मुंबईचे फलंदाज जम बसवण्यास प्राधान्य देतात, पण श्रेयस अय्यरला पहिल्या चेंडूपासून वर्चस्व गाजवणे आवडते.. पदार्पणाच्या कसोटीत पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक केलेल्या अय्यरची खेळी पाहून प्रवीण अमरे यांच्या या टिपणीची आठवण होते. भारतीय संघासाठी तारणहार ठरताना अय्यरने पन्नासपेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा केल्या. गोलंदाजीवरील वर्चस्व त्याला भावते, हेच त्यातून दिसते. प्रथम श्रेणीत चार हजारांहून जास्त धावा त्याने ८० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने केल्या आहेत. यानंतर कसोटी संघात नसल्याने त्याला काहीसे नैराश्य आले. स्पष्टवक्ता असल्याने तो ते बोलूनही दाखवत होता. धावांचा रतीब घातल्यावरही तो आंतरराष्ट्रीय कसोटीत किती टिकाव धरू शकेल, अशी विचारणा केली जात होती. मात्र, त्याने न्यूझीलंडच्या वेगवान तसेच स्विंग गोलंदाजीवर हुकूमत गाजवत याचे तडाखेबंद उत्तर दिले. करोनामुळे दीर्घकाळ त्याला प्रथम श्रेणी सामन्यांपासून वंचित रहावे लागले. तो केवळ मर्यादित षटकांचेच सामने खेळत होता. मात्र, त्यानंतर त्याने पदार्पणाच्या कसोटीत आततायी आक्रमण टाळले. आपण पांढऱ्या पोषाखात लाल चेंडूचा सामना करीत आहोत, हे तो पुरते जाणून होता. ती जबाबदारी ओळखून त्याने डावास आकार दिला. खरेतर कानपूर मैदानात त्याच्यासाठी असा खेळ नवीन नाही. याच मैदानात चार वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशविरुद्ध मुंबईची अवस्था ५ बाद ५३ झाली होती. घाईघाईत शार्दूल ठाकूरची किट घेऊन अय्यर मैदानात उतरला. त्याने पहिल्या दहा चेंडूंत सहा चौकार मारत सर्वांना धक्का दिला. हे कमी की काय म्हणून त्याने शेरेबाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन्सना बॅटने द्विशतकी प्रत्युत्तर दिले. तो धावांचा रतीब घालत होता. गोलंदाजांवरील वर्चस्व त्याला आयपीएलमधील नेतृत्व देत होते; पण अस्सल क्रिकेट असलेल्या कसोटीतील संधी मात्र दूरच होती. आता त्याने आपण या कसोटी संघात खेळण्यास लायक आहोत, हे दाखवून दिले आहे. विराट कोहलीऐवजी निवड झालेल्या श्रेयसला संघात कायम ठेवण्यासाठी चेतेश्वर पुजारा किंवा अजिंक्य रहाणे यांना कसोटी संघाबाहेर ठेवण्याची सूचना होत आहे. अय्यरचे श्रेय त्यातच आहे.