आपल्या अविश्वसनीय किश्श्यांनी ग्राहकांचे मनोरंजन करणारे, तब्येतीसाठी अधिक खा इथपासून ट्रम्पऐवजी हिलरीला निवडून द्या, असा प्रेमळ दम तथा सल्ला देणारे आणि जेवण संपताना ‘काहीतरी गोड’ ऑर्डर करायलाच हवे, असा आग्रह धरणारे मुंबईतील ‘ब्रिटानिया रेस्तराँ’चे लोकप्रिय मालक बोमन रशीद कोहिनूर यांचे निधन मुंबईच्या सांस्कृतिक विश्वात पोकळी निर्माण करणारे आहे. बुधवारी वयाच्या ९७व्या वर्षी निधान पावलेले बोमन कोहिनूर ग्राहकांशी गप्पा मारणारे, ऑर्डर घेणारे, प्रत्येक टेबलावर बारीक लक्ष असलेले प्रेमळ आजोबा होते. आपल्या वयाचा अंदाज करण्याचे आव्हान देऊन ते आपल्या या जगभर नावाजलेल्या पारशी आणि इराणी खाद्यपदार्थांच्या विख्यात ब्रिटानिया रेस्तराँची भरपूर माहिती देत.
बोमन यांचे वडील रशीद कोहिनूर यांनी १९२३ साली मुंबईत ब्रिटानिया रेस्तराँ उघडले. तेच बोमन यांचे जन्मसाल. अल्पावधीत ते अभिजात पारशी पाककृतीसाठी प्रसिद्ध झाले. तेथे मिळणाऱ्या बेरी पुलाव, पात्रानी मच्छी, सल्ली बोटी आणि धनसाक यासाठी ते प्रसिद्ध झाले आणि आहे. बेरी पुलाव हा ऐंशी सालाच्या आसपास बोमन यांच्या पत्नीने इराणहून परतल्यावर निर्माण केलेल्या रेसिपीनुसार बनला होता. त्यामुळे बोमन नेहमी ग्राहकांना त्याची शिफारस करायचे आणि तो आपल्या दिवंगत पत्नीच्या रेसिपीनुसारच बनवल्याचे सांगत. तेथे मर्यादित प्रमाणात मिळणाऱ्या रासबेरी सोड्याबाबत त्यांच्या कंजुषीचे अनेक किस्से सांगितले जातात. हे पेय आधी फक्त पारशी ग्राहकांसाठी राखून ठेवण्याची त्यांचा आग्रह असल्याने अ-पारशांना ते सढळ हस्ते हा सोडा देत नसत, असे गमतीने म्हटले जायचे. त्यांचे इंग्रज व इंग्रजीवरचे प्रेम इंग्लंडच्या राजघराण्याशी केलेल्या पत्रव्यवहारातूनही सिद्ध होते.
राणी एलिझाबेथ यांनी बोमन यांच्या हस्ताक्षरातील पत्रांना आपल्या हस्ताक्षरात उत्तरे दिली होती. प्रिन्स विल्यम मुंबईत आले होते, तेव्हा त्यांनी बोमन यांना भेटीसाठी खास आमंत्रित केले होते. ‘खाण्याच्या प्रेमापेक्षा मोठे कोणतेही प्रेम नाही,’ अशी केवळ पाटी न लावता, तसे आयुष्य सगळ्यांना जगायला लावणारे बोमन कोहिनूर आता गतकालीन मुंबईच्या आठवणींचा हिस्सा बनले आहेत.
बोमन यांचे वडील रशीद कोहिनूर यांनी १९२३ साली मुंबईत ब्रिटानिया रेस्तराँ उघडले. तेच बोमन यांचे जन्मसाल. अल्पावधीत ते अभिजात पारशी पाककृतीसाठी प्रसिद्ध झाले. तेथे मिळणाऱ्या बेरी पुलाव, पात्रानी मच्छी, सल्ली बोटी आणि धनसाक यासाठी ते प्रसिद्ध झाले आणि आहे. बेरी पुलाव हा ऐंशी सालाच्या आसपास बोमन यांच्या पत्नीने इराणहून परतल्यावर निर्माण केलेल्या रेसिपीनुसार बनला होता. त्यामुळे बोमन नेहमी ग्राहकांना त्याची शिफारस करायचे आणि तो आपल्या दिवंगत पत्नीच्या रेसिपीनुसारच बनवल्याचे सांगत. तेथे मर्यादित प्रमाणात मिळणाऱ्या रासबेरी सोड्याबाबत त्यांच्या कंजुषीचे अनेक किस्से सांगितले जातात. हे पेय आधी फक्त पारशी ग्राहकांसाठी राखून ठेवण्याची त्यांचा आग्रह असल्याने अ-पारशांना ते सढळ हस्ते हा सोडा देत नसत, असे गमतीने म्हटले जायचे. त्यांचे इंग्रज व इंग्रजीवरचे प्रेम इंग्लंडच्या राजघराण्याशी केलेल्या पत्रव्यवहारातूनही सिद्ध होते.
राणी एलिझाबेथ यांनी बोमन यांच्या हस्ताक्षरातील पत्रांना आपल्या हस्ताक्षरात उत्तरे दिली होती. प्रिन्स विल्यम मुंबईत आले होते, तेव्हा त्यांनी बोमन यांना भेटीसाठी खास आमंत्रित केले होते. ‘खाण्याच्या प्रेमापेक्षा मोठे कोणतेही प्रेम नाही,’ अशी केवळ पाटी न लावता, तसे आयुष्य सगळ्यांना जगायला लावणारे बोमन कोहिनूर आता गतकालीन मुंबईच्या आठवणींचा हिस्सा बनले आहेत.