मीराबाई चानू आणि पी. व्ही. सिंधू यांच्यापाठोपाठ बॉक्सिंगमध्ये कांस्यपदक मिळवून, लव्हलिना बरगोहाँइने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडविला आहे. उपांत्य फेरीत तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेलीकडून पराभव पत्करावा लागला असला, तरी जगभरातील अव्वल बॉक्सरच्या यादीत स्थान पटकाविण्याच्या तिच्या कामगिरीचे मोल देशासाठी मोठे आहे. विजेंदर कुमार (२००८) आणि मेरी कोम (२०१२) यांच्या पंक्तीत ती जाऊन बसली आहे. लहानपणापासून प्रचंड संघर्ष करून लव्हलिनाने मिळविलेले यश सर्व प्रेरक आहे. आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात तिच्या वडिलांचे छोटे दुकान होते. लहानपणी वडिलांनी आणलेल्या मिठाईच्या कागदावर महान खेळाडू महंमद अली यांचे छायाचित्र पाहून, तिनेही आपल्या कारकीर्दीची स्वप्ने रंगविली. जुळ्या बहिणी लिचा आणि लिमा यांच्याकडे पाहून तिने 'किक बॉक्सिंग' खेळण्यास सुरुवात केली. आर्थिक अडचणींमुळे 'ट्रॅक सूट' किंवा 'डाएट'साठीही तिच्या कुटुंबीयांची ओढाताण होत असे; मात्र तिने हार मानली नाही आणि 'किक बॉक्सिंग'मध्ये पुढे राष्ट्रीय पदकही मिळविले. कारकीर्दीच्या संधी पाहून तिने 'बॉक्सिंग' खेळण्यास सुरुवात केली. नववीत असताना तिचा खेळ पाहून, भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) आसाम प्रादेशिक केंद्रात प्रशिक्षणासाठी निवड झाली. 'इंडियन ओपन बॉक्सिंग चॅम्पियनशिप'स्पर्धेत तिने एक रौप्य आणि एक सुवर्णपदक मिळविले. आशियाई स्पर्धा आणि 'वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप' स्पर्धेतही कांस्यपदक मिळविले. अर्जुन पुरस्काराने तिचा गौरव करण्यात आला आहे. 'मुली काही करू शकत नाहीत,' असे शेरे तिच्याही कानी येत होते; परंतु 'अशी कामगिरी करून दाखवा, की सर्वजण तुम्हाला लक्षात ठेवतील,' असे सांगणाऱ्या आईचे स्वप्न तिने साकार केले आहे. लव्हलिनाच्या यशाला आणखीही कंगोरे आहेत. काही काळापूर्वी क्रिकेटवर केंद्रित झालेल्या साऱ्या क्रीडाविश्वाचे लक्ष आता अन्य खेळांकडे जात असून, त्यामध्येही जागतिक दर्जाचे खेळाडू घडविण्याची भारताची क्षमता सिद्ध होत आहे. त्याबरोबरच अनेक राज्यांतील खेळाडूंच्या या यशोगाथा हे देशात क्रीडासंस्कृती सर्वदूर रुजत असल्याचेही सुचिन्ह मानावे लागेल.