गजानन परब यांचा नुकताच प्रकाशित झालेला ‘दे मार’ हा कथासंग्रह म्हणजे विविध विषयांवरच्या कथांचा एक कॅलिडोस्कोप म्हणता येईल. सामान्य माणसांच्या जीवनातील आशा-निराशा, यशापयश, स्वप्नं आणि भ्रमनिरास व या साऱ्यांच्या पलीकडची अतर्क्य नियती अशी बहुपेडी आशयसूत्रे परब यांनी प्रस्तुत कथेत हाताळली आहेत. माणसाच्या मनात अव्याहत सुरू असलेले विभ्रम टिपण्याची लेखकाची मातब्बरी यातल्या अनेक कथांतून दिसून येते.
मुंबईतली एक जुनी, धोकादायक ठरलेली इमारत खाली करण्यासंबंधीची पालिकेची नोटीस मिळाल्यावर रहिवाशांच्या मनात सुरू झालेली विचारचक्रे, असुरक्षिततेची भावना, पर्यायी व्यवस्था करू न शकणाऱ्यांची हतबल विवशता लेखकानं ‘दुर्घटना’ या कथेत परिणामकारकपणे मांडली आहे.
लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या वाहनांना अपघात झाल्याच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो-वाचतो. ‘अपघात’ या अत्यंत वेधक कथेतल्या भीषण अपघातातून गंगामाय ही एकमेव वृद्धा वाचलेली आहे. हॉस्पिटलमध्ये तिला जशी शुद्ध येते तसं तिला कळायला लागतं की मुलगे, सुना, नातवंडं कुणीही घरात शिल्लक राहिलेलं नाही. तिचाही देह कमरेपासून खाली लुळा पडलेला आहे. तिला वाटतं की आपण जिवंत आहोत हा भासच आहे. आपलं शरीर हा चेंदामेंदा झालेल्या मांसाचा गोळाच उरला आहे.
काही दिवसांनी हा गोळा उचलून भयाण झालेल्या घरात टाकला जाईल – तिथं आपल्याला ‘आजी, आयेSS’ म्हणून कोण पुकारणार? तिला वाटतं नकोच ते जगणं. तिनं सगळी ताकद एकवटून साऱ्या नळ्या, सुया ओरबाडून काढल्या रक्त भळाभळा वाहत असतानाच ती डोळे मिटते. वाचकांच्या मनावर जबरदस्त परिणाम करून जाणारी ही कथा आहे.
अपंग मुलांची सहल देवदर्शनासाठी एका मंदिरात गेली असता तिथल्या पुजाऱ्यांनी
चामड्याचे बूट-पट्टे हातापायात असणाऱ्या या मुलांना चक्क तिथं प्रवेश नाकारला. आश्रमाच्या कार्यकर्त्या लता, सुषमा यांनी बरीच हुज्जत घातली, वादावादी झाली तरीही मंदिर व्यवस्थापनाने त्यांना सक्त मज्जाव केला. गेली पंधरा वर्षे मुलांना श्लोक, प्रार्थना, देवाच्या आरत्या शिकवणाऱ्या लता, सुषमा यांच्या मनातील विषण्णता आणि अस्वस्थता ‘देवदर्शन’मध्ये लेखकानं ताकदीनं मांडली आहे.
‘स्फोट’ या कथेत रंजन चौधरी या अनुभवी व जाणत्या कामगाराने स्फोटक रसायनांचा साठा पहिल्या मजल्यावर न आणता तळमजल्यावर नेण्याची केलेल्या सूचनेकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्याने प्रचंड मोठा स्फोट होऊन बालाजी कंपनीतील चोपन्न कामगारांना मृत्यूला कवटाळावं लागलं. या घटनेचा धक्का त्यातून वाचलेल्या रंजनला बसतो. परिणामी कंपनी सुरू झाली तरी कामावर जाण्याची त्याची मानसिकता नसते. काही दिवसांनी कंपनीकडून कामावर रुजू होण्याची विनंती करणारं मिळालेलं पत्र तो वैफल्यग्रस्त मनानं फाडून टाकतो व पुन्हा आपल्या शेतीच्या कामाला जुंपून घेतो. इथं रंजनची व्यक्तिरेखा ही वाचकाच्या मनावर विलक्षण प्रभाव करून जाते.
एखादा अपघात झाल्यानंतर नुकसानभरपाई मिळण्यासाठी लागणारा कालावधी व व्यावहारिक प्रक्रिया यामुळे माणसं अपघातावेळचं दुःख व संवेदना कशी हरवतात हे एका कथेत मार्मिकपणे आलं आहे. ‘आभाळचांदवा’ ही एक सुंदर कथा आहे. पाण्याच्या टाकीत पडलेल्या एका मुलाची आर्त, करुण हाक जवळच वस्ती असूनही कुणापर्यंत जात नव्हती. पण ती हाक सीता नावाच्या एका चिमुरडीला साद घालत होती. पण ती तिच्या मायबापास घेऊन येऊपर्यंत खूप उशीर झालेला असतो. टाकीतून गेली ४-५ दिवस दिसणाऱ्या गोल आभाळात विसावण्यासाठी तो आधीच निघाला होता...
लेखनाच्या क्षेत्रात आज उदंड पीक आहे. पण कसदार लेखकांची संख्या खूप कमी दिसते. अशाच एका उठाठेवी करणाऱ्या लेखकावर लिहिलेली ‘परिवर्तन’ ही एक मजेशीर, उपहासगर्भ कथा आहे. लेखक आपला तजुर्बा वाढल्याने एक लेखनिक ठेवतो. शेवटी लेखनिकाला, राजीनामा देऊन आपणच लेखक का बनू नये, असं वाटून तो राजीनामा देतो. तेव्हा लेखकाला हा प्रतिस्पर्धी निर्माण होईल, या भीतीने हृदयविकाराचा झटका येतो.
‘चांदणे’ ही एका संज्ञाप्रवाहाच्या लयीत लिहिल्यासारखी वाटते. ‘चांदणे’, ‘दे मार’, ‘संध्याकाळ’ या कथांना रूढ असा कथेचा बाज नसल्याने त्या ललित लेखनाच्या अंगानं जाणाऱ्या आहेत. ‘कमलनयन’, ‘प्रणिता’ या कथाही कसास उतरणाऱ्या आहेत. गंभीर विषयावरच्या यात अनेक उत्तम कथा असूनही केवळ चटपटीत शीर्षक असावं म्हणूनच ‘दे मार’ हे शीर्षक निवडलं असावं असं वाटून जातं.
या पुस्तकातील विविधरंगी कथा रोजच्या मानवी जीवन-व्यवहाराशी निगडित असल्याने त्या वाचकांना रुचतील, भावतील यात शंका वाटत नाही.
‘दे मार’
लेखक : गजानन मेघश्याम परब
प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे
पृष्ठं : १५२, किंमत : १७० रु.
मुंबईतली एक जुनी, धोकादायक ठरलेली इमारत खाली करण्यासंबंधीची पालिकेची नोटीस मिळाल्यावर रहिवाशांच्या मनात सुरू झालेली विचारचक्रे, असुरक्षिततेची भावना, पर्यायी व्यवस्था करू न शकणाऱ्यांची हतबल विवशता लेखकानं ‘दुर्घटना’ या कथेत परिणामकारकपणे मांडली आहे.
लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या वाहनांना अपघात झाल्याच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो-वाचतो. ‘अपघात’ या अत्यंत वेधक कथेतल्या भीषण अपघातातून गंगामाय ही एकमेव वृद्धा वाचलेली आहे. हॉस्पिटलमध्ये तिला जशी शुद्ध येते तसं तिला कळायला लागतं की मुलगे, सुना, नातवंडं कुणीही घरात शिल्लक राहिलेलं नाही. तिचाही देह कमरेपासून खाली लुळा पडलेला आहे. तिला वाटतं की आपण जिवंत आहोत हा भासच आहे. आपलं शरीर हा चेंदामेंदा झालेल्या मांसाचा गोळाच उरला आहे.
काही दिवसांनी हा गोळा उचलून भयाण झालेल्या घरात टाकला जाईल – तिथं आपल्याला ‘आजी, आयेSS’ म्हणून कोण पुकारणार? तिला वाटतं नकोच ते जगणं. तिनं सगळी ताकद एकवटून साऱ्या नळ्या, सुया ओरबाडून काढल्या रक्त भळाभळा वाहत असतानाच ती डोळे मिटते. वाचकांच्या मनावर जबरदस्त परिणाम करून जाणारी ही कथा आहे.
अपंग मुलांची सहल देवदर्शनासाठी एका मंदिरात गेली असता तिथल्या पुजाऱ्यांनी
चामड्याचे बूट-पट्टे हातापायात असणाऱ्या या मुलांना चक्क तिथं प्रवेश नाकारला. आश्रमाच्या कार्यकर्त्या लता, सुषमा यांनी बरीच हुज्जत घातली, वादावादी झाली तरीही मंदिर व्यवस्थापनाने त्यांना सक्त मज्जाव केला. गेली पंधरा वर्षे मुलांना श्लोक, प्रार्थना, देवाच्या आरत्या शिकवणाऱ्या लता, सुषमा यांच्या मनातील विषण्णता आणि अस्वस्थता ‘देवदर्शन’मध्ये लेखकानं ताकदीनं मांडली आहे.
‘स्फोट’ या कथेत रंजन चौधरी या अनुभवी व जाणत्या कामगाराने स्फोटक रसायनांचा साठा पहिल्या मजल्यावर न आणता तळमजल्यावर नेण्याची केलेल्या सूचनेकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्याने प्रचंड मोठा स्फोट होऊन बालाजी कंपनीतील चोपन्न कामगारांना मृत्यूला कवटाळावं लागलं. या घटनेचा धक्का त्यातून वाचलेल्या रंजनला बसतो. परिणामी कंपनी सुरू झाली तरी कामावर जाण्याची त्याची मानसिकता नसते. काही दिवसांनी कंपनीकडून कामावर रुजू होण्याची विनंती करणारं मिळालेलं पत्र तो वैफल्यग्रस्त मनानं फाडून टाकतो व पुन्हा आपल्या शेतीच्या कामाला जुंपून घेतो. इथं रंजनची व्यक्तिरेखा ही वाचकाच्या मनावर विलक्षण प्रभाव करून जाते.
एखादा अपघात झाल्यानंतर नुकसानभरपाई मिळण्यासाठी लागणारा कालावधी व व्यावहारिक प्रक्रिया यामुळे माणसं अपघातावेळचं दुःख व संवेदना कशी हरवतात हे एका कथेत मार्मिकपणे आलं आहे. ‘आभाळचांदवा’ ही एक सुंदर कथा आहे. पाण्याच्या टाकीत पडलेल्या एका मुलाची आर्त, करुण हाक जवळच वस्ती असूनही कुणापर्यंत जात नव्हती. पण ती हाक सीता नावाच्या एका चिमुरडीला साद घालत होती. पण ती तिच्या मायबापास घेऊन येऊपर्यंत खूप उशीर झालेला असतो. टाकीतून गेली ४-५ दिवस दिसणाऱ्या गोल आभाळात विसावण्यासाठी तो आधीच निघाला होता...
लेखनाच्या क्षेत्रात आज उदंड पीक आहे. पण कसदार लेखकांची संख्या खूप कमी दिसते. अशाच एका उठाठेवी करणाऱ्या लेखकावर लिहिलेली ‘परिवर्तन’ ही एक मजेशीर, उपहासगर्भ कथा आहे. लेखक आपला तजुर्बा वाढल्याने एक लेखनिक ठेवतो. शेवटी लेखनिकाला, राजीनामा देऊन आपणच लेखक का बनू नये, असं वाटून तो राजीनामा देतो. तेव्हा लेखकाला हा प्रतिस्पर्धी निर्माण होईल, या भीतीने हृदयविकाराचा झटका येतो.
‘चांदणे’ ही एका संज्ञाप्रवाहाच्या लयीत लिहिल्यासारखी वाटते. ‘चांदणे’, ‘दे मार’, ‘संध्याकाळ’ या कथांना रूढ असा कथेचा बाज नसल्याने त्या ललित लेखनाच्या अंगानं जाणाऱ्या आहेत. ‘कमलनयन’, ‘प्रणिता’ या कथाही कसास उतरणाऱ्या आहेत. गंभीर विषयावरच्या यात अनेक उत्तम कथा असूनही केवळ चटपटीत शीर्षक असावं म्हणूनच ‘दे मार’ हे शीर्षक निवडलं असावं असं वाटून जातं.
या पुस्तकातील विविधरंगी कथा रोजच्या मानवी जीवन-व्यवहाराशी निगडित असल्याने त्या वाचकांना रुचतील, भावतील यात शंका वाटत नाही.
‘दे मार’
लेखक : गजानन मेघश्याम परब
प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे
पृष्ठं : १५२, किंमत : १७० रु.