अ‍ॅपशहर

निवृत्ती महाराज वक्ते

महाराष्ट्र सरकारचा २०१६-१७ या वर्षाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ह. भ. प. निवृत्ती महाराज वक्ते यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे आणि वारकरी संप्रदायाच्या चळवळीने प्रबोधनाचे मोठे काम केले आहे.

Maharashtra Times 8 Jul 2017, 12:50 am
महाराष्ट्र सरकारचा २०१६-१७ या वर्षाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ह. भ. प. निवृत्ती महाराज वक्ते यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे आणि वारकरी संप्रदायाच्या चळवळीने प्रबोधनाचे मोठे काम केले आहे. या पार्श्वभूमीवर संत साहित्याच्या अभ्यासाच्या क्षेत्रात किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणाऱ्या व्यक्तीला ज्ञानोबा-तुकारामांच्या नावाने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. पाच लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. संत साहित्याच्या अभ्यासाच्या क्षेत्रात दिला जाणारा हा सर्वांत मानाचा सन्मान समजला जातो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dnyanoba tukaram award to nivritti maharaj vakte
निवृत्ती महाराज वक्ते


यापूर्वी रा. चिं. ढेरे, दादामहाराज मनमाडकर, जगन्नाथ महाराज नाशिककर, रामकृष्ण महाराज लवितकर, डॉ. यू. म. पठाण, प्रा. रामदास डांगे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, मारोती महाराज कुऱ्हेकर, डॉ. उषा देशमुख यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, यावरून या पुरस्काराची महत्ता लक्षात येते. निवृत्ती महाराज वक्ते यांनीही संत साहित्याच्या क्षेत्रात लक्षणीय काम केले आहे. ‘विठ्ठल कवच’, ‘विठ्ठल सहस्त्रनाम’, ‘विठ्ठल स्तवराज’, ‘विठ्ठल अष्टोत्तरनाम’, ‘विठ्ठल हृदय’, ‘मुक्ताबाई चरित्र’, ‘ज्ञानेश्वर दिग्विजय’, ‘वाल्मिकी रामायण’, ‘संत तुकाराम महाराज सदैह वैकुंठ गमन’ अशा ग्रंथांचे त्यांनी संपादन केले आहे. वारकरी संप्रदाय हा समतेच्या तत्त्वाचा पुरस्कार करणारा असला तरी या संप्रदायातही गेल्या काही वर्षांत हिंदुत्ववादी विचारांच्या मंडळींचे प्रस्थ वाढत चालले आहे.

वारकरी संप्रदायात हिंदुत्ववादी विचारांचा प्रचार-प्रसार करणारी जी मंडळी आहेत, त्यात निवृत्ती महाराज वक्ते यांचा समावेश होतो. निवृत्ती महाराज वक्ते यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९३४ रोजी बुलडाणा जिल्ह्यातील टाळकी या छोट्याशा गावी शेतकरी कुटुंबात झाला. नवव्या वर्षापासून त्यांनी कुटुंबियांच्या सोबतीने मुक्ताईनगर आणि पंढरीची वारी सुरू केली. प्राथमिक शिक्षणाबरोबर संत साहित्याची विशेष आवड असल्याने त्यांनी बालवयातच अडीच हजार अभंगांचे पठण केले. १९५४ ते ५८ या काळात त्यांनी साखरे महाराज मठात श्री गुरू नीलकंठ प्रभाकर मोडक यांच्याकडे अध्ययन केले. पुढे १९९२ पर्यंत ह. भ. प. परभणीकर गुरुजी, भगवान शास्त्री धारुरकर, गोपाळ शास्त्री गोरे, एकनाथ महाराज देगलूरकर आदींच्या मार्गदर्शनाखाली प्राकृत प्रस्थानत्रयी धर्मशास्त्र, स्मृती ग्रंथ पुराण इत्यादी ग्रंथाचा पंढरपूर येथे अभ्यास केला. गेली सहा दशके चातुर्मासातील विशेष अध्ययन आणि अध्यापन ते करीत असतात. या पुरस्काराने त्यांच्या जीवनभरच्या कामाचा उचित गौरव झाला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज