‘कलानगरी कोल्हापूर’ ते ‘सांस्कृतिक वसा घेतलेले ठाणे’ अशा दोन विभिन्न तरीही कलेच्या एकाच धाग्यात गुंफलेल्या दोन्ही शहरांच्या मातीशी नाळ जोडली गेली आणि तोडे, तुकडे, तिहाई या संकल्पना कायमच्या सोबती झाल्या. नृत्याचे धडे जरी बालपणापासून घेतले असले तरी काळाची गरज ओळखून लग्नानंतर नव्याने दिलेल्या नृत्याच्या परीक्षा, त्यासाठी मुंबईत घेलेला गुरुशोध, कलेची ही परंपरा विद्यार्थ्यांना देण्यासाठी उभारलेली संस्था आणि रसिकांपर्यंत शास्त्रीय नृत्य पोहोचविण्यासाठी विविध संकल्पनांचे महोत्सव अशा विविध उपक्रमांची धुरा पेलणाऱ्या नृत्यालंकार देव यांना थकणे माहीतच नाही. विद्यार्थी, गुरू आणि हरहुन्नरी कलाकार अशा त्यांच्या त्रिविध भूमिकेला विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे मृद्गंध पुरस्कार मिळणे, हा त्यांचा उचित सन्मान आहे. कोल्हापूरसारख्या कलानगरीत जन्म झाल्याने कलेशी घट्ट नाते होतेच. कलेची आवड तसेच सामाजिक कामातील सक्रिय सहभाग यांमुळे कलेचे बाळकडू आईकडूनच मिळाले. पूर्वाश्रमीच्या मृणालिनी मराठे यांना आईने नवव्या वर्षी आग्रहाने पंडित बद्रीनाथ कुलकर्णी यांच्या क्लासमध्ये पाठवले आणि घुंगरांशी ओळख झाली. नृत्याचे धडे सुरू असले तरीही कथकची परीक्षा देण्याची संधी मिळाली नव्हती. शिक्षण होताच श्रीराम देव यांच्याशी विवाह ठरला आणि मंजिरी देव या नव्या नावासह गावही बदलले. कोल्हापूर ते ठाणे हा प्रवासात नृत्य काहीसे मागे पडले. संसार, मुलांचे जन्म या जबाबदाऱ्या पार पाडताना आठ वर्षांत एकदाही कथकचा रियाज झाला नाही. तरी मन तिकडे ओढ घेत होते. नृत्याशी पुन्हा नाते जोडण्यासाठी पाच मुलींसह पहिला क्लास सुरू केला. त्यासह कथकच्या पुढच्या परीक्षा देण्यासाठी कोल्हापुर-ठाणे हा प्रवास सुरू झाला. मग गुरूंच्याच इच्छेने मुंबईत नव्या गुरूंचा शोध. गुरू आशा जोगळेकर यांची भेट घडली आणि नृत्यप्रवास समृद्ध बनला. मग मुलगा मुकुंदराज यांचे वादक ब्रिजराज मिश्रा यांच्याकडे सुरू झालेले तबल्याचे शिक्षण अजोड कलावंत गोपीकृष्ण यांचा परिचयाचे कारण ठरले आणि गोपीकृष्ण यांच्याकडून कथकचे धडे मिळू लागले. त्यांच्या कल्पनेतून साकारलेली ‘गणेश कल्चरल अॅकॅडमी’ ठाण्यात उभारली. तिथे हजारो मुली शिकल्या. त्यातील अनेकजणी स्वतः गुरूही बनल्या. मराठीत तीन तर हिंदी तसेच इंग्रजीतही कथकची माहिती देणारी पुस्तके मंजिरी यांनी लिहिली आहेत. या पुस्तकांना शासनानेही गौरविले. मात्र कथकविश्वात रसिकांना सामावून घेण्यासाठी त्यांनी सुरू केलेले गोपीकृष्ण महोत्सव, तरुणाई संगीत महोत्सव, सितारादेवी नर्तन कट्टा यांसारखे उपक्रम ठाण्यात नावाजले गेले. अनोखे ठरले. मंजिरी देव यांना आजवर अनेक पुरस्कार लाभले असले तरी ‘माझे शिक्षण अजून संपलेले नाही’ अशी कोणत्याही कलाकाराला साजेशी विनम्र भावना त्या व्यक्त करतात.
डॉ. मंजिरी देव
‘कलानगरी कोल्हापूर’ ते ‘सांस्कृतिक वसा घेतलेले ठाणे’ अशा दोन विभिन्न तरीही कलेच्या एकाच धाग्यात गुंफलेल्या दोन्ही शहरांच्या मातीशी नाळ जोडली गेली आणि तोडे, तुकडे, तिहाई या संकल्पना कायमच्या सोबती झाल्या.
Maharashtra Times 18 Nov 2017, 4:00 am