भिकू पै आंगले यांच्या निधनाने गोव्यातील शैक्षिणिक, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रातील एक सळसळणारे चैतन्य अस्तास गेले आहे. हयातभर शिक्षक म्हणून वावरत असताना सांस्कृतिक जगतालाही आकार देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९२४ रोजी बोरी येथे झाला. पुढच्या शिक्षणासाठी ते मुंबईत आले आणि नंतर अध्यापनासाठी नाशिकला गेले. तेथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एच.ए.एल. हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे ते प्राचार्य बनले. या काळात त्यांना महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट शिक्षक तसेच पुढे उत्कृष्ट प्राध्यापक पुरस्कारही लाभला. मुंबईत १९४७ साली पहिली रात्रशाळा सुरू करणाऱ्या विद्या विनय सभेचे ते संस्थापक सदस्य होते. नाशिकमध्ये असताना त्यांचा वसंत कानेटकरांशी संबंध आला आणि त्यांनी कानेटकरांना एका संकल्पनेवर गोवा हिंदू असोसिएशनसाठी नाटक लिहिण्यास प्रवृत्त केले. त्याची फलश्रुती म्हणजे "रायगडाला जेव्हा जाग येते" हे नाटक होय. प्राचार्यपदावरून १९८१ साली निवृत्त झाल्यावर ते गोव्यात परतले. त्यावेळी गोव्यात धगधगणाऱ्या कोकणी व मराठी भाषेतील वादात त्यांनी अनेकांचा रोष पत्करूनही मराठीची बाजू लावून धरली. निवृत्ती या शब्दाला त्यांच्या लेखी काहीही महत्व नव्हते. नाटकाला आयुष्यात स्थान देताना शिक्षणाकडे दुर्लक्ष त्यांनी केले नाही. उलट त्याच्या लेखनातही त्यांनी रस घ्यायला सुरुवात केली. "दंश" हे त्यांचे नाटक गोवा तसेच महाराष्ट्रातही गाजले. १९९७ साली पेडणे येथे भरलेल्या गोमंतक नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अनेक नाटकांत भूमिका त्यांनी केल्या. वयाच्या ७६व्या वर्षी पणजीत कला अकादमीत "मानापमान" नाटकात लक्ष्मीधराची भूमिका करून आपल्या अंगावरील नाट्यालंकार कायमचे खाली उतरविले. "स्पर्श होता परिसाचा" या शैक्षणिक आठवणीव्यतिरिक्त त्यांनी "रंगधन", "गोमंतकाची देण", "मागे वळून पाहताना", "मराठीचे ऋण" आदी पुस्तकांचे लेखनही केले. गोव्यातील अनेक अग्रणी शिक्षण संस्थांशी त्यांचा शेवटपर्यंत संबंध राहिला. वयाच्या ९४ व्या वर्षी या जगाचा निरोप घेणाऱ्या भिकू पै आंगले यांनी महाराष्ट्र आणि गोव्यातील सांस्कृतिक जगतात उत्साह भरला. आपल्या हसतमुख व्यक्तित्वाने आणि नित्यनूतन विनोदांनी अवकाश चैतन्यमय ठेवला.
भिकू पै आंगले
भिकू पै आंगले यांच्या निधनाने गोव्यातील शैक्षिणिक, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रातील एक सळसळणारे चैतन्य अस्तास गेले आहे. हयातभर शिक्षक म्हणून वावरत असताना सांस्कृतिक जगतालाही आकार देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९२४ रोजी बोरी येथे झाला. पुढच्या शिक्षणासाठी ते मुंबईत आले आणि नंतर अध्यापनासाठी नाशिकला गेले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Feb 2018, 3:39 am