अ‍ॅपशहर

रंगकर्मी-उषा गांगुली

कला-साहित्यात अभिजात रुची जपणाऱ्या बंगाली बांधवांमध्ये हिंदी नाटकांची आवड निर्माण करणे सोपे नव्हते...

महाराष्ट्र टाइम्स 24 Apr 2020, 4:45 am
कला-साहित्यात अभिजात रुची जपणाऱ्या बंगाली बांधवांमध्ये हिंदी नाटकांची आवड निर्माण करणे सोपे नव्हते. अभिनेत्री, नाट्य दिग्दर्शक, सामाजिक कार्यकर्त्या उषा गांगुली यांनी ध्यासाने आणि धाडसाने ते केले. कोलकात्यात समांतर हिंदी रंगभूमी उभारली. गांगुली यांचा जन्म राजस्थानमधील जोधपूरचा. त्या तेथे भरतनाट्यम्‌ शिकल्या. उच्च शिक्षणासाठी कोलकात्यात आल्या. हिंदी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले. हिंदीच्या प्राध्यापिका म्हणून रुजू झाल्या. त्याच वर्षी त्यांनी अभिनयास सुरुवात केली. 'वसंतसेना'ची त्यांची पहिली भूमिका. १९७६मध्ये त्यांनी 'रंगकर्मी' या थिएटर ग्रुपची स्थापना केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम रंगकर्मी
उषा गांगुली


मनू भंडारी यांच्या कादंबरीवर आधारित 'महाभोज', रत्नाकर मतकरी यांची 'लोककथा', महेश एलकुंचवार यांची 'होळी', महाश्वेता देवींची 'रुदाली' त्यांनी रंगमंचावर आणली. 'कोर्ट मार्शल', 'अंतर्यात्रा' या हिंदी नाटकांबरोबर 'मुक्ती' आणि 'मानसी' ही बंगाली भाषेतील त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटकेही गाजली. ऋतुपर्ण घोष यांच्या 'रेनकोट'ची संहिता गांगुली यांचीच. जर्मनीतील स्टुटगार्टच्या जगप्रसिद्ध 'थिएटर डर वेल्ट फेस्टिव्हल'मध्ये जाणारा 'रंगकर्मी' हा भारतातील एकमेव ग्रुप. याच ग्रुपने व्यसनमुक्ती केंद्रातील व्यक्तींना घेऊन 'भोर' हे देशातील पहिले बहुभाषिक नाटक बसविले. १९९८ साली संगीत नाटक अकादमी अॅवॉर्ड, 'गुडिया घर' या नाटकातील भूमिकेसाठी राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार त्यांना मिळाला. 'थिएटर हे माझे जीवन आणि माझा ध्यास, तर 'रंगकर्मी' हे माझे कुटुंब', असे कायम सांगणाऱ्या उषा गांगुली यांचे गुरुवारी पंचाहत्तराव्या वर्षी निधन झाले. 'रंगकर्मी'चा आत्माच हरपला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज