अ‍ॅपशहर

चंद्रकांत देवताले

समुद्राच्या तीरावरील गरम वाळूत एक व्यक्ती बसली आहे. तिला एक हात नाही आणि दुसऱ्या हाताने हातमोजा घालण्याचा प्रयत्न करीत आहे. हृदयाच्या आरपार घुसून मेंदू बधीर करणारे हे शब्द आहेत कविवर्य चंद्रकांत देवताले यांचे.

Maharashtra Times 19 Aug 2017, 4:00 am
समुद्राच्या तीरावरील गरम वाळूत एक व्यक्ती बसली आहे. तिला एक हात नाही आणि दुसऱ्या हाताने हातमोजा घालण्याचा प्रयत्न करीत आहे. हृदयाच्या आरपार घुसून मेंदू बधीर करणारे हे शब्द आहेत कविवर्य चंद्रकांत देवताले यांचे. कवितेची सृजनप्रक्रिया ते अशा पद्धतीने सांगत. समुद्राच्या काठावरची गरमागरम वाळूच जणू मनात घट्ट रुतावी आणि त्याचे चटके खालीवर होणाऱ्या श्वासागणिक हृदयाला भिडत राहावे. त्यांच्या कवितेची ही खरी ओळख. प्रतिके कशी असतात आणि कवितेत ती कशी वापरता येतात याचा वस्तुपाठ त्यांनी नव्या कवींना घालून दिला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chandrakant devtale
चंद्रकांत देवताले


‘लकडबग्गे की हंसी’ असो की ‘बालम ककडी बेचनेवाली लडकीया’ असो, समाजातील भीषण वास्तव त्यांनी अशा पद्धतीने मांडले की, वाचकाने अस्वस्थ झालेच पाहिजे. ‘पत्थर फेंक रहा हूँ’ म्हणत, साहित्य अकादमीचा पुरस्कार पटकावणाऱ्या चंद्रकांत देवताले यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९३६ रोजी विदर्भालगतच्या तेव्हाच्या मध्य प्रांतातील बैतुल जिल्ह्यात झाला. हिंदी साहित्यात पदवी घेऊन त्यांनी मुक्तिबोधांच्या साहित्यावर पीएचडी केली. संत तुकाराम आणि दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या रचनांचा सुघड हिंदी अनुवाद केला. मध्य प्रदेश शिखर सन्मान, मैथिलीशरण गुप्त सन्मान असे नामवंत पुरस्कार त्यांना मिळाले. खरेतर वाचकांच्या मनात निर्माण होणारी अनामिक अस्वस्थता हा त्यांच्या शब्दांसाठी मोठा पुरस्कार होता. असमानता, भेदभाव, स्त्रियांना मिळणारी वागणूक यावर ते कवितेतून प्रश्न करीत.

‘हड्डियों में छिपा ज्वर’, ‘दीवारों पर खून से’, ‘लकडबग्घा हंस रहा है’, ‘रोशनी के मैदान की तरफ’, ‘भूखंड तप रहा है’, ‘आग हर चीज में बताई गई थी’, ‘पत्थर की बैंच’, ‘उसके सपने’, ‘बदला बेहद महंगा सौदा’, ‘पत्थर फेंक रहा हूँ’ या त्यांच्या गाजलेल्या रचना. पाशवी जीवनाला मानवीय प्रतिष्ठा देणारे कविता हे एक उपकरण आहे, असे त्यांचे म्हणणे होते. ‘मी चंद्र, सूर्य, पृथ्वी कशावरही कविता लिहीन, माझ्या आईवर मात्र लिहू शकणार नाही.’ उत्कट भावनेच्या संदर्भात ही त्यांची प्रामाणिकता सच्चेपणाची होती. शब्दांना ते कधी निर्जीव मानत नसत. शब्द म्हणजे कृती, शब्द म्हणजे कार्य असा ठाम विश्वास ठेवणाऱ्या देवताले यांचे १५ ऑगस्ट रोजी निधन झाले, तेव्हा आधुनिक हिंदी कवितेचा एक शिलेदार हरपला. शब्दांच्या पलीकडचे सांगणारी चंद्रकांत देवताले यांची ही कविता. त्यांचे हे सांगणे वाचकांना कायम भेटत राहणार आहे. संवेदनशील मनांना कायम भिडत राहणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज