बापू लिमये हे रंगकर्मींच्या अशा पिढीचे प्रतिनिधी होते ज्यांचा श्वास नाटकावर चालायचा. मस्तकात रंगभूमीचा विचार असायचा आणि कृतीत अखंड प्रयोगशीलतेचा ध्यास असायचा. ते हाडाचे नेपथ्यकार होते आणि त्यांनी ‘नेपथ्याची बखर’ नावाचे पुस्तकच लिहिले होते, ज्यात मराठी रंगभूमीवरील गेल्या १५० वर्षांतील नेपथ्याच्या वाटचालीचा इत्थंभूत इतिहास होता. बापूंना हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचवावासा वाटायचा. केवळ इतिहासच नव्हे तर नेपथ्याचे तंत्र आणि मंत्र नव्या रंगकर्मींना सांगावेसे वाटत. ह्या ध्यासातून त्यांनी ‘गोष्ट नेपथ्याची’ हे तीन भागांतले पुस्तक लिहिले. अनेक नाट्यप्रशिक्षण कार्यशाळांमधून त्यांनी ह्या तंत्रमंत्राचे धडे दिले.
साधे सुती कपडे आणि खांद्याला झोळी अशा अवतारातले बापू जिथे नाटक असेल तिथे जात आणि चाललेल्या गोष्टींचे बारीक अवलोकन करत. ते फार बोलत नसत, परंतु सर्वत्र असत. नव्या रंगकर्मींची राज्य नाट्य स्पर्धेतली नाटके न चुकता बघत. त्यांना सूचना करत. त्यांनी नाटकाच्या दिग्दर्शनापासून अभिनय आणि नेपथ्य-प्रकाश योजनादी तंत्रांच्या हाताळणी पर्यंत सर्व घटकांत रस घेतला. पण नेपथ्यरचनेत ते विशेष रमले. १९६० ते १९७५ ह्या काळात त्यांनी रंगभूमीवर नेपथ्यकार म्हणून आपला ठसा उमटवला. हा काळ मराठीतील राज्य नाट्य स्पर्धांचा बहराचा काळ होता. याच काळात हौशी रंगभूमीवर अनेकानेक प्रयोग झाले आणि प्रायोगिक रंगभूमीने बाळसे घेतले.
डॉ. श्रीराम लागू विजय तेंडुलकरांचे ‘गिधाडे’ हे नाटक दिग्दर्शित करत होते. त्यांनी बापूंकडे या नाटकाच्या नेपथ्याची धुरा सोपवली. ‘गिधाडे’ हे तसे उग्र प्रकृतीचे नाटक. तेंडुलकरांनी त्यात माणसांमधल्या गिधाडांचे दर्शन घडवले होते. बापू लिमयेंनी नाटकातील हिंसक प्रवृत्तीच्या माणसांच्या घरालाच गिधाडांच्या ढोलीचा आकार दिला. घरातील फर्निचर हे ओबड धोबड, वृक्षांच्या कापलेल्या ओंडक्यांप्रमाणे होते. नेपथ्यातला रासवटपणा नाटकाची प्रकृती अधोरेखित करील हे त्यांनी पाहिले. त्यांचे हे अतिवास्तववादी नेपथ्य त्याकाळात खूप गाजले. त्यांनी ‘चक्रावर्त’, ‘गार्बो’, ‘आर्य चाणक्य’ या नाटकांना केलेले नेपथ्य असेच वेगळे ठरले. त्यांनी बाळ कोल्हटकरांच्याही नाटकांचे नेपथ्य केले. ‘सविता दामोदर परांजपे’ ह्या व्यावसायिक नाटकाचे नेपथ्य त्यांनी केले. ‘सं कट्यार काळजात घुसली’ या नाटकाची त्यांनी दोन अंकी रंगावृत्ती तयार केली होती. ते जिथे नोकरी करत त्या मध्य रेल्वेतील कलाकारांसाठी कल्चरल अकादमीची त्यांनी स्थापना केली. निवृत्तीनंतरही त्यांची भ्रमंती थांबली नाही. त्यांना अनेक पुरस्कार आणि मान-सन्मानांनी मिळाले. मात्र नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचे त्यांचे स्वप्न मात्र अधुरेच राहिले.
साधे सुती कपडे आणि खांद्याला झोळी अशा अवतारातले बापू जिथे नाटक असेल तिथे जात आणि चाललेल्या गोष्टींचे बारीक अवलोकन करत. ते फार बोलत नसत, परंतु सर्वत्र असत. नव्या रंगकर्मींची राज्य नाट्य स्पर्धेतली नाटके न चुकता बघत. त्यांना सूचना करत. त्यांनी नाटकाच्या दिग्दर्शनापासून अभिनय आणि नेपथ्य-प्रकाश योजनादी तंत्रांच्या हाताळणी पर्यंत सर्व घटकांत रस घेतला. पण नेपथ्यरचनेत ते विशेष रमले. १९६० ते १९७५ ह्या काळात त्यांनी रंगभूमीवर नेपथ्यकार म्हणून आपला ठसा उमटवला. हा काळ मराठीतील राज्य नाट्य स्पर्धांचा बहराचा काळ होता. याच काळात हौशी रंगभूमीवर अनेकानेक प्रयोग झाले आणि प्रायोगिक रंगभूमीने बाळसे घेतले.
डॉ. श्रीराम लागू विजय तेंडुलकरांचे ‘गिधाडे’ हे नाटक दिग्दर्शित करत होते. त्यांनी बापूंकडे या नाटकाच्या नेपथ्याची धुरा सोपवली. ‘गिधाडे’ हे तसे उग्र प्रकृतीचे नाटक. तेंडुलकरांनी त्यात माणसांमधल्या गिधाडांचे दर्शन घडवले होते. बापू लिमयेंनी नाटकातील हिंसक प्रवृत्तीच्या माणसांच्या घरालाच गिधाडांच्या ढोलीचा आकार दिला. घरातील फर्निचर हे ओबड धोबड, वृक्षांच्या कापलेल्या ओंडक्यांप्रमाणे होते. नेपथ्यातला रासवटपणा नाटकाची प्रकृती अधोरेखित करील हे त्यांनी पाहिले. त्यांचे हे अतिवास्तववादी नेपथ्य त्याकाळात खूप गाजले. त्यांनी ‘चक्रावर्त’, ‘गार्बो’, ‘आर्य चाणक्य’ या नाटकांना केलेले नेपथ्य असेच वेगळे ठरले. त्यांनी बाळ कोल्हटकरांच्याही नाटकांचे नेपथ्य केले. ‘सविता दामोदर परांजपे’ ह्या व्यावसायिक नाटकाचे नेपथ्य त्यांनी केले. ‘सं कट्यार काळजात घुसली’ या नाटकाची त्यांनी दोन अंकी रंगावृत्ती तयार केली होती. ते जिथे नोकरी करत त्या मध्य रेल्वेतील कलाकारांसाठी कल्चरल अकादमीची त्यांनी स्थापना केली. निवृत्तीनंतरही त्यांची भ्रमंती थांबली नाही. त्यांना अनेक पुरस्कार आणि मान-सन्मानांनी मिळाले. मात्र नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचे त्यांचे स्वप्न मात्र अधुरेच राहिले.