अ‍ॅपशहर

धगधगती ज्वाळा

महाश्वेतादेवींच्या मनातली ही धग त्या आता आपल्यात नसल्या, तरी त्यांच्या साहित्याच्या रूपाने धगधगत राहणार आहे.

Maharashtra Times 29 Jul 2016, 4:00 am
एक लंबे अरसे से मेरे भीतर जनजातीय समाज के लिये पीडा की जो ज्वाला धधक रही है, वह मेरी चिता के साथ ही शांत होगी!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mahashweta devi dynapeeth writer death
धगधगती ज्वाळा


नव्वद वर्षांचे पूर्ण आयुष्य जगून काळाच्या पडद्याआड गेलेल्या महाश्वेतादेवींच्या मनातली ही धग त्या आता आपल्यात नसल्या, तरी त्यांच्या साहित्याच्या रूपाने धगधगत राहणार आहे. जगण्याला हेतू असला, की लेखनालाही तो प्राप्त होतोच आणि लेखनाला हेतू असला, की वाचणाऱ्याच्या मनातही प्रश्नांचे लोळ उठत राहतात. तापत्या जगण्याच्या ठिणग्या शब्दरूपाने धुमसत राहतात. असे साहित्य वाचून झाले की, विसरता येत नाही. ते तुमचा ताबा घेते. मेंदूला कामाला लावते आणि हृदयाचे ठोके दुसऱ्याचे जगणे सुसह्य व्हावे यासाठीही पडत राहिले पाहिजेत, अशी जाणीव वाचकाला करून देते. महाश्वेतादेवींच्या लेखनात ही ताकद होती. ती त्यांच्या जगण्यातून आली होती. लेखकीय मनोऱ्यातून बाहेर पडत चारी बाजूंनी लुटल्या गेलेल्या आदिवासी, भटक्याविमुक्तांच्या पाड्यापालांवर ही प्रतिभावंत लेखिका त्यांच्यातली एक बनून वणवणत होती. सर्वसामान्य भारतीयांना त्यांची ठसठशीत ओळख ‘हाजार चुराशीर माँ’मुळे अधिक जवळची होती. नक्षलवादी असे लेबल लावून आयुष्यातून उठवल्या गेलेल्या आदिवासींसाठी त्यांचे काळीज तुटत असे. एका बाजूने सरकारी मुजोरी, दुसऱ्या बाजूने बड्या कंपन्यांचा कचाटा, तिसऱ्या बाजूने बदलत्या जीवनशैलीत फरपटलेली लोकसंस्कृती आणि चौथ्या बाजूने नक्षली कारवायांमुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशा चौफेर मरणप्राय कोंडीत सापडलेल्या आदिवासींच्या त्या जणू ‘आई’च बनल्या. १०८४ क्रमांकाच्या कैद्याचा मृत्यू हा जणू त्यांच्या लेकराचा अंत होता, इतकी आच या कथेत प्रत्ययाला आली. ‘साहित्याला केवळ भाषा, शैली, शिल्प यांच्या कसोटीवर जोखण्याचे मापदंड चूक आहेत, साहित्याचे मूल्यांकन इतिहासाच्या परिप्रेक्ष्यात व्हायला हवे. कोणत्याही लेखकाच्या लेखनाला त्याच्या काळाच्या संदर्भात आणि इतिहासाच्या परिप्रेक्ष्यात पाहिले, तर त्याचे वास्तविक मूल्यांकन होऊ शकणार नाही. मी पुराकथा, पौराणिक चरित्र आणि घटना या वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यात यासाठी लिहिते, की वास्तवात लोककथांमध्ये भूत आणि वर्तमान एका अखंड धारेसारखे प्रवाहित झालेले मला दिसतात...’ असे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. घडून गेलेले आणि घडत असलेले यांचा ताळमेळ घालणाऱ्या या लेखिकेच्या ‘नाती’ या पहिल्या कादंबरीपासून ते अग्निगर्भ, अक्लांत कौरव, अमृत संचय, आदिवासी कथा, कृष्ण द्वादशी, ग्राम बांगला, चोट्टी मुंडा और उस का तीर, जंगल के दावेदार, बनिया बहू, स्त्री पर्व, स्वाहा अशा पुढील कित्येक कादंबऱ्या, कथांमध्ये हा ताळमेळ दिसतो. आ​ज बांगलादेशात असलेल्या ढाक्यात जन्मलेल्या या मातृहृदयी लेखिकेचे वडील मनीष घटक हेही कादंबरीकार होते आणि आई धरित्रीदेवी लेखिका आणि सामाजिक कार्यकर्ती! फाळणीनंतर कोलकात्यात स्थायिक झालेल्या महाश्वेतादेवींच्या विचारांत संकुचित विखार दिसत नाही, तर आपल्याच लोकांकडून ताडन होत असलेल्या वंचित घटकांबद्दलची तीव्र जाणीव प्रखर झालेली दिसते. पद्मविभूषण, रेमन मॅगसेसे, भारतीय ज्ञानपीठ असे मानाचे पुरस्कार लाभलेल्या या कर्त्या लेखिकेला शतशः प्रणाम!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज