अ‍ॅपशहर

श्री जयेंद्र सरस्वती

कांची कामकोटी पीठाचे परमाचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांचे देहावसान झाल्यामुळे आधुनिक काळात धर्माला समाजाभिमुख बनविणाऱ्या तसेच सेवाकार्यांचा प्रचंड पसारा उभा करणाऱ्या एका द्रष्ट्या महापुरुषाचा अंत झाला आहे.

Maharashtra Times 3 Mar 2018, 1:53 am
कांची कामकोटी पीठाचे परमाचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांचे देहावसान झाल्यामुळे आधुनिक काळात धर्माला समाजाभिमुख बनविणाऱ्या तसेच सेवाकार्यांचा प्रचंड पसारा उभा करणाऱ्या एका द्रष्ट्या महापुरुषाचा अंत झाला आहे. आदि शंकराचार्य यांनी स्थापन केलेल्या चार पीठांमधील कांची कामकोटी हे पीठ नाही. त्या अर्थाने इतर शंकराचार्य कांची कामकोटी पीठाला बरोबरीचे स्थान देत नाहीत. पण या पीठालाही शेकडो वर्षांची परंपरा आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jayendra-sarswati


जयेंद्र सरस्वती यांचे गुरू चंद्रशेखरेन्द्र सरस्वती हे अनेक शास्त्रांचे गाढे अभ्यासक होते. त्यांचा विविध तत्त्वज्ञानांचा सखोल अभ्यास होता. तसेच, ते जन्मभर चालत भारतभ्रमण करीत राहिले. त्यांच्या या क्रियाशील पुढाकाराने कांची कामकोटी पीठाला भारतात आदराचे स्थान प्राप्त झाले. हे स्थान जयेंद्र यांनी अनेक पुढाकार घेऊन उंचावले. केवळ तामिळनाडूतच नव्हे तर देशभरात अनेक ठिकाणी विविध सेवाकार्ये चालू करण्यात जयेंद्र यांनी पुढाकार घेतला. कांची कामकोटी पीठातर्फे सर्व जातींतील वधू-वरांचा सामूहिक विवाह लावून द्यायचा आणि त्यावेळी वधूची सोन्याची सौभाग्यलेणी मठाने द्यायची, हा उपक्रम तर कमालीचा यशस्वी झाला. तो एकतर जातिभेदाच्या विरोधात होता आणि दुसरीकडे मुलीच्या पालकांना सोन्यासाठी त्रास देऊ नका, असे सांगणारा होता. जयेंद्रांनी शिक्षण संस्थांचे जे विस्तृत जाळे उभारले, त्यात हजारो गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यात आले. आजही मिळत आहे. आदि शंकराचार्यांची परंपरा म्हणजे 'ब्राह्मणी' परंपरा नाही. ती साऱ्या हिंदूंची परंपरा आहे, हे कायावाचामने आणि कृतीने अधोरेखित करण्याचा प्रयत्न जयेंद्रांनी जन्मभर केला. त्यासाठी सनातन्यांच्या शिव्याही खाल्ल्या. आदिवासी, अनुसूचित, भटके यांच्या लोकधर्मपरंपरांचा आदर करून त्यांनाही मुख्य समाजप्रवाहात स्थान हवे, यावर त्यांचा कटाक्ष होता. जयेंद्रांमुळेच परंपरेने आलेले सोवळेओवळे आणि भेदाभेद गळून पडले.

आज तामिळनाडूत अनेक देवस्थानांमध्ये सर्वजातीय पुजारी दिसतात, यामागेही त्यांची प्रेरणा होती. आध्यात्मिक प्रेरणा आणि सामाजिक दृष्टी यांचे स्वामी विवेकानंदांनी जोडलेले नाते विसाव्या शतकात ज्या पारमार्थिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्तींनी पुढे नेले त्यात जयेंद्र सरस्वती यांचे नाव महत्त्वाचे होते. आपल्या मनासारखे काम करता आले नाही की, जयेंद्र सरस्वती कोपत. खरेतर संन्याशाला कसला आलाय पुन्हा संन्यास? पण एकदा ते आपले शंकराचार्यांचे काम सोडून 'दुसरा संन्यास' घेऊन निघून गेले होते. त्यांच्यावरचा खुनाच्या कटातील समावेशाचा आरोप खरा होता की, एक राजकीय डाव होता, यावर चर्चा होत राहील. पण त्यांनी धर्माला समाजासमोर नेऊन उभे केले, हे काम कधीही विस्मरणात जाणार नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज