संपूर्ण कारकिर्दीत काँग्रेस पक्षाची प्रभावी वकिली करणारे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांना पक्षातील एका गटाकडूनच 'गद्दार' म्हणून दूषणे आणि निषेधाचे टोमॅटो झेलण्याची वेळ आली आहे. पंजाबमधील निर्णयप्रक्रियेच्या विरोधात शंका उपस्थित केल्याने राहुल गांधींच्या समर्थकांनी सिब्बल यांच्या घरापुढे हुल्लडबाजी केल्याने नवा संघर्ष उभा राहिला आहे. पूर्वी काँग्रेस नेतृत्वाच्या विरोधात आवाज उठविणाऱ्यांच्या विरोधात युवक काँग्रेसच्या शक्ती प्रदर्शनाद्वारे गप्प करण्यात येत असे, त्याची आठवण होते. हीच मंडळी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर एकाधिकारशाहीचा आरोप करीत असतात; मात्र मोदी-शहा यांच्याप्रमाणे निवडणूक जिंकून देण्याची क्षमता आपल्यात नाही, हे विसरतात. या घटनेनंतर काँग्रेसमधील 'जी २३' गटातील नेत्यांसह गीतकार जावेद अख्तर यांच्यासारखे मान्यवर सिब्बल यांच्या पाठीशी उभे राहिले असून, या गटाच्या मागणीनुसार काँग्रेस कार्यकारिणीची बैठक लवकरच होण्याची शक्यता आहे. विलक्षण बुद्धिमत्ता आणि सडेतोड युक्तिवाद, हे सिब्बल यांचे वैशिष्ट्य. भारतीय प्रशासकीय सेवेसाठीही ते पात्र ठरले होते; परंतु ही सेवा नाकारून त्यांनी 'हॉवर्ड लॉ स्कूल'मधून पदव्युत्तर शिक्षण घेऊन वकिली सुरू केली. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पदाचीही जबाबदारी सांभाळली. दिल्लीच्या चांदणी चौक मतदारसंघातून लोकसभेवर विजयी झाल्यावर त्यांनी केंद्रात मनुष्यबळ विकास, विज्ञान-तंत्रज्ञान आणि विधी व न्याय अशा खात्यांची जबाबदारी सांभाळली. भारतीय शिक्षणपद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांनी पावले उचलली. संसद, न्यायालये आणि राजकीय व्यासपीठांवर काँग्रेसची बाजू त्यांनी भक्कमपणे मांडली. पक्षातील जुन्या-नव्यांच्या वर्चस्व संघर्षात त्यांनी पक्षांतर्गत लोकशाहीचा आग्रह धरला. काही काळापूर्वी वाढदिवासाच्या निमित्ताने काँग्रेस नेतृत्वाच्या अनुपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांचे स्नेहभोजन आणि तेथे एका नेत्याने काँग्रेस नेतृत्वावर केलेली टीका ही सिब्बल यांची आगळीक मानली गेली. मतभिन्नता व्यक्त करणाऱ्यांना कम्युनिस्टांकडून 'बुर्झ्वा', भाजपजनांकडून 'देशद्रोही' असे शिव्याशाप मिळतात. त्याच धर्तीवर काँग्रेसजनांकडून वापरले जाणारे 'संघी' हे विशेषण सिब्बल यांच्या वाट्याला येणे दुर्दैवी आहे.