अ‍ॅपशहर

संवेदनशील

न्या गीता मित्तलजम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी विराजमान झालेल्या न्या गीता मित्तल यांनी इतिहास घडविला आहे.

Maharashtra Times 14 Aug 2018, 4:00 am
जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी विराजमान झालेल्या न्या. गीता मित्तल यांनी इतिहास घडविला आहे. गेल्या शनिवारी त्यांनी पदाची शपथ घेतली आणि जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनण्याचा मान त्यांनी मिळविला. विधी आणि न्याय क्षेत्रातील त्यांच्या साडेतीन दशकांतील त्यांचा प्रवास उच्च न्यायालयाच्या शीर्ष स्थानापर्यंत येऊन पोहोचला आहे. या स्थानावरून न्यायदान करण्याचा अनुभव त्यांना आहे; कारण जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात दाखल होण्यापूर्वी त्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायाधीश होत्या.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gita-mittal


दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दीर्घ काळ वकिली केल्यानंतर १६ जुलै २००४मध्ये त्या दिल्ली उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून रुजू झाल्या. गेल्या चौदा वर्षांतील न्यायदानाच्या कारकिर्दीत न्या. मित्तल यांनी स्वत:चा ठसा उमटविला आहे. दिल्ली उच्च न्यायालयात असताना सार्वजनिक हिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विषयांची त्या स्वत:हून जनहित याचिकांत रूपांतर करण्यास त्यांनी सुरुवात केली. विशेषत: महिला सुरक्षा, मुलांचे प्रश्न, अंमली पदार्थ, नागरी सेवा आदी विषयांबाबत संवेदनशीलता दाखवून त्या या विषयांवर सुनावणी घेत. टोकाच्या अन्यायाच्या प्रकरणांबाबतही त्या तितक्याच संवेदनशील दाखवत. निर्भयपणे साक्ष देण्यासाठी साक्षीदारांना सुरक्षा देण्याचा त्यांचा प्रकल्प महत्त्वाचा.

मानवी हक्क, महिलांवरील अत्याचार, कारावासाच्या शिक्षेचा महिलांवरील परिणाम, मृत्युदंड, स्वामित्व हक्क, पर्यावरण संवर्धन आदी विषयांवर सातत्याने लेखन करणाऱ्या न्या. मित्तल यांचा एकूणच समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. नागरी क्षेत्रातील महिलांसाठीचा सर्वोच्च पुरस्कार मानला जाणाऱ्या 'नारीशक्ती पुरस्कारा'च्या यंदाच्या मानकरी असलेल्या न्या. मित्तल जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात आपली मुद्रा उमटवतील, यात शंका नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज