त्रिया आहेत तशाच बंदिवान म्हणून नेलेल्या भारतीय मूळ भूमीवरील स्त्रियाही आहेत. हातून अजाणतेपणी किंवा असाहाय्यतेपोटी खून घडलेल्या जीवनी, कर्मा, लक्ष्मी यांसारख्या स्त्रिया आहेत. अशाच झकूरन या कैदी नं. ३३७८च्या नेतृत्वाखाली, रॉसआयलंडजवळ बुडणाऱ्या ‘एन्टरप्राइज’ जहाजावरील सर्व खलाशांचे प्राण वाचविण्याची या बंदिवान स्त्रियांची कृतीही खासच! तशीच एक सत्यकथा पुढे ‘नानकौदी बेटाची राणी’ ठरलेल्या इसलॉन या तरुण मुलीची.
मधु आडेलकरांनी अशा कित्येक ज्ञात-अज्ञात घटनांचे अभ्यासपूर्ण तपशील दिले आहेत. काही संक्षिप्त, काही विस्तृत. सावरकरांची सुटका करण्याचा चंपकरामन पिल्ले यांचा अयशस्वी प्रयत्न, भाई परमोनंद यांनी क्रूर जेलर बारीवर केलेला हल्ला, ‘स्वराज्य’ या उर्दू साप्ताहिकाचे संपादक नंद गोपाळ यांनी राजबंद्यांसाठी पुकारलेला हरताळ, अठरा वर्षांच्या नानी गोपाळचे पंचेचाळीस दिवसांचे उपोषण… असे बरेच काही!
‘अंदमान’ संदर्भातील ब्रिटिश सरकारची वेळोवेळीची धोरणे, दुसऱ्या महायुद्धकाळात जपानने अंदमानवर मिळविलेला ताबा, सुभाषचंद्र बोस यांचे आगमन आणि काही काळासाठी आझाद हिंद सेनेचे अंदमानवर वर्चस्व, एकोणिसशे सत्तेचाळीसमध्ये ब्रिटिश इंडिया मंत्री पॅट्रिक लॉरेन्स यांनी अंदमान-निकोबार गिळंकृत करण्याचा आखलेला, मात्र पंडित नेहरू व सरदार पटेल यांच्या जागरूकतेने आणि व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या आग्रही भूमिकेमुळे बारगळलेला डाव, असे अनेक अनेक संदर्भ वाचकांना विचार प्रवृत्त करणारे ठरतात.
हे पुस्तक परिश्रमपूर्वक अभ्यासावर, सखोल माहितीवर आणि इतिहासाची प्रमाणभूतता राखून सिद्ध झालेले असले तरी मांडणीच्या दृष्टीने ते इतिहासाचे पुस्तक ठरत नाही. एका विवेकनिष्ठ अभ्यासकाने मनस्वी ध्यासातून केलेले हे लेखन आहे. त्याला केवळ संशोधनपर ग्रंथलेखनाच्या मोजपट्ट्या लावणे गैर ठरेल. म्हणूनच क्वचित पुनरावृत्ती आणि मांडणीतील असमतोलाच्या काही जागा दुर्लक्षून, आडेलकर इतिहास-कथनच करीत आहेत हे नाकारता येत नाही.
क्रांतितीर्थ लेखकाचं नाव : मधु आडेलकर
प्रकाशक : शहीद प्रकाशन
पृष्ठं : २२०
किंमत : २५०रु.
अंदमान! काळेपाणी. स्वातंत्र्यवीर सावरकर. निसर्गरम्य पर्यटनस्थळ. अंदमान सर्वपरिचित आहे ते इतकेच. मोजके अभ्यासक सोडता बहुतेकांना यापलीकडे अंदमानची सर्वांगीण आणि नेमकी ओळख नाही. ती करून देण्याचे मोलाचे काम मधु आडेलकर यांच्या ‘क्रांतितीर्थ’ या पुस्तकाने केले आहे. ही ओळख अभ्यासपूर्ण आहे आणि वेधकही आहे. इतिहासाला जागून पटविलेली आहे. घटना-प्रसंगांची नाट्यमयता राखून घडविलेली आहे. आपल्या आयुष्याची सुमारे साठ वर्षे निरलसपणे समाजकार्य करणाऱ्या मधुकर आडेलकर यांच्या ध्यासातून आकाराला आलेले हे लेखन आहे. १८५७च्या उठावापासून पुढे स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत ‘काळेपाणी’ भोगण्यासाठी गेलेल्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे ऋण मान्य करण्यासाठी केलेला हा ग्रंथप्रपंच आहे. संशोधकाची चिकाटी, इतिहासाचे भान आणि वृत्तीतील मनस्वीपण जपत वयाच्या ८२व्या वर्षी आडेलकरांनी सिद्ध केलेले पुस्तक म्हणजे ‘क्रांतितीर्थ’. पाच वेळा अंदमानचे अभ्यासदौरे, त्यात अनेक बेटांवर प्रत्यक्ष जाऊन केलेले अवलोकन, व्यक्तिगत मुलाखती, संदर्भग्रंथांचा आधार, सेल्युलर जेलचे ‘दप्तर’, अन्य प्रकाशित माहिती अशा शक्य तेवढ्या उपलब्ध साधनांचा वापर करून आडेलकरांनी वस्तुनिष्ठ लेखन वाचकांसमोर ठेवले आहे.
अंदमान बेटांचे नैसर्गिक रूप, भौगोलिक स्थान, तेथील सात आदिवासी जमाती आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण जीवनपद्धती, एका अपघातानेच ब्रिटिशांना लागलेला अंदमानचा शोध, अंदमानला मिळालेली ‘काळेपाणी’ ही ओळख, भारतीय राजबंद्यांना या काळ्यापाण्यावर पाठवून ब्रिटिशांनी त्यांच्यावर केलेले अनन्वित अत्याचार, ‘खुले तुरुंग’, ‘सेल्युलर जेल’ आदी तपशिलवार माहिती ‘क्रांतितीर्थ’मध्ये दिलेली आहे. तारीख-वार, स्थळ-काळ यांची शक्य तेवढी आणि अचूक नोंद यात आहेच, प्रसंगी कोष्टकरूपाने मांडणी करून कोणता राजबंदी कोणत्या खटल्यासंदर्भात अंदमानात पाठवला गेला त्याची नावा-गावासह, जाती-पातीच्या उल्लेखांसह केलेली वस्तुनिष्ठ नोंदही आहे. हे सारे मांडताना आडेलकरांना अधोरेखित करावयाचे आहे ते, १८५७च्या उठावापासून भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतच्या प्रत्येक लढ्यात सारेच हिंदुस्थानी सामील झाले होते. हिंदू-मुसलमान, ब्राह्मण-भिल्ल, उत्तर भारतीय-दक्षिण भारतीय असे सारेच! यात लढवय्ये शिपाई होतेच, कुणी नबाबही होते. कवी, पत्रकार, शिक्षक, कामगार… सारेच केवळ हिंदुस्थानी होते आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी असह्य बंदिवास भोगत होते.
या बंदिवासाची तेथील दैनंदिन जीवनाची - खरे तर मरणयातनांची! - वर्णने अंगावर शहारे आणणारी आहेत. राजबंद्यांचे तुरुंगात झालेले भीषण मृत्यू, त्यांच्या प्रेतांची विल्हेवाट लावण्यामागची तुच्छता, तुरुंगातून पळून जाऊ पाहणाऱ्यांना भोगाव्या लागणाऱ्या निर्घृण शिक्षा, पळून जाऊ शकलेले मात्र पुढे निसर्ग-प्रकोपाचे किंवा आदिवासी-हल्ल्यांचे ठरलेले केविलवाणे बळी अशा अनेक मरणयातनांची चित्रणे आडेलकरांनी जिवंतपणे उभी केली आहेत. ‘नग्नठेप’ हे प्रकरण तर थक्क करणारेच. एखाद्या चित्रपटात शोभावे असेच.
‘क्रांतितीर्थ’मधील एकूण तीन प्रकरणांत स्त्रियांसंदर्भातील लेखन आहे. यांत ‘नग्नठेप’मधील वैशिष्ट्यपूर्ण मुक्त जीवन जगणाऱ्या प्रसंगी परित्यक्ता स्त्रीवरील अन्याय दूर करण्यासाठी निदर्शने करणाऱ्या एकोणिसाव्या शतकातील अंदमानातील आदिवासी स्त्रिया आहेत तशाच बंदिवान म्हणून नेलेल्या भारतीय मूळ भूमीवरील स्त्रियाही आहेत. हातून अजाणतेपणी किंवा असाहाय्यतेपोटी खून घडलेल्या जीवनी, कर्मा, लक्ष्मी यांसारख्या स्त्रिया आहेत. अशाच झकूरन या कैदी नं. ३३७८च्या नेतृत्वाखाली, रॉसआयलंडजवळ बुडणाऱ्या ‘एन्टरप्राइज’ जहाजावरील सर्व खलाशांचे प्राण वाचविण्याची या बंदिवान स्त्रियांची कृतीही खासच! तशीच एक सत्यकथा पुढे ‘नानकौदी बेटाची राणी’ ठरलेल्या इसलॉन या तरुण मुलीची.
मधु आडेलकरांनी अशा कित्येक ज्ञात-अज्ञात घटनांचे अभ्यासपूर्ण तपशील दिले आहेत. काही संक्षिप्त, काही विस्तृत. सावरकरांची सुटका करण्याचा चंपकरामन पिल्ले यांचा अयशस्वी प्रयत्न, भाई परमोनंद यांनी क्रूर जेलर बारीवर केलेला हल्ला, ‘स्वराज्य’ या उर्दू साप्ताहिकाचे संपादक नंद गोपाळ यांनी राजबंद्यांसाठी पुकारलेला हरताळ, अठरा वर्षांच्या नानी गोपाळचे पंचेचाळीस दिवसांचे उपोषण… असे बरेच काही!
‘अंदमान’ संदर्भातील ब्रिटिश सरकारची वेळोवेळीची धोरणे, दुसऱ्या महायुद्धकाळात जपानने अंदमानवर मिळविलेला ताबा, सुभाषचंद्र बोस यांचे आगमन आणि काही काळासाठी आझाद हिंद सेनेचे अंदमानवर वर्चस्व, एकोणिसशे सत्तेचाळीसमध्ये ब्रिटिश इंडिया मंत्री पॅट्रिक लॉरेन्स यांनी अंदमान-निकोबार गिळंकृत करण्याचा आखलेला, मात्र पंडित नेहरू व सरदार पटेल यांच्या जागरूकतेने आणि व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या आग्रही भूमिकेमुळे बारगळलेला डाव, असे अनेक अनेक संदर्भ वाचकांना विचार प्रवृत्त करणारे ठरतात.
हे पुस्तक परिश्रमपूर्वक अभ्यासावर, सखोल माहितीवर आणि इतिहासाची प्रमाणभूतता राखून सिद्ध झालेले असले तरी मांडणीच्या दृष्टीने ते इतिहासाचे पुस्तक ठरत नाही. एका विवेकनिष्ठ अभ्यासकाने मनस्वी ध्यासातून केलेले हे लेखन आहे. त्याला केवळ संशोधनपर ग्रंथलेखनाच्या मोजपट्ट्या लावणे गैर ठरेल. म्हणूनच क्वचित पुनरावृत्ती आणि मांडणीतील असमतोलाच्या काही जागा दुर्लक्षून, आडेलकर इतिहास-कथनच करीत आहेत हे नाकारता येत नाही.
क्रांतितीर्थ लेखकाचं नाव : मधु आडेलकर
प्रकाशक : शहीद प्रकाशन
पृष्ठं : २२०
किंमत : २५०रु.